आपल्या पानमळ्यात प्रकाश बुंदीवाल उभे आहेत. विड्यासाठी वापरली जाणारी ही हृदयाच्या आकाराची पानं. दाटीवाटीने पसरणाऱ्या अत्यंत नाजूक वेलींवर ही पानं येतात. कडक ऊन आणि वाऱ्याच्या गरम झळांपासून संरक्षण करण्यासाठी या वेलींना सिंथेटिक जाळीचं आच्छादन केलंय.

भारतभरात सगळीकडे जेवण झाल्यावर विडा खाल्ला जातो. त्या विड्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ही पानं. हिरव्या पानाला चुना आणि कात लावतात. त्यात बडीशेप, सुपारी, गुलकंद घालतात. सगळं एकत्र भरून विशिष्ट पद्धतीने घडी घालून विडा बांधला जातो. यातून पानाला मुखशुद्धीचा स्वाद आणि रसाळपणा येतो.

११ हजार ९५६ लोकसंख्या असलेलं हे गाव चांगल्या प्रतीच्या पानासाठी प्रसिद्ध आहे. आणि कुकडेश्वरमधल्या इतर अनेकांप्रमाणे प्रकाश यांच्या कुटुंबाचेही स्मरणात असल्यापासून पानमळे आहेत. ते तांबोळी समाजातले आहेत. मध्य प्रदेशात हा समाज ओबीसी अर्थात इतर मागास प्रवर्गात येतो. एव्हाना साठी ओलांडलेल्या प्रकाश यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पानमळ्यात काम करायला सुरुवात केली.

पण बुंदीवाल यांच्या ८ गुंठ्यांच्या शेतीचं सध्या काही खरं नाही. २०२३ सालच्या मे महिन्यात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने या छोट्या शेतकऱ्याचं जग इकडचं तिकडे करून टाकलं. “आम्हाला कोणताही विमा दिला जात नाही आणि वादळात सर्व काही गमावलं तरी सरकार कोणतीही मदत देत नाही,’’ ते सांगतात.

राष्ट्रीय कृषी विमा योजनेच्या अंतर्गत (एनएआयएस) अनेक कृषी उत्पादनांना केंद्र शासन हवामानाशी निगडीत असलेला विमा देतं. परंतु त्यात या पानाचा अंतर्भाव नाही.

Paan fields are covered with a green synthetic net (left) in Kukdeshwar village of Neemuch district and so is Prakash Bundiwaal's paanwari (right)
PHOTO • Harsh Choudhary
Paan fields are covered with a green synthetic net (left) in Kukdeshwar village of Neemuch district and so is Prakash Bundiwaal's paanwari (right)
PHOTO • Harsh Choudhary

डावीकडे: नीमच जिल्ह्यातल्या कुकडेश्वर गावात ले हिरव्या शेडनेटने झाकले ले पान मळे आणि उजवीकडे: प्रकाश बुंदीवाल यां चा पान मळा

Left: Entrance to Prakash's field 6-7 kilometres away from their home.
PHOTO • Harsh Choudhary
Right: The paan leaves grow on thin climbers in densely packed rows
PHOTO • Harsh Choudhary

डावीकडे: घरापासून ६-७ किलोमीटरवर असलेल्या प्रकाश यां च्या पानमळ्यात जायची वाट. उजवीकडे: रांगेने आणि दाटीवाटीने वाढणाऱ्या नाजूक वेलींवर ही पान ये तात

पानमळ्याचं काम खूप कष्टाचं आहे : “पानमळ्यात भरपूर काम असतं, आमचा सगळा दिवस त्यातच जातो,’’ प्रकाश यांच्या पत्नी आशाबाई बुंदीवाल सांगतात. दर तीन दिवसांनी मळ्याला पाणी द्यावं लागतं. प्रकाश सांगतात, “काही शेतकरी (सिंचनासाठी) नव्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत यंत्रांचा वापर करतात, पण आमच्यापैकी बहुतेक जण अजूनही पारंपरिक पद्धतीनेच शेताला पाणी पाजतात.’’

दरवर्षी मार्च महिन्यात नव्या वेलींची लावण केली जाते. “ताक, उडीद डाळ, सोयाबीनचं पीठ अशा घरात सहज उपलब्ध असणारं सामान मातीत मिसळायचं. आम्ही पूर्वी तूपही वापरायचो, पण ते महाग झालंय, त्यामुळे आता आम्ही ते वापरत नाही,’’ प्रकाश सांगतात.

पानमळ्यात सामान्यत: बायका वेलांची छाटणी करतात आणि दररोज अंदाजे पाच हजार पानं खुडतात. गरजेनुसार शेडनेट दुरुस्त करण्याचं आणि वेलींना आधार म्हणून लावलेल्या बांबूच्या काठ्या वेळोवेळी ठीकठाक करण्याचं कामही त्याच करतात.

“पुरुषाच्या कामापेक्षा बाईचं काम दुप्पट असतं,’’ त्यांची सून राणू बुंदीवाल सांगते. तीस वर्षांची तरुण राणू वयाच्या अकराव्या वर्षापासून पानमळ्यात काम करत आलीये. “आम्हाला पहाटे ४ वाजता उठून घरची कामं, आवराआवरी आणि स्वयंपाक उरकावा लागतो.’’ दुपारचं जेवणही त्यांना बरोबर घेऊन जावं लागतं.

२००० सालच्या सुरुवातीला “पाण्याची टंचाई आणि मातीचा कस कमी झाल्यामुळे आम्ही आमचा पानमळा घरापासून ६-७ किमी अंतरावरच्या दुसऱ्या एका ठिकाणी हलवला,’’ प्रकाश सांगतात.

Left: Prakash irrigates his field every three days using a pot.
PHOTO • Harsh Choudhary
Right: A hut in their paanwari to rest and make tea
PHOTO • Harsh Choudhary

डावीकडे: प्रकाश दर तीन दिवसांनी आपल्या पानमळ्यात शिपणं करतात. उजवीकडे: थोडा आराम कर ण्यासाठी आणि चहा वगैरे बनवण्यासाठी उभारलेली ही पान मळ्यातली खोप

बीबियाणं, सिंचन आणि कधी कधी मजुरी द्यायला लागली तर असा साधारण वर्षभरात दोन लाखांपर्यंतचा खर्च येतो. “कधीकधी तर  ५० हजार रुपये मिळणंही कठीण होऊन बसतं,’’ प्रकाश सांगतात. त्यांच्याकडे याशिवायची ४ गुंठे जमीन आहे. त्यावर ते गहू, थोडी फळं आणि भाजीपाला पिकवतात... थोडी अधिकची मिळकत व्हावी म्हणून!

खराब पानं बाजूला काढली जातात. चांगली पानं वेगळी करून मंडईत विकयला पाठवण्यासाठी बांधली जातात. हे काम घरची माणसंच करतात, राणू सांगते. आशाबाई सांगतात, “तोडलेल्या पानांच्या छाटणीचं करायचं काम रोज जवळपास मध्यरात्रीपर्यंत चालतं. कधीकधी तर आम्ही रात्री २ वाजेपर्यंत काम करतो.’’

सकाळी ६.३० ते ७.३० या वेळात मंडईत दररोज पानाची खरेदी-विक्री चालते. १०० पानांची एक कवळी करून पानं विकली जातात. “साधारण १००च्या आसपास विक्रेते मंडीत येतात पण खरेदीदार जेमतेम ८-१० असतात,’’ मंडईत पानं विकायला आलेला सुनील मोदी सांगतो. साधारणपणे २-३ दिवसांत पानं खराब होतात, त्यामुळे “आम्हाला सगळं झटपट विकावंच लागतं,’’ ३२ वर्षीय सुनील सांगतो.

