सायकल चालवणं आणि एक सामाजिक चळवळ? कदाचित थोडी अतिश्योक्ती वाटेल, पण हे खरंच घडतंय – तामिळनाडूच्या पुडुकोट्टई जिल्ह्यातल्या हजारो निम-साक्षर महिलांना यात काहीही आश्चर्य वाटत नाही. मागासपणातून बाहेर पडण्याचा काही तरी मार्ग लोक शोधतातच, काही वेळा ते फार अचंबित करणारेही असतात, जो त्यांचा परिस्थितीवर प्रहारही असतो, आणि त्याद्वारे ते आपले पाशही तोडत असतात.

भारतातल्या सर्वात गरीब जिल्ह्यातल्या महिलांनी निवडलेला मार्ग म्हणजे सायकल चालवणे. गेल्या १८ महिन्यात एक लाख ग्रामीण महिलांनी, ज्यातील बहुतेक निम-साक्षर आहेत, त्यांच्या स्वातंत्र्याचे प्रतिक आणि दळणवळणाचा पर्याय म्हणून सायकल निवडली आहे. जर आपण १० वर्षाखालील मुली वगळल्या तर जिल्ह्यातील एक चतुर्थांश महिला सायकलिंग शिकल्या आहेत. आणि ७०,००० पेक्षा जास्त महिलांनी सार्वजनिक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले नव्याने आत्मसात केलेले कौशल्य जगासमोर सादर केले आहे. आणि तरीही प्रशिक्षण शिबिरे आणि नवीन शिकण्याची इच्छा अजूनही तशीच आहे.

पुडुकोट्टईच्या ग्रामीण भागात अगदी पारंपरिक मुस्लिम समाजातल्या तरूण महिलाही सायकलवर स्वार होऊन फिरताना दिसतात. यासाठी त्यातील काही जणींनी त्यांचा बुरखाही बाजूला ठेवला आहे. जमीला बिबी, एक तरूण मुस्लिम मुलगी म्हणते, “हा माझा अधिकार आहे. आम्ही कुठेही जाऊ शकतो. आता मला बसची वाट बघायची गरज नाही. मी जेव्हा सायकल वापरायला सुरूवात केली तेव्हा लोकांनी वाईट साईट भाषेत टीका केली पण मी त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं.”

सायकलिंगचे वेड लागलेली माध्यमिक शिक्षिका फातिमा दर रोज संध्याकाळी अर्ध्यातासाकरिता  सायकल भाड्यावर घेते (तिला सायकल विकत घेणं परवडू शकत नाही – साधारण एका सायकलची किंमत रू.१,२०० असते). “सायकल चालवण्यात एक स्वातंत्र्य आहे. आम्ही आता कोणावरही विसंबून नाही. मी हे कधीही सोडू शकत नाही,” असं ती सांगत होती. जमीला, फातिमा आणि तिची मैत्रिण विशी पार केलेली अवाकन्नी यांनी त्यांच्या आजूबाजूच्या अनेक महिलांना सायकल चालवायला शिकवले आहे.

Women learning how to ride bicycles in a village in Tamil Nadu
PHOTO • P. Sainath

अरिवोली सायकलिंग प्रशिक्षण शिबिराला आलेल्या सगळ्या आपल्या सर्वोत्तम साड्या नेसून आल्या होत्या. त्यांच्या प्रशिक्षकही अगदी नीट सजून आलेल्या दिसल्या

संपूर्ण जिल्ह्यात सायकलिंगच लोण पसरलं आहे. शेत मजूर, खाण मजूर महिला आणि ग्रामीण आरोग्य सेविका या सायकलच्या वापरात आघाडीला आहेत. त्यांच्या जोडीला बालवाडी आणि अंगडवाडी सेविका, रत्न कारागीर, शाळा शिक्षिका सुद्धा यात सामील झाल्या आहेत. यातील बहुतेक अलिकडेच साक्षर झालेल्या आहेत. जिल्ह्यात अरिवोली इयक्कम (ज्ञान ज्योत चळवळ) अंतर्गत व्यापक स्तरावर राबवण्यात आलेल्या साक्षरता मोहिमेने या उत्साहाचा लाभ घेतला आहे. निम-साक्षर असलेल्या बहुतेक ‘हौशी सायकलस्वार’ झाल्या आहेत. यातील ज्यांच्याशी मी बोललो त्या सर्वांच्या बोलण्यातून सायकलिंग आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्यात थेट संबंध दिसून आला.

“सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांना मिळालेला आत्मविश्वास,” अरिवोली सेंट्रलच्या समन्वयक आणि सायकलिंग चळवळीच्या प्रणोत्या एन. कन्नामल सांगत होत्या. “सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे पुरूषांवरची त्यांचं अवलंबन कमी झालं आहे. आता आपल्याला महिला सायकलवरून चार किलो-मिटरच्या अंतरावरून पाणी आणायला जाताना दिसतात, त्या मुलांनाही सांभळतात. अगदी इतर ठिकाणांहून सामानही त्या आणतात. पण तुम्हाला खरच सांगते, जेव्हा सुरूवात झाली तेव्हा माहिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे ही उडवण्यात आले. अनेक जणांनी वाईटसाईट भाषा वापरली. पण अरिवोलीत सायकलिंगला सामाजिक मान्यता मिळाली होती. त्यामुळे महिलांनीही हे स्वीकारलं.”

सुरुवातीला त्यांच्यात कन्नामल या स्वतः होत्या. एक विज्ञान पदवीधर असून सुद्धा त्यांनी याआधी कधीही सायकल चालवायची हिम्मत केली नव्हती. ‘अरिवोली सायकलिंग प्रशिक्षण शिबिराला’ भेट देण हा एक अनोखा अनुभव होता. किलाकरुची गावात रविवार असूनही सहभागींमध्ये एक जोष, उमेद होती. सायकलिंगसाठी त्यांच्यात असलेल्या उत्साह तुमचे लक्ष वेधून घेतो. रोजची कामाची चाकोरी, पुरूषांनी घातलेल्या मर्यादा यातून सुटका करून घेण्याचा मार्ग म्हणजे सायकल चालवणं. सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेली अरिवोलीतली गाणीही नव-सायकलपटू गातात. “अहो, ताई सायकल शिका, काळाबरोबर आपली पावले टाका...”

ज्यांनी ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यातल्या बऱ्याच नव्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी सहभागी होतात. कुशल प्रशिक्षक म्हणून त्या अरिवोलीसाठी मोफत काम करतात. त्यांच्यात फक्त शिकण्याचीच इच्छा नाही तर त्यांना व्यापक स्तरावर असं वाटतं की सर्व स्त्रियांना सायकलिंग येणं आवश्यक आहे. त्यांच्या अनुभवांनी साक्षरता मोहिमेला चालना दिली आहे. नव-सायकलपटूंचं अरिवोलीशी नात पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झालं आहे.

या वादळाची सुरूवात होण्यामागची प्रेरणा म्हणजे माजी लोकप्रिय जिल्हाधिकारी शीला राणी चंकथ. १९९१ मध्ये याची सुरूवात करताना त्यांचा उद्देश असा होता की महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन अगदी दुर्गम भागातही महिलांमध्ये साक्षरता मोहिम पोहचवायची. दळणवळणालाही त्यांनी साक्षरता मोहिमेचा भाग बनवले. दळणवळणाच्या साधनांच्या अभावाने महिलांच्या आत्मविश्वासावर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांनी दळणवळणाचाही साक्षरता मोहिमेत समावेश केला. महिलांना सायकलसाठी लोन देण्यासाठी त्यांनी बॅंकांना भाग पाडले. या मोहिमेला चालना देण्यासाठी त्यांनी प्रत्येक तालुक्याला काही विशिष्ट कामं नेमून दिली. जिल्ह्यातील उच्चाधिकारी म्हणून त्यांनी वैयक्तिक स्तरावर बारकाईने लक्ष दिलं.

पहिले कार्यकर्त्या सायकलिंग शिकल्या. नंतर निम-साक्षर लोकांना शिकायची इच्छा होती. प्रत्येक महिलेला शिकायचे होतं. आणि यामुळे स्वाभाविकच ‘लेडिज सायकलींचा तुटवडा’ निर्माण झाला. परंतु जेंट्स सायकलीही तेवढ्याच उपयुक्त होत्या. काही महिलांचा जेंट्स सायकलींना प्राधान्य होत कारण या सायकलींमध्ये सीट पासून हॅंडल पर्यंत एक अतिरिक्त बार असतो. आणि आजच्या घडीला हजारो स्त्रिया ‘जेंट्स’ सायकलीच वापरत आहेत. आणि हजारो अशाही महिला आहेत ज्यांना वाटत की सायकल एक दिवस त्यांच्याही अवाक्यात असेल.

८ मार्च १९९२ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानंतर जिल्हा पार बदलून गेला. हॅंडल बारवर झेंडा, घंटांचा जयघोष यामुळे पुडुकोट्टईत एक वेगळाच उत्साह संचारला. फक्त महिलांच्या अशा भव्य सायकल रॅलीने शहरातच्या रहिवाशांना आश्चर्याचा धक्का दिला.

पुरूषांना काय वाटत? पहिले या सगळ्याचा ज्यांना स्वीकार करावा लागला ते राय सायकल्सचे एस. कन्नराजन होते. या एका वितरकाने ‘लेडीज सायकल’ च्या विक्रीत तब्बल 350% वाढ अनुभवली. हा आकडा पूर्ण चित्र दाखवत नाही, दोन कारणांसाठी; पहिले, लेडिज सायकल्ससाठी थांबायला तयार नसलेल्या अनेक महिलांनी ‘जेंट्स सायकल्स’ निवडल्या. दोन, कन्नकराजन यांनी माझ्याबरोबर माहिती खूप सावधपणे शेअर केली. त्यांना असंच वाटत होत की मी विक्रीकर विभागाचा गुप्त एजंट आहे.

पण सगळ्याच पुरूषांचा याला विरोध होता असे नाही. काही तर उत्तेजन देत होते. अरिवोलीमधील कार्यकर्ते मुथु भास्करन हे असंच एक उदाहरण. त्यांनी सायकल चालवण्याबद्दल प्रसिद्ध गाणं लिहिलं. नंतर ते प्रेरणागीत बनलं.

कुडिमिनमलाईच्या तप्त दगड खाणीत इतरांना प्रशिक्षण देणारी के. मनोरमणी मला भेटली. ती एक खाण कामगार आणि अरिवोलीतील कार्यकर्ती आहे. तिला वाटतं की तिच्या सहकारी कामगारांनी सायकलिंग शिकणं आवश्यक आहे. “आम्ही राहतो तो भाग तसा दुर्गम आहे”, ती मला सांगते. “ज्यांना सायकलिंग येतं त्यांना येणं-जाणं सोपं होतं.”

PHOTO • P. Sainath
PHOTO • P. Sainath

१९९२-९३ मध्ये पुडुकोट्टई जिल्ह्यात एक लाखाहून अधिक बाया सायकलिंग शिकल्या. त्याचा आर्थिक फायदा झालाच पण त्या पलिकडे जाऊन सायकल चालवणं स्त्रियांसाठी मुक्तीचं एक पाऊल होतं

१९९२ च्या एका आठवड्यात अरिवोलीत आयोजित ‘प्रदर्शन-स्पर्धेत’ ७०,००० पेक्षा अधिक महिलांनी त्यांचं सायकलिंग कौशल्य सादर केलं. याने प्रभावित झालेल्या युनिसेफने अरिवोलीच्या महिलांसाठी ५० मोपेड्स मंजूर केल्या.

सायकलिंगचे काही निश्चित परिणाम आर्थिक आहेत. यामुळे उत्पन्नाला चालना मिळते. काही महिला आजुबाजुच्या गावात कृषी आणि इतर उत्पादने विकतात. त्यांच्यासाठी सायकलीने येण्याजाण्याच्या वेळेत घट होते. दळणवळणाचे जास्त पर्याय नसलेल्या भागात हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला तुमच्याकडचा माल विकायला वेळ मिळतो. तिसरं म्हणजे तुम्हाला जास्त ठिकाणी जाता येऊ शकतं. या पलीकडे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही थोडा फावला वेळ काढू शकता.

अर्थात, फक्त आर्थिक परिणामांवर लक्ष देत इतर पैलूंना नजरअंदाज करणं चुकीचं होईल. एक आत्मसन्मानाची भावना यामुळे निर्माण होते ती खूप महत्त्वाची आहे. “अर्थात हे फक्त आर्थिक काही तरी नाहीये,” फातिमा म्हणते. मी किती मूर्ख आहे असा तिच्या चेहऱ्यावर भाव असतो. “सायकल चालवून मी काय कमाई करणार? उलट माझा खर्च वाढतो. मला सायकल परवडत नाही. पण स्वातंत्र्याचा तो अनुभव घेण्यासाठी मी दर संध्याकाळी ती भाड्याने घेते.” पुडुकोट्टईत येण्याआधी सायकलसारख्या वाहनाकडे मी स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून कधीच पाहिलं नव्हतं.

“ग्रामीण महिलांसाठी हे किती महत्त्वाचं आहे ते सांगणं कठीण आहे,” कन्नाम्मल म्हणतात. “हे हिमालयाला गवासणी घालण्यासारखे आहे. अगदी जणू विमान उडवल्यासारखं आहे. कदाचित लोक हसतील. पण केवळ महिलांनाच याचं महत्त्व कळू शकतं.”

हो, पत्रकारितेची मानक, नियम असे सांगतात की या बातमीसाठी सायकल चळवळीच्या विरोधी असलेल्यांची मतंही विचारात घ्यायला हवीत. परंतु, काय गरज आहे त्याची? आज एक लाख निम-साक्षर महिला इथे सायकलचा वापर करत आहेत आणि हीच तर खरी बातमी आहे.

ज्या पुरूषांचा याला विरोध आहे ते चालण्याचा पर्याय स्विकारू शकतात – कारण सायकलिंगच्या बाबतीत ते महिलांच्या जवळपासही नाहीत.

कालांतराने : मी जेव्हा एप्रिल १९९५ मध्ये पुडुकोट्टई मध्ये परत आलो तेव्हा हे वेड अजूनही होतं. पण अनेक महिलांना सायकल परवडत नव्हती – प्रत्येक सायकलची किंमत रू. १४०० झाली होती. आणि नवी पिढी पहिल्या लाटेचा लाभ घेण्याएवढी मोठी झाली नव्हती. पण तरीही पुडुक्कोटई मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला सायकल चालवितात त्यामुळे जिल्हा भारतातल्या सगळ्या जिल्ह्यांपेक्षा अत्यंत वेगळा आहे. आणि हे कौशल्य आत्मसात करण्याची ओढ काही औरच आहे.

पूर्वप्रसिद्धीः एव्हरीबडी लव्ह्ज अ गूड ड्राउट, पी. साईनाथ

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Ameya Phadke

Ameya Phadke is a journalism enthusiast and an enterprising content localisation professional based in Mumbai. Founder of amphpossibilities, Ameya holds a Masters degree in political science (IGNOU) and loves supporting NGOs like Praja Foundation.

Other stories by Ameya Phadke