बलदेव कौर, ७०, एकेकाळी आपल्या कुटुंबाने शेतजमिनीवर बांधलेल्या घराच्या अवशेषांमधून मार्ग काढत होत्या. अजूनही शाबूत असलेल्या खोल्यांच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्यात.

पाऊस आणि गारपिटीने छताला तडे गेल्यावर आम्ही सर्वांनी रात्र जागून काढली. काय होतंय आम्हाला समजतच नव्हतं,” बलदेव कौर म्हणाल्या. अंगात सुती सलवार कमीज आणि एका दुपट्ट्याने आपले राखाडी केस झाकले होते. “मग सकाळी जेव्हा छतावरून पाणी गळायला लागलं तेव्हा आम्ही सगळे बाहेर पळत सुटलो.”

जसजसा सूर्य बाहेर आला तसतसं घर कोसळू लागलं, बलदेव यांची धाकटी सून, अमनदीप कौर, 26, सांगते. “सरे पासे घर ही पाट गया. [आमच्या भोवती सगळं घर उध्वस्त झालं],” बलदेव यांचा मोठा मुलगा, ३५ वर्षीय बलजिंदर सिंह म्हणतो.

बलदेव कौर आणि त्यांच्या सात जणांच्या कुटुंबाने, ज्यात तीन मुलं आहेत, यापूर्वी कधीही असा विनाश पाहिला नव्हता. मार्च २०२३ च्या उत्तरार्धात झालेल्या अवकाळी पावसाने श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील गिद्दरबाहा ब्लॉकमधील भलायना गावात गारपिटीसह पिकं आणि घरं उद्ध्वस्त केली. दक्षिण-पश्चिम पंजाबचा हा प्रदेश दक्षिणेला राजस्थान आणि पूर्वेला हरियाणाला लागून आहे.

तीन दिवस पाऊस आणि गारपीट सुरू असल्याने बलजिंदर त्रासून गेले होते. त्यांनी स्वतःच्या मालकीच्या ५ एकर जमिनीव्यतिरिक्त आणखी १० एकर शेतजमीन भाड्याने घेण्यासाठी एका अढतिया (आडत्या) कडून ६.५ लाख रुपये उसने घेतले होते. त्यांच्या गव्हाच्या पिकाशिवाय ना कुटुंबाचा उदरनिर्वाह होता, ना कर्ज फिटणार होतं.

जे पीक नुकतंच यायला सुरुवात झाली होती, ते आधी गारपिटीने नष्ट झालं. नंतर पाऊस पडला आणि पूर्ण शेतात बरेच दिवस पाणी साचलं होतं. पाण्याचा निचरा होईना आणि त्यात पीक सडत राहिलं,” बलजिंदर म्हणाला. “ते सडलेलं पीक आताही १५ एकर जमिनीत पडून आहे,” बलजिंदर एप्रिलच्या मध्यात म्हणाले.

Left: Baldev Kaur standing amidst the remains of her home in Bhalaiana, Sri Muktsar Sahib district of Punjab. The house was built by her family on their farmland.
PHOTO • Sanskriti Talwar
Right: Baldev Kaur’s younger daughter-in-law Amandeep Kaur next to the shattered walls of the destroyed house
PHOTO • Sanskriti Talwar

डावीकडे: बलदेव कौर पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील भलायना येथे आपल्या घराच्या अवशेषांमध्ये उभ्या आहेत. हे घर त्यांच्या कुटुंबाने आपल्या शेतजमिनीवर बांधलं होतं. उजवीकडे: बलदेव कौर यांची धाकटी सून अमनदीप कौर उद्ध्वस्त घराच्या तडा गेलेल्या भिंतीशेजारी उभी आहे

Left: Baldev Kaur’s eldest son Baljinder Singh had taken a loan to rent 10 acres of land.
PHOTO • Sanskriti Talwar
Right: Damaged wheat crop on the 15 acres of farmland cultivated by Baldev Kaur’s family.
PHOTO • Sanskriti Talwar

डावीकडे: बलदेव कौर यांचा मोठा मुलगा बलजिंदर सिंह यांनी १० एकर जमीन भाड्याने घेण्यासाठी कर्ज घेतलं होतं. उजवीकडे: बलदेव कौर यांच्या कुटुंबाने लागवड केलेल्या १५ एकर शेतातील वाया गेलेलं गव्हाचं पीक

या भागांमध्ये गहू हे रब्बी पीक आहे, ज्याची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान केली जाते. फेब्रुवारी आणि मार्च महिने पिकाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण असतात, कारण तेंव्हा दाण्यात स्टार्च आणि प्रथिनं गोळा होण्यास सुरुवात होते.

भारतीय हवामान विभाग, चंदीगडच्या माहितीनुसार २४ ते ३० मार्च दरम्यान या महिन्याच्या सरासरी २२.२ मिमी ऐवजी पंजाबमध्ये ३३.८ मिमी इतका पाऊस पडला होता. पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियानाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, केवळ २४ मार्च रोजीच जवळपास ३० मिमी पावसाची नोंद झाली.

बेमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे त्यांच्या पिकाला मोठा धक्का बसला हे बलजिंदरला माहीत होतंच, मात्र कुटुंबाने वर्षानुवर्षे बांधलेल्या घराचं नुकसान म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच होता.

“बाहेरून आले आणि आमच्या घराकडे पाहिलं की माझा जीव काळजीने भरून येतो. जी घबरांदा है [जीव घाबरतो],” बलदेव कौर म्हणतात.

त्यांच्या मते यंदा शेतीत सुमारे रु. ६ लाखांपेक्षा जास्त नुकसान झालंय. जिथे एक एकरात ६० मण (एक मण म्हणजे ३७ किलो) गहू पिकायला हवा, तिथे आता एकरी २० मण हातात येईल. घर पुन्हा बांधणं हा आणखी एक खर्च आला आणि उन्हाळा तोंडावर आल्यामुळे तर गरजेचाही आहे.

“कुदरत करके [हे सर्व निसर्गामुळे आहे],” बलजिंदर म्हणतात.

Left: Baldev Kaur picking her way through the rubble of her ancestral home.
PHOTO • Sanskriti Talwar
Right: The family shifted all their belongings to the room that did not get destroyed by the untimely rains in March 2023
PHOTO • Sanskriti Talwar

डावीकडे: बलदेव कौर आपल्या वडिलोपार्जित घराच्या ढिगाऱ्यातून मार्ग काढत आहे. उजवीकडे: मार्च २०२३ मध्ये अवकाळी पावसातून ज्या खोल्या वाचल्या, त्यात कुटुंबाने आपलं सर्व सामान हलवलं आहे

Left: Farmland in Bhaliana village, destroyed by the changing climate.
PHOTO • Sanskriti Talwar
Right: Gurbakt Singh is an activist of the Bhartiya Kisan Union (Ekta-Ugrahan). At his home in Bhaliana
PHOTO • Sanskriti Talwar

डावीकडे: बदलत्या हवामानामुळे नष्ट झालेल्या भालियाना गावातील शेतजमिनी. उजवीकडे: भारतीय किसान युनियन (एकता-उग्राहां) चे कार्यकर्ते गुरभक्त सिंह, भालियाना येथील त्यांच्या राहत्या घरी

असंभाव्य हवामान शेतकऱ्यांसाठी भीतीचं कारण होतं, असं भलैयाना गावातील भारतीय किसान युनियन (एकता-उग्राहां) चे कार्यकर्ते, ६४ वर्षीय गुरभक्त सिंह म्हणाले. “सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हे घडतंय. जर सरकारने इतर पिकांसाठी भाव निश्चित केले, तर आम्ही भातासारख्या पाणखाऊ पिकाऐवजी इतरही पिकं घेऊ,” ते म्हणाले.

शेतकरी संघटनांची एक महासंघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) सुनिश्चित करणारा कायदा समाविष्ट आहे. पंजाबमधील शेतकरी संघटनांनी अशा कायद्यासाठी दबाव आणण्यासाठी मार्च २०२३ मध्ये दिल्लीत निदर्शन केलं होतं.

गुरभक्त यांचा धाकटा मुलगा लखविंदर सिंह म्हणाला की त्यांच्या तुरीच्या पिकासह, गव्हाच्या काडाची वैरणही खराब झाली. गुरभक्त सिंह यांच्या कुटुंबाला ६ ते ७ लाख रुपयाचं नुकसान झालंय. त्यांनीही एका अढतियाकडून दर हंगामात रु. १०० वर रु. १.५ प्रमाणे व्याजावर रु. ७ लाखांचं कर्ज घेतलंय. याआधी त्यांनी कुटुंबाची जमीन गहाण ठेवून बँकेकडून ९ टक्के व्याजदराने १२ लाख रुपयांचं कर्ज घेतलं.

रब्बी पिकाच्या उत्पन्नातून काही थकबाकी भरण्याची त्यांना आशा होती, पण आता ते अशक्य होतं.  “गारा पेंडू बेरच्या [बोर] आकाराच्या होत्या,” गुरभक्त म्हणाले.