“आज ठीकठाक झाला सौदा! एका कवळीला ५० रुपये भाव होता, नेहमीपेक्षा जास्त,’’ सुनील सांगतो. “लग्नाच्या हंगामात हा व्यवसाय फायदेशीर ठरतो. ही पानं शुभ मानली जात असल्यामुळे पूजेत वापरली जातात. लग्नसमारंभात लोक पानाचे स्टॉल लावणं पसंत करतात, त्यामुळे अधिकच्या विक्रीला थोडाफार वाव मिळतो. ते सोडलं तर सगळा थंडा मामला असतो,’’ सुनील सांगतो. आणि हे मौसमावर अवलंबून असतं.

Paan leaves are cleaned and stacked in bundles of 100 (left) to be sold in the mandi (right) everyday
PHOTO • Harsh Choudhary
Paan leaves are cleaned and stacked in bundles of 100 (left) to be sold in the mandi (right) everyday
PHOTO • Harsh Choudhary

डावीकडे: विड्याची पान स्वच्छ करून शंभराच्या कवळीत बांधून रोजच्या रोज मंडईत विकण्यासाठी नेली जातात (उजवीकडे)

पानाची विक्री मंदावण्याचं आणखी एक कारण म्हणजे तंबाखूची बारकी पाकीटं सहज उपलब्ध असतात. “आता कोणालाही पान विकत घ्यावं असं वाटत नाही,’’ प्रकाश सांगतात. एका विड्याची किंवा लावलेल्या पानाची किंमत २५ ते ३० रुपये असते. या पैशात तंबाखूच्या पाच बारक्या पाऊच खरेदी करता येतात. “पान खाणं आरोग्यासाठी चांगलं. पण लोक तंबाखूची बारकी पाकीटं खातात कारण ते स्वस्त पडतं,’’ प्रकाश म्हणतात.

सौरभ तोडवाल हे आधीचे पान उत्पादक. पण यातल्या अस्थिर उत्पन्नामुळे वैतागून २०११मध्ये त्यांनी हा व्यवसाय सोडला आणि आता ते किराणा दुकान चालवतात. पान उत्पादक असताना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जवळपास दुप्पट ते आता कमावतात- वार्षिक साधारण दीड लाख रुपये.

दहा वर्षांपूर्वी विष्णू प्रसाद मोदी यांनी पानाची शेती सोडली आणि कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करायला सुरुवात केली. पानाची शेती फायदेशीर नाही, असं ते सांगतात: “या शेतीसाठी योग्य असा काळच नाही. उन्हाळ्यात पानांना लू किंवा झळांचा त्रास होतो आणि हिवाळ्यात वेल नीट वाढत नाही. पावसाळ्यात मुसळधारा आणि वादळामुळे पानांचं नुकसान होण्याचा सदैव धोका असतो.”

प्रकाश यांचा मुलगा प्रदीपही पानाची शेती करतो. २०२३ सालच्या एप्रिलमध्ये बनारसी पानाला जीआय (भौगोलिक चिन्हांकन) टॅग मिळाला. त्याचा संदर्भ घेत प्रदीप सांगतो, “आम्हाला वाटतं, की सरकारने आम्हाला जीआय टॅग द्यावा. तसं झालं तर आमच्या व्यवसायाला चांगलाच फायदा होईल.’’

Student Reporter : Harsh Choudhary

Harsh Choudhary is a student at Ashoka University, Sonipat. He has grown up in Kukdeshwar, Madhya Pradesh.

Other stories by Harsh Choudhary
Editor : Sanviti Iyer

Sanviti Iyer is Assistant Editor at the People's Archive of Rural India. She also works with students to help them document and report issues on rural India.

Other stories by Sanviti Iyer
Translator : Amruta Walimbe

Amruta Walimbe is an independent journalist and editor with a long experience of working with many NGOs and media houses in Maharashtra. She is also a trained psychologist.

Other stories by Amruta Walimbe