“उन्हाने माझी पाठ भाजून निघालीये,” बजरंग गोस्वामी सांगतात. गजुवास गावाबाहेरच्या खजुरांच्या झाडांच्या सावलीच्या तुकड्यात गोस्वामी जमिनीवर बसले होते. “उष्मा वाढलाय, पीक कमी झालंय,” बाजरीच्या राशींवर नजर फिरवत ते सांगतात. जवळच वाळलेलं गवत खात एक उंट उभा आहे. राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातल्या तारानगर तहसिलातल्या आपल्या २२ बिगा जमिनीवर गोस्वामी आणि त्यांची पत्नी राज कौर खंडाने शेती करतात.

“माथ्यावर सूर्याची तलखी आणि पायाला वाळूचा चटका,” तारानगरच्या दक्षिणेला असलेल्या सुजनगढ तहसिलातल्या गीता देवी नायक म्हणतात. गीता देवी विधवा आहेत आणि भूमीहीन आहेत. त्या भगवानी देवी चौधरींच्या शेतात मजुरी करतात. पाच वाजत आलेत, गुडवारी गावात या दोघांचं काम नुकतंच संपलंय. “गरमी ही गरमी पडे है आज कल,” भगवानी देवी म्हणतात.

राजस्थानच्या उत्तरेकडच्या चुरु जिल्ह्यात, उन्हाळ्यात वाळवंट तापतं आणि मे-जून महिन्यातलं वारं म्हणजे भट्टीत असल्यासारखं वाटतं. आणि मग उकाडा – तोही कसा जास्तच तीव्र होत चाललाय – याच्या गप्पा सगळीकडे सुरू होतात. या महिन्यांमध्ये तापमान ४० अंशाच्या अगदी सहज जात असतं. गेल्याच महिन्यात, मे २०२० मध्ये पारा ५० अंशावर गेला होता – आणि काही बातम्यांनुसार हे २६ मे रोजी इथलं तापमान जगात सगळ्यात जास्त होतं.

त्यामुळे गेल्या वर्षी, जूनच्या सुरुवातीला, चुरुमध्ये जेव्हा पारा ५१ अंशाच्या पुढे गेला – पाण्याच्या उत्कलन बिंदूच्या जवळ जवळ निम्मा – अनेकांसाठी ती फारशी काही महत्त्वाची घटना नव्हती. “मला आठवतंय, ३० वर्षांपूर्वी देखील पारा ५० अंशापुढे गेला होता,” ७५ वर्षांचे हरदयाल सिंग म्हणतात. जमीनदार असणारे आणि शाळेतून निवृत्त झालेले सिंग गजुवास गावातल्या आपल्या हवेलीत खाटेवर पहुडले होते.

आणि काही वर्षं अशी की सहाच महिन्यांनंतर, चुरुमध्ये तापमान शून्याच्या खाली गेलं. आणि फेब्रुवारी २०२० मध्ये भारतीय वेधशाळेच्या निरीक्षणांनुसार भारतातील पठारी प्रदेशांमध्ये सर्वात कमी तापमान चुरु इथेच होतं, ४.१ अंश सेल्सियस.

Geeta Devi and Bhagwani Devi of of Sujangarh tehsil, Churu: ' Garmi hee garmi pade aaj kal' ('It’s heat and more heat nowadays')
PHOTO • Sharmila Joshi

चुरुच्या सुजनगढ तहसिलातील गीता देवी आणि भगवानी देवीः ‘गरमी ही गरमी पडे है आज कल’

इथल्या तापमानात हे इतके चढउतार होतात – १ अंश ते ५१ अंश सेल्सियस – पण या जिल्ह्यात लोकांच्या बोलण्यात जास्त येतो तो मात्र चढता पारा. अगदी जून २०१९ किंवा गेल्या महिन्यातला ५० अंशाला टेकलेला पारा नाही तर लांबत चाललेला उन्हाळा जो इतर ऋतूंवर अतिक्रमण करायला लागला आहे.