*****

पारीने एप्रिल २०२३ मध्ये बुट्टर बखुआ गावातील २८ वर्षीय बूटा सिंहला भेट दिली, तेव्हा तो अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या गंभीर निद्रानाशाचा कसाबसा सामना करत होता.

तो श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील गिद्दरबाहा ब्लॉकमधील शेतकरी असून, त्याच्याकडे कुटुंबाच्या मालकीची सात एकर जमीन आहे आणि गव्हाची लागवड करण्यासाठी त्याने आणखी ३८ एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली आहे. गावातील किमान २०० एकर सखल शेतजमिनीसह त्याची एकूण ४५ एकर जमीन पाण्याखाली गेली होती. बुटा सिंहने एका अढतियाकडून रु. १०० वर रु. १.५ या व्याजदराने एकूण १८ लाखांचं कर्ज घेतलं होतं.

Left: Adding to his seven acres of family-owned farmland, Boota Singh, had taken another 38 acres on lease to cultivate wheat. All 45 acres were inundated, along with at least 200 acres of low-lying farmland in the village.
PHOTO • Sanskriti Talwar
Right: Dried wheat fields being harvested using a harvester machine in Buttar Bakhua village. The rent for the mechanical harvester is Rs. 1,300 per acre for erect crop and Rs. 2,000 per acre if the crop is bent over
PHOTO • Sanskriti Talwar

डावीकडे: आपल्या कुटुंबाच्या मालकीच्या सात एकर शेतजमिनीसह बूटा सिंहने गव्हाची लागवड करण्यासाठी आणखी ३८ एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली होती. गावातील किमान २०० एकर सखल शेतजमिनीसह त्याची एकूण ४५ एकर जमीन पाण्याखाली गेली. उजवीकडे: बुट्टर बखुआ गावात वाळलेल्या गव्हाच्या शेतात हार्वेस्टर मशीन वापरून कापणी केली जातेय. मेकॅनिकल हार्वेस्टरचं भाडं ताठ पिकासाठी रु. १, ३०० प्रति एकर, तर झुकलेल्या पिकासाठी रु. २, ००० प्रति एकर एवढं आहे

त्याचे आईवडील, पत्नी आणि दोन मुलं, असं हे सहा जणांचं कुटुंब आपल्या शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे.

“आम्हाला वाटलं होतं की दररोज गरमी वाढत असल्यामुळे शेत कोरडं पडेल आणि आम्ही पिकं काढू शकू,” तो म्हणाला. मेकॅनिकल हार्वेस्टर ओलसर शेतात चालवता येत नाही. मात्र, शेत कोरडं पडेस्तोवर बरेचसं पीक वाया गेलं होतं.

सपाट झालेलं पीक काढणं अधिक महाग देखील आहे - मेकॅनिकल हार्वेस्टरचं भाडं ताठ पिकासाठी रु. १,३०० प्रति एकर, तर झुकलेल्या पिकासाठी रु. २,००० प्रति एकर एवढं आहे.

या ताणतणावामुळे बुटाला रात्री झोप लागत नव्हती. १७ एप्रिल रोजी तो गिद्दरबाहा येथील एका डॉक्टरकडे गेला ज्यांनी त्याला उच्च रक्तदाब (हाय बीपी) असल्याचं सांगितलं आणि त्याला औषधं लिहून दिली.

‘टेंशन’ आणि ‘डिप्रेशन’ हे शब्द या प्रदेशातील शेतकऱ्यांच्या बोलण्यात वारंवार येत होते.

“डिप्रेशन ता पेंदा ही है. अपसेट वाला काम हुंडा है [उदासीनता येणारच ना, निराश झाल्यासारखं होतं],” बुत्तर बखुआ गावातील ४० वर्षीय गुरपाल सिंह आपल्या सहा एकर शेतातून पावसाचे पाणी उपसताना म्हणाले. शेतीच्या दर सहा महिन्यांच्या हंगामाशेवटी त्यांनी काहीच बचत केली नाही, तर त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणं स्वाभाविक आहे, असं गुरपाल म्हणाले.

Left: Gurpal Singh, 40, of Buttar Bakhua village pumping out water from his farmland.
PHOTO • Sanskriti Talwar
Right: The water pump used on the Gurpal’s farmland
PHOTO • Sanskriti Talwar

डावीकडे: बुट्टर बखुआ गावातील ४० वर्षीय गुरपाल सिंग त्यांच्या शेतातील पाणी उपसत आहेत.  उजवीकडे: गुरपाल यांच्या शेतजमिनीवर वापरलेला पाण्याचा पंप

किरणजीत कौर, २७, हिने पंजाबमधील शेतकरी आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना आधार देणारी किसान मजदूर खुदकुशी पीडीत परिवार समिती नावाची संस्था स्थापन केली आहे. ती म्हणाली की, नैराश्य अनुभवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढतेय. “पीक वाया गेलं तर ५ एकरपेक्षा जास्त जमीन नसलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे पूर्णतः नुकसान आहे. अशा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी घेतलेल्या कर्जाचं व्याज भरावं लागत असल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढल्याचं दिसून येतं.” किरणजीत म्हणाली की, शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना मादक द्रव्यांचं सेवन किंवा टोकाचं पाऊल उचलण्यास प्रवृत्त होण्यापासून थांबवण्यासाठी त्यांच्या मानसिक आरोग्याला आधाराची गरज आहे.

काही शेतकऱ्यांनी मागील कापणीच्या हंगामातही हवामानातील अनियमितता अनुभवली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भाताची कापणी मोठ्या कष्टाने झाली, असं बुटा याने सांगितलं.  मागील रब्बी हंगाम खूप उष्ण होता, ज्यामुळे गव्हाचं धान्य कमी निघालं होतं.

चालू हंगामासाठी तो म्हणतो, “वध्दी दी आस घट है [पीक कापण्याची आशा कमी आहे]. आम्ही येत्या काही दिवसांत कापणीची व्यवस्था केली, तरी तोपर्यंत धान्य काळं पडेल, जे कोणीही खरेदी करणार नाही.”

पंजाब कृषी विद्यापीठातील प्रमुख शास्त्रज्ञ (कृषी हवामानशास्त्र) डॉ. प्रभज्योत कौर सिद्धू यांनी सांगितलं की, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये सामान्य किंवा त्याहून कमी तापमान हे गव्हाच्या वाढीसाठी पूरक मानण्यात येतं.

२०२२ च्या रब्बी हंगामात या महिन्यांत उच्च तापमानामुळे गव्हाचे उत्पादन कमी झालं, तर मार्च आणि एप्रिल २०२३ मध्ये ताशी ३० ते ४० किमी या वेगाने वाऱ्यांसह पडलेल्या पावसामुळे उत्पादकता पुन्हा कमी झाली. “जेव्हा जोरदार वाऱ्यासह पाऊस पडतो, तेव्हा गव्हाची रोपं खाली पडतात, या प्रक्रियेला लॉजिंग म्हणतात. वाढत्या तापमानासह रोप पुन्हा उभं राहतं, पण एप्रिलमध्ये तसे होऊ शकलं नाही,” डॉ. सिद्धू म्हणाल्या.  “म्हणूनच धान्याची वाढ होऊ शकली नाही आणि एप्रिलमध्ये कापणीही होऊ शकली नाही. त्यामुळे पुन्हा गव्हाची उत्पादकता कमी झाली.  पंजाबमधील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्याशिवाय पाऊस पडला, तिथे उत्पादकता चांगली आहे.”

डॉ. सिद्धू यांच्या म्हणण्यानुसार मार्चच्या उत्तरार्धात झालेला अवकाळी पाऊस हा तीव्र हवामानाचा प्रसंगच म्हणायला हवा.

Damage caused in the farmlands of Buttar Bakhua. The wheat crops were flattened due to heavy winds and rainfall, and the water remained stagnant in the field for months
PHOTO • Sanskriti Talwar
Damage caused in the farmlands of Buttar Bakhua. The wheat crops were flattened due to heavy winds and rainfall, and the water remained stagnant in the field for months
PHOTO • Sanskriti Talwar

बुट्टर बखुआ येथील शेतजमिनींचं झालेलं नुकसान. वारा आणि मुसळधार पावसामुळे गहू भुईसपाट झाला असून अनेक महिने शेतात पाणी साचलं होतं

मे महिन्यापर्यंत, बूटाने अपेक्षित २०-२५ क्विंटलच्या तुलनेत २० मण (किंवा ७.४ क्विंटल) प्रति एकर गव्हाची कापणी केली. गुरभक्त सिंह यांचे उत्पादन २० मण ते ४० मण प्रति एकर दरम्यान, तर बलजिंदर सिंह यांचं उत्पादन २५ ते २८ मण प्रति एकर होतं.

धान्याच्या गुणवत्तेनुसार बूटाला रु. १,४०० प्रति क्विंटल ते रु. २,००० प्रति क्विंटल भाव मिळाला. मात्र, भारतीय अन्न महामंडळानुसार २०२३ मध्ये गव्हासाठी २१२५ रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव निश्चित केला होता.  गुरभक्त आणि बलजिंदर यांनी त्यांचा गहू एमएसपीच्या भावाने विकला.

पावसामुळे पिकाच्या नुकसानीनंतर ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या 'व्हॅल्यू कट' चा परिणाम होता. वाळलेल्या आणि तुटलेल्या धान्याच्या एमएसपीवर ५.३१ ते रु. ३१.८७ प्रति क्विंटल प्रमाणे कपात करण्यात आली होती. याशिवाय, चमक गमावलेल्या धान्याच्या एमएसपीवर रु. ५.३१ प्रति क्विंटल कपात करण्यात आली.

पंजाब सरकारने किमान ७५% पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर १५,०००, तर ३३% ते ७५% पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रु. ६,८०० प्रति एकर भरपाई जाहीर केली.

बूटाला सरकारकडून रु. २ लाख नुकसान भरपाई मिळाली.  “ही एक संथ प्रक्रिया आहे.  मला अजून पूर्ण भरपाई मिळणं बाकी आहे,” तो म्हणाला.  त्याला रु. ७ लाख कर्जाची परतफेड करण्यासाठी पूर्ण रक्कम मिळायला हवी, असं त्याचं म्हणणं आहे. गुरभक्त आणि बलजिंदर यांना अद्याप कोणतीही भरपाई मिळालेली नाही.

Left: Baldev Singh owns 15 acres of land.
PHOTO • Sanskriti Talwar
Right: After the long spell of excess water, his fields with wheat turned black and brown with fungus and rotted. Ploughing it would release a stench that would make people fall sick, he said.
PHOTO • Sanskriti Talwar

डावीकडे: बलदेव सिंह यांच्याकडे १५ एकर जमीन आहे.  उजवीकडे: जास्त पाणी गेल्यानंतर त्यांच्या गव्हाच्या शेताला बुरशी लागून ते काळं, तपकिरी झालं आणि कुजलं. त्यावर नांगरणी केली तर दुर्गंध पसरून लोक आजारी पडतील, असं ते म्हणाले.

बुट्टर बखुआ गावातील १५ एकर जमिनीचे मालक बलदेव सिंह, ६४, यांनीही रु. ९ एकर जमीन भाडेतत्वावर देण्यासाठी एका अढतियाकडून ५ लाखाचं कर्ज घेतलं. त्यांनी दररोज १५ लिटर डिझेल जाळलं आणि शेतातून जवळपास महिनाभर पाणी उपसलं.

प्रदीर्घ पूरस्थितीनंतर, बलदेव सिंह यांचं गव्हाचं शेत सडलेल्या पिकाला बुरशी लागून काळं, तपकिरी झालं होतं. त्यावर नांगरणी केली तर दुर्गंध पसरून लोक आजारी पडतील, असे ते म्हणाले.

“मातम वरगा माहौल सी [घरी मरण झाल्यासारखं वातावरण आहे],” बलदेव आपल्या १० जणांच्या कुटुंबाविषयी म्हणाले. नवीन वर्षाच्या सुरुवातीला होणारा बैसाखीचा सण थाटामाटाशिवाय पार पडला.

बलदेव यांना पिकाचं नुकसान स्वतःच उखडल्यासारखे वाटले.  “मी अशा हालतीत जमीन सोडू शकत नव्हतो,” ते म्हणाले.  "आमच्या मुलांना शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकऱ्या मिळतातच असं नाही."  या परिस्थितीमुळे शेतकरी आपला जीव घेण्यास किंवा देश सोडून जाण्यास प्रवृत्त होतात, असं ते म्हणाले.

सध्या, बलदेव सिंह यांनी आपल्या नातेवाईक शेतकऱ्यांकडे मदत मागितली आहे. त्यांनी आपल्या जनावरांना चारण्यासाठी त्यांच्याकडून तुरी, तसंच आपल्या कुटुंबासाठी धान्यही घेतलंय.

"आम्ही नावाचेच जमीनदार आहोत," ते म्हणतात.

Sanskriti Talwar

Sanskriti Talwar is an independent journalist based in New Delhi, and a PARI MMF Fellow for 2023.

Other stories by Sanskriti Talwar
Editor : Kavitha Iyer

Kavitha Iyer has been a journalist for 20 years. She is the author of ‘Landscapes Of Loss: The Story Of An Indian Drought’ (HarperCollins, 2021).

Other stories by Kavitha Iyer
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo