नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातल्या सावरखेडमध्ये फारसं कुणी खळखळून हसत नाही. अनोळखी कुणाशी बोलताना ते त्यांचं तोंड फारसं उघडत नाहीत. “आम्हालाच कसनुसं होतं,” रामेश्वर जाधव सांगतो. तो बोलतो तेव्हा लक्षात येतं की त्याचे सगळे दात किडलेत आणि बेढब झालेत. दातांचा रंगही पिवळा किंवा गडद विटकरी झाला आहे.
२२ वर्षांचा रामेश्वर शेतमजूर आहे. ५०० वस्तीच्या सावरखेडमध्ये अशी अडचण असणारा तो एकटाच नाहीये. जवळ जवळ प्रत्येकच मोठ्या माणसाचे दात कमी जास्त खराब झालेत. गावातल्या अरुंद गल्लीबोळातनं किंवा शेताकडे जाणारे बरेच जण लंगडतायत किंवा पाठीतनं कायमचेच वाकलेत. जे चालू शकतायत त्यांना बऱ्याचदा मध्ये थांबावं लागतंय. असं वाटतंय की हे अख्खं गाव एका वेगळ्याच संथ गती काळात गेलंय.
आणि हे सगळं झालंय ते जमिनीच्या पोटातल्या, गावकऱ्यांच्या पावलाखाली दडलेल्या एका गोष्टीमुळेः इथल्या भूजलामध्ये फ्लुरॉइड आहे. हे रसायन माती, दगड आणि भूजलामध्ये नैसर्गिकरित्या आढळतं. पण त्याचं प्रमाण जर का जास्त असेल तर मात्र त्याचे अतिशय घातक परिणाम होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते एका लिटरमागे १.५ मिलीग्रॅमपेक्षा जास्त फ्लुरॉइड असेल तर ते मानवी वापरासाठी धोक्याचं आहे. २०१२-१३ मध्ये जेव्हा भूजल सर्वेक्षण विभागाने पाण्याची तपासणी केली तेव्हा सावरखेडमध्ये हे प्रमाण ९.५ मिलीग्रॅम इतकं होतं.
“पाण्यामध्ये फ्लुरॉइडचं प्रमाण किती आहे यावर फ्लुरोसिस अवलंबून असतो, त्यामुळे त्याचा प्रभावही वेगवेगळा असतो,” नांदेडचे डॉ. आशीष अर्धापूरकर सांगतात. एकदा हानी सुरू झाली की ती काही थांबवता येत नाही. “लहान मुलं मात्र यापासून वाचतात. त्यांना अक्कलदाढा आल्यानंतरच दातांचा फ्लुरोसिस होऊ शकतो आणि हाडांची वाढ झाल्यानंतर सांगाड्याचा, म्हणजेच वयाच्या सहा वर्षानंतर.”