“पूर्वी हा [भाजून काढणारा उष्मा] एखाद-दुसरा दिवस टिकायचा,” प्रा. एच. आर. इसरान सांगतात. चुरेचे रहिवासी आणि जवळच्याच सिकर जिल्ह्यातल्या एस. के. गव्हर्नमेंटल कॉलेजचे माजी प्राचार्य अनेकांसाठी आजही मार्गदर्शक आहेत. “आता मात्र अनेक दिवस असा उष्मा असतो. उन्हाळाच लांबतच चाललाय.”

जून २०१९ मध्ये अमृता चौधरी म्हणाल्या होत्या, “भरदुपारी आम्हाला रस्त्यावरून चालता येत नव्हतं, चपला डांबरी रस्त्यावर चिकटत होत्या.” सुजनगढमध्ये बांधणीच्या कपड्यांचं उत्पादन करणारी दिशा शेखावती  ही संस्था त्या चालवतात. इतरांप्रमाणेच त्यांनाही जास्त चिंता आहे ती लांबत चाललेल्या उन्हाळ्याची. “या उष्ण प्रदेशातही उष्णता वाढलीये आणि लवकर सुरू व्हायला लागलीये.”

“उन्हाळा चांगला दीडेक महिन्यानी लांबलाय,” गुडवारी गावच्या भगवानी देवी सांगतात. त्यांच्याप्रमाणेच चुरूतले अनेक गावकरी ऋतू बदलत असल्याचं सांगतात – उन्हाळा इतका पसरत चाललाय की हिवाळ्याचे काही महिने तो खाऊन टाकायला लागलाय आणि मधले पावसाळ्याचे महिने जणू काही त्यांनी चेपून टाकलेत – त्यांच्या मते १२ महिन्यांचं चक्र सगळं उलटपुलट झालंय.

केवळ ५१ अंशापर्यंत पारा गेला तो आठवडा किंवा गेल्या आठवड्यातले ५० अंश तापमानाचे काही दिवसच नाही तर  वातावरणातल्या एकूण बदलांमुळे लोक चिंतित आहेत.

*****

२०१९ मध्ये चुरुमध्ये १ जून ते ३० सप्टेंबर या काळात ३६९ मिमि पाऊस झाला. पावसाळ्यात इथे सरासरी ३१४ मिमि पाऊस पडतो त्याहून हा किंचित जास्त होता. राजस्थान भारतातलं सर्वात मोठं, देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी १०.४ टक्के भूमी असणारं आणि शुष्क हवामान असणारं राज्य आहे. या शुष्क आणि निम-शुष्क प्रदेशात अधिकृत आकडेवारीप्रमाणे पावसाची वर्षाची सरासरी ५७४ मिमि इतकी आहे.

In the fields that Bajrang Goswami and his wife Raj Kaur cultivate as sharecroppers outside Gajuvas village in Taranagar tehsil
PHOTO • Sharmila Joshi
In the fields that Bajrang Goswami and his wife Raj Kaur cultivate as sharecroppers outside Gajuvas village in Taranagar tehsil
PHOTO • Sharmila Joshi
In the fields that Bajrang Goswami and his wife Raj Kaur cultivate as sharecroppers outside Gajuvas village in Taranagar tehsil
PHOTO • Sharmila Joshi

तारानगर तहसिलातल्या गजुवास गावाबाहेरचं हे शेत बजरंग गोस्वामी आणि त्यांच्या पत्नी राज कौर खंडाने कसतात

राजस्थानच्या ग्रामीण भागातल्या सुमारे ७ कोटी जनतेपैकी अंदाजे ७५ टक्के लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे. चुरु जिल्ह्याच्या २.५ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे ७२ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात – आणि इथे शेती प्रामुख्याने कोरडवाहू आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये अनेकांनी पावसावरचं हे अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. “१९९० च्या दशकापासून इथे बोअरवेल [५००-६०० फूट खोल] पाडण्याचा प्रयत्न झाला आहे, पण इथल्या [भूजलाच्या] क्षारतेमुळे त्याला फारसं काही यश आलेलं नाही,” प्रा. इसरन सांगतात. जिल्ह्याच्या सहा तहसिलांमधल्या ८९९ गावातल्या शेतकऱ्यांनी “काही काळ [बोअरवेलच्या पाण्यावर] भुईमुगासारखं दुसरं पीक घेण्याचा प्रयत्न केला. पण मग जमीन खूपच लवकर शुष्क व्हायला लागली आणि काही गावं सोडता, बहुतेक बोअरवेल कोरड्या पडल्या.”

राजस्थानच्या पिकाखालच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे ३८ टक्के (किंवा ६२,९४,००० हेक्टर) क्षेत्र सिंचनाखाली आहे असं राजस्थान स्टेट ॲक्शनप्लॅन फॉर क्लायमेट चेंजच्या २०१० च्या मसुद्यात म्हटलं आहे. चुरुमध्ये हे प्रमाण केवळ ८ टक्के इतकं आहे. इथल्या चौधरी कुंभारम उपसा योजनेचं काम अजूनही सुरू आहे आणि काही गावांना आणि शेतांना या योजनेतून पाणी मिळत असलं तरी चुरूची शेती आणि इथली खरिपाची प्रमुख चार पिकं – बाजरी, मूग, मटकी आणि गवार – अजूनही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत.

गेल्या वीस वर्षांत पाऊसमानही बदललं आहे. चुरुतले लोक दोन महत्त्वाच्या बदलांबद्दल बोलतातः पावसाळ्याचे महिने बदलले आहेत आणि पाऊस नेमाने न पडता अधून मधून पडतो. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक.

म्हाताऱ्या शेतकऱ्यांना गतकाळातला मुसळधार पाऊस आजही आठवतो. “आषाढात [जून-जुलै] विजा चमकायला लागल्या की कळायचं, पाऊस येणारे. मग आम्ही खोपीत यायच्या आधी शेतातच रोट्या करायला घ्यायचो,” ५९ वर्षांचे गोवर्धन सहारन सांगतात. जाट समाजाच्या सहारन यांच्या संयुक्त कुटुंबाची गजुवास गावात १८० बिघा (सुमारे १२० एकर) जमीन आहे. चुरुमध्ये जाट आणि चौधरी समाजाचे शेतकरी बाहुल्याने आहेत. “आता विजा चमकतात, पण तितकंच – पाऊस येतच नाही,” सहारन सांगतात.

Bajrang Goswami and Raj Kaur (left) say their 'back has burnt with the heat', while older farmers like Govardhan Saharan (right) speak of the first rains of a different past
PHOTO • Sharmila Joshi
Bajrang Goswami and Raj Kaur (left) say their 'back has burnt with the heat', while older farmers like Govardhan Saharan (right) speak of the first rains of a different past
PHOTO • Sharmila Joshi

बजरंग गोस्मावी आणि राज कौर (डावीकडे) म्हणतात की त्यांची ‘पाठ गरमीने भाजून निघालीये’, तर गोवर्धन सहारन यांच्यासारखे म्हातारे शेतकरी (उजवीकडे) गतकाळातल्या पहिल्या पावसाच्या आठवणी सांगतात

“मी शाळेत होतो, उत्तरेकडे काळे ढग दिसू लागले की आम्ही म्हणायचो, पाऊस येणार – आणि अर्ध्या तासाच्या आत थेंब पडायला लागायचे,” शेजारच्याच सिकर जिल्ह्यातल्या सादिनसार गावचे ८० वर्षीय नारायण प्रसाद सांगतात. शेतातल्या खाटेवर पहुडलेले प्रसाद म्हणतात, “आता, ढग आले तरी निघून जातात.” प्रसाद यांनी त्यांच्या १३ बिघा (सुमारे ८ एकर) शेतात मोठी काँक्रीटची टाकी बांधलीये, पावसाचं पाणी साठवण्यासाठी. (मी २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यांना भेटले तेव्हा ती टाकी रिकामी होती.)

आता, जूनच्या अखेरीस जो पहिला पाऊस यायचा, ज्यावर बाजऱ्या पेरल्या जायच्या, तो काही आठवडे उशीरा सुरू होतो आणि लवकरच संपून जातो. शेतकऱ्यांच्या मते ऑगस्टच्या शेवटापर्यंत पावसाळा संपतो.

या सगळ्यामुळे पेरण्या आणि बाकी वेळापत्रक बिघडून गेलंय. “माझ्या आजोबांच्या काळात त्यांना वारे, तारे आणि पक्ष्यांची गाणी सगळं समजायचं – आणि त्याच्या आधारावर ते काय कसं पेरायचं याचे निर्णय घ्यायचे,” अमृता चौधरी सांगते.

“आता ती सगळी व्यवस्थाच कोलमडून पडलीये,” लेखक आणि शेतकरी असलेले दुलाराम सहारन थोडक्यात या सगळ्याचं सार सांगतात. तारानगर तालुक्यातल्या भारंग गावात सहारयन यांच्या संयुक्त कुटुंबाची २०० बिघा शेती आहे.

एकीकडे मोसमी पाऊस उशीरा येऊन लवकर जातोय, आणि वर्षाची सरासरी बऱ्यापैकी स्थिर असली तरी पावसाचा जोर मात्र कमी झालाय. “पावसाचा जोर कमी झालाय,” गजुवासमध्ये १२ बिघा शेती असणारे धरमपाल सहारन सांगतात. “येतो, नाही येतो, कुणाला काही कळत नाही.” त्यात पाऊस सर्वदूर सारखाही पडत नाही. “शेतातही एकाच तुकड्यात बरसतो, दुसरीकडे नाही,” अमृता सांगते.

Left: Dharampal Saharan of Gajuvas village says, 'I am not sowing chana because there is no rain after September'. Right: Farmers in Sadinsar village speak of the changing weather – Raghubir Bagadiya (also a retired army captain), Narain Prasad (former high school lecturer) and Shishupal Narsara (retired school principal)
PHOTO • Sharmila Joshi
Left: Dharampal Saharan of Gajuvas village says, 'I am not sowing chana because there is no rain after September'. Right: Farmers in Sadinsar village speak of the changing weather – Raghubir Bagadiya (also a retired army captain), Narain Prasad (former high school lecturer) and Shishupal Narsara (retired school principal)
PHOTO • Sharmila Joshi

डावीकडेः गजुवास गावचे धरमपाल सहारन म्हणतात, ‘सप्टेंबरनंतर पाऊसच नाही, त्यामुळे मी हरभरा पेरणार नाहीये’. उजवीकडेः सादिनसार गावचे शेतकरी बदलत्या हवामानाबद्दल बोलतायत – रघुबीर बगाडिया (सैन्यदलातले निवृत्त कॅप्टन), नारायण प्रसाद (माध्यमिक शाळेचे माजी शिक्षक) आणि शिसुपाल नरसारा (शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक)

राजस्थानच्या मसुद्यात १९५१ ते २००७ दरम्यानच्या अतिवृष्टीच्या घटनांचीही नोंद आहे. पण विविध अभ्यासांच्या आधारे यामध्ये म्हटलंय की राज्यात पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, “आणि वातावरणातील बदलांमुळे बाष्पीभवन वाढणार आहे.”

चुरुचे शेतकरी आजवर ऑक्टोबरमध्ये येणारा परतीचा पाऊस आणि जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पडणाऱ्या काही सरींवरही अवलंबून राहिले आहेत. कारण भुईमूग आणि जवासारख्या रब्बीच्या पिकांना याचं पावसाचं जीवदान मिळायचं. या सरी – “युरोप आणि अमेरिकेच्या मधल्या समुद्रावरून येणारा, सीमेपलिकडे पाकिस्तानावर बरसणारा वादळी पाऊस,” हरदयालजी सांगतात – जवळ जवळ गायबच झालाय.

हा पाऊस हरभऱ्यासाठी पण गरजेचा होता – तारानगर भारतचा ‘चना का कटोरा’ हरभऱ्याचं आगार म्हणून ओळखला जायचा आणि इथल्या शेतकऱ्यांसाठी ही गर्वाची बाब होती, दुलाराम सांगतात. “इतकं चांगलं पीक यायचं की आम्ही अंगणात राशी रचून ठेवायचो.” आता मात्र हे आगार रिक्त आहे. “साधारणपणे २००७ नंतर, मी रहभरा पेरला नाहीये, सप्टेंबरमध्ये पाऊसच नाही,” धरमपाल सांगतात.

नोव्हेंबरमध्ये पारा उतरायला लागला की हरभरा चांगला उगवून यायचा. पण अनेक वर्षांपासून हिवाळाही पूर्वीसारखा राहिलेला नाही.

*****

राजस्थानच्या मसुद्यात म्हटल्याप्रमाणे जम्मू काश्मीरनंतर भारतात सगळ्यात जास्त शीतलहरी राजस्थानातच आल्या आहेत – १९०१ ते १९९९ या शतकामध्ये १९५ (१९९९ नंतरची आकडेवारी यात नाही). त्यात नमूद केलं आहे की राजस्थानामध्ये सर्वोच्च तापमान वाढत असल्याचं दिसत असतानाच तापमान कमी होत चालल्याचंही दिसून येतंय. उदा. २०२० च्या फेब्रुवारीमध्ये भारतातलं सर्वात कमी तापमान चुरुमध्ये ४.१ अंश सेल्सियस इतकं होतं.

तरीही, चुरुच्या अनेकांसाठी हिवाळा पूर्वीसारखा राहिलेला नाही. “मी लहान होतो ना (सुमारे ५० वर्षांपूर्वी) तेव्हा नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच रजया बाहेर निघायच्या... पहाटे चार वाजता शेतात येताना मी गोधडी गुंडाळूनच यायचो,” गजुवासचे गोवर्धन सांगतात. खजुराच्या झाडांच्या सावलीत, आपल्या बाजऱ्या निघालेल्या रानात बसून ते म्हणतात, “आता, मी बनियन घालून बसलोय. वर्षातला ११ वा महिना आला तरी गरम होतंय.”

Prof. Isran (left) of Churu town says: 'The entire summer has expanded'. Amrita Choudhary (right) of the Disha Shekhawati organisation in Sujangarh says, 'Even in this hot region, the heat is increasing'
PHOTO • Sharmila Joshi
Prof. Isran (left) of Churu town says: 'The entire summer has expanded'. Amrita Choudhary (right) of the Disha Shekhawati organisation in Sujangarh says, 'Even in this hot region, the heat is increasing'
PHOTO • Sharmila Joshi

चुरुचे प्रा. इसरन (डावीकडे) सांगतातः ‘पूर्ण उन्हाळा लांबत चाललाय.’ सुजनगढच्या दिशा शेखावती संस्थेच्या अमृता चौधरी (उजवीकडे) म्हणतात, ‘उष्ण पट्ट्यातही गरमी वाढायला लागलीये’

“पूर्वी, आमच्या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे कार्यक्रम साजरे केले जायचे तेव्हा मार्च महिन्यात देखील आम्हाला स्वेटर लागायचे,” अमृता चौधरी सांगतात. “आणि आता पंखे लावावे लागतायत. पण हेही वर्षानुवर्षं बेभरवशाचं व्हायला लागलंय.”

सुजनगढ शहरात अंगणवाडी सेविका असणाऱ्या सुशीला पुरोहित ३-५ वयोगटातल्या मुलांकडे निर्देश करत म्हणतात, “हिवाळ्याचे कपडे घातलेत त्यांनी. पण नोव्हेंबर आला तरी अजून हवा गरमच आहे. आता त्यांना काय कपडे घालून पाठवायला सांगायचं, तेच आम्हाला समजेनासं झालंय.”

चुरुमध्ये सुप्रसिद्ध स्तंभलेखक ८३ वर्षीय माधव शर्मा सार सांगतातः “कंबल और कोट का जमाना चला गया.”

*****

पसरत चाललेल्या या उन्हाळ्याने कंबल-कोटचे दिवस खाऊन टाकलेत. “पूर्वी आमच्याकडे चार भिन्न ऋतू होते,” माधवजी जोड देतात. “आणि आता एकच मुख्य मौसम आहे – आठ महिन्यांचा उन्हाळा. आणि हा बदल फार दूरगामी आहे.”

“पूर्वी, अगदी मार्च महिन्यात देखील हवा गार असायची,” तारानगरमधले शेतकरी कार्यकर्ते निर्मल प्रजापती सांगतात. “आणि आता तर फेब्रुवारी संपता संपताच उकाड्याला सुरुवात होते. आणि हा उकाडा अगदी ऑक्टोबर किंवा त्याच्याही पलिकडे जातो जो खरं तर ऑगस्टच्या शेवटापर्यंत संपायला हवा.”

या वाढत्या उन्हाळ्याशी जुळवून घेण्यासाठी चुरुमध्ये सगळीकडेच शेतातले कामाचे तास बदलले आहेत – शेतकरी आणि मजूर उष्म्यापासून वाचण्यासाठी शक्यतो जर गार हवेत, पहाटे आणि संध्याकाळी शेतातली कामं करतायत.

शिवाय, हा वाढता उन्हाळा कमी व्हायचं नाव घेत नाही. काही जण सांगतात, की असा एक काळ होता जेव्हा जवळ जवळ जर आठवड्यात गावातून आंधी (रेतीचं वादळ) यायची आणि सगळीकडे रेती पसरून जायची. रेल्वेच्या रुळांवर रेती जमा व्हायची आणि वाळूचे पर्वत इथून तिथे सरकायचे. एखादा शेतकरी अंगणात झोपला असेल तर तोही रेतीच्या ढिगात लपून जायचा. “पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे वादळं यायची,” निवृत्त शालेय शिक्षक हरदयालजी सांगतात. “आमच्या पांघरुणातही रेती भरायची. आता तसली वादळं इथे येत नाहीत.”

Left: The Chakravat drizzles have mostly disappeared, says Hardayalji Singh, retired teacher and landowner. Centre: Sushila Purohit, anganwadi worker in Sujangarh, says 'It is still hot in November. Right: Nirmal Prajapati, farm activist in Taranagar, says work hours have altered to adapt to the magnifying summer
PHOTO • Sharmila Joshi
Left: The Chakravat drizzles have mostly disappeared, says Hardayalji Singh, retired teacher and landowner. Centre: Sushila Purohit, anganwadi worker in Sujangarh, says 'It is still hot in November. Right: Nirmal Prajapati, farm activist in Taranagar, says work hours have altered to adapt to the magnifying summer
PHOTO • Sharmila Joshi
Left: The Chakravat drizzles have mostly disappeared, says Hardayalji Singh, retired teacher and landowner. Centre: Sushila Purohit, anganwadi worker in Sujangarh, says 'It is still hot in November. Right: Nirmal Prajapati, farm activist in Taranagar, says work hours have altered to adapt to the magnifying summer
PHOTO • Sharmila Joshi

डावीकडेः वादळी सरी आता संपल्यातच जमा आहेत, निवृत्त शालेय शिक्षक आणि जमीनदार असलेले हरदयालजी सिंग सांगतात. मध्यभागीः सुजनगढमध्ये अंगणवाडी सेविका असणाऱ्या सुशीला पुरोहित म्हणतात, ‘नोव्हेंबर उजाडला तरी अजून उकाडा आहे’. उजवीकडेः तारागनगरचे शेतकरी कार्यकर्ते निर्मल प्रजापती सांगतात की वाढत्या उन्हाळ्याशी जुळवून घेण्यासाठी कामाचे तास बदलत चालले आहेत

या वादळांच्या अधेमधे लू – कोरडे, उष्ण आणि जोराचे वारे यायची. मे आणि जून या कडक उन्हाळ्याच्या दिवसात आणि हे वारं तासंतास वाहत असायचं. सुमारे ३० वर्षांपूर्वी आंधी आणि लू या दोन्ही गोष्टी चुरुसाठी नित्याच्या होत्या – या दोन्हीमुळे तापमान खाली यायचं, निर्मल सांगतात. “आणि वादळामुळे बारीक धूळ जमी होऊन जमिनीचा कस वाढायचा.” पण आता उष्णता कोंडली जाते आणि पारा सतत पन्नाशीच्या जवळ राहतो. “२०१९ च्या एप्रिल मध्ये वादळ आलं, ते माझ्या मते ५-७ वर्षांनंतरचं पहिलं वादळ होतं,” ते म्हणतात.

या कोंडलेल्या उष्णतेमुळे उन्हाळा लांबत जातो, आणि जास्त दाहक होतो. “राजस्थानात आम्हाला उन्हाळ्याच्या गरमीची सवय आहे,” तारानगरचे शेतकरी कार्यकर्ते, आणि हरदयालजींचे पुत्र उमराव सिंग सांगतात. “पण पहिल्यांदाच असं होतंय की इथला शेतकरी गरमीला घाबरायला लागलाय.”

*****

२०१९ साली जूनमध्ये राजस्थानात पारा ५० अंशाच्या वर गेला ती काही असं होण्याची पहिली वेळ नव्हती. १९९३ साली जून महिन्यात चुरुचं तापमान ४९.८ उन्हाळ्यात असं जयपूरच्या वेधशाळेची आकडेवारी दाखवते. १९९५ साली मे महिन्यात बारमेरचं तापमान ०.१ अंशाने पुढे गेलं. आणि त्या आधीच १९३४ साली जूनमध्ये गंगानगरमध्ये पारा ५० अंश तर अलवरमध्ये १९९६ साली मे महिन्यात ५०.६ अंशावर गेला होता.

काही बातम्यांनुसार २०१९ साली जूनच्या सुरुवातीला चुरुमध्ये जगातलं सर्वात जास्त तापमान नोंदवलं गेलं असलं तरी जगभरात इतरत्र – अरब अमिरातींमध्येही ५० अंशाहून अधिक तापमानाची नोंद झाली असल्याचं आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या २०१९ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटलं आहे. वर्किंग ऑन अ वार्मर प्लॅनेट या अहवालात असं नोंदवलं आहे की जागतिक तापमान वाढीच्या अनुषंगाने भारतामध्ये २०२५ ते २०८५ या काळात तापमान १.१ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता आहे.

वातावरण बदलविषयक आंतरशासकीय मंचाने (आयपीसीसी) तसंच इतर स्रोतांनुसार पश्चिम राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात (१.९६ कोटी हेक्टर क्षेत्र) २१ व्या शतकाच्या इंतापर्यंत दिवसाचं आणि रात्रीचं तापमान वाढण्याचा आणि पाऊस कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

चुरु शहरातील डॉ. सुनील जंडू म्हणतात की अगदी ज्यांना खूप उष्म्याची सवय आहे त्यांनाही “तापमान ४८ अंशाच्या आसपास गेलं की त्यानंतर एकेक अंशाची वाढ त्रासदायक असते.” ४८ अंश सेल्सियस तापमानाचा माणसाच्या शरीरावर प्रचंड परिणाम होतो – थकवा, शोष, मूतखडा (शोष पडल्याचे दूरगामी परिणाम) आणि उष्माघात. शिवाय मळमळ, चक्कर आणि इतरही परिणाम होतातच. मे-जून महिन्यात तरी अशा काही केसेसमध्ये वाढ झाल्याचं  जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी असणाऱ्या डॉ. जंडू यांच्या निदर्शनास आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. किंवा त्या काळात चुरुमध्ये उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या नसल्याचं ते सांगतात.

आयएलओच्या अहवालातही तीव्र उष्म्याचे परिणाम किती धोकादयक असू शकतात हे नमूद केलं आहे. “वातावरण बदलामुळे जागतिक तापमानात वाढ झाली आहे ज्याचा परिणाम म्हणजे... उन्हाळी लागण्याच्या घटना सर्रास आढळून येतील...कोणत्याही इजेशिवाय शरीराला सहन होईल त्याहून अधिक प्रमाणात उष्णतेशी संपर्क... आणि असा जास्तीच्या संपर्कातून उष्माघात आणि त्यातून कधी कधी मृत्यूही होऊ शकतो.”

Writer-farmer Dularam saharan (left) of Bharang village at the house of well-known veteran columnist Madhavji Sharma, in Churu town: 'Kambal and coat ka jamaana chala gaya'
PHOTO • Sharmila Joshi

भारंग गावचे लेखक-शेतकरी दुलाराम सहारन (डावीकडे) ख्यातनाम वरिष्ठ स्तंभलेखक माधवजी शर्मांच्या घरी, चुरुमध्येः ‘कंबर और कोट का जमाना चला गया’

या अहवालानुसार येत्या काळात ज्या प्रदेशांना सगळ्यात जास्ट फटका बसणार आहे त्यात दक्षिण आशियाचा समावेश आहे. तसंच साधारणपणे वाढत्या उष्म्याचा त्रास जिथे जास्त होईल अशा देशांमध्ये गरिबी, असंघटित क्षेत्रातला रोजगार आणि खाण्यापुरती शेती ही वैशिष्ट्यं जास्त आढळून येत असल्याचं दिसतं.

अर्थात हे सगळे घातक परिणाम काही लगेच आणि सहज दिसून येत नाहीत, जसं की दवाखान्याबाहेर रांगा लागल्या आहेत, इत्यादी.

आयएलओचा अहवाल नमूद करतो की इतर समस्यांच्या सोबतीने हा उष्मादेखील “शेतमजुरांना गाव सोडून जाण्यास भाग पाडणारा घटक” ठरू शकतो. “२००५-२०१५ या दशकात, हा तीव्र उष्मा वाढत्या स्थलांतराशी निगडीत होता – त्या आधीच्या दहा वर्षांच्या काळात असं चित्र नव्हतं. आता स्थलांतराचे निर्णय घेताना घरात वातावरण लोक वातावरण बदलांचाही विचार करतायत असं यावरून म्हणता येऊ शकेल.”

चुरुमध्येही पिकाचा उतारा कमी झाल्याने उत्पन्न कमी झालंय, ज्यासाठी लहरी पाऊसही थोडा फार कारणीभूत आहे. आणि यातून स्थलांतरासाठी कारणीभूत घटकांची एक लांब साखळी असते, त्यातलं हे एक कारण. पूर्वीच्या काळी, दुलाराम सहारन सांगतात, “आमच्या जमिनीतून १०० मण [सुमारे ३७५० किलो] बाजरी निघायची. आता कशी बशी २०-३० मण बाजरी होते. आमच्या भारंग गावात, माझ्या अंदाजाने फक्त ५० टक्के लोक अजूनही शेती करतायत. बाकीचे शेती सोडून कामाच्या शोधात दुसरीकडे गेलेत.”

गजुवास गावातही धरमपाल सहारन म्हणतात की पिकाचा उताराही एकदम कमी झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ते वर्षातले ३-४ महिने जयपूर किंवा गुजरातच्या काही शहरांमध्ये टेम्पो चालक म्हणून कामाला जातात.

प्रा. इसरन देखील सांगतात की पूर्ण चुरुमध्ये शेतीतलं घटतं उत्पन्न भरून काढण्यासाठी अनेक जण आखाती देशात, किंवा कर्नाटक, महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांतल्या शहरांमध्ये कारखान्यांमध्ये काम करायला जात आहेत. (सरकारी धोरणांमुळे जनावरांचा व्यापार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे हेही त्यामागचं कारण आहेच – पण त्याबद्दल पुन्हा कधी तरी.)

आयएलओच्या अहवालानुसार वाढत्या तापमानामुळे पुढच्या १० वर्षंमध्ये जगभरात “८ कोटी पूर्ण वेळ नोकऱ्यांइतकी उत्पादकता कमी होऊ शकते”. म्हणजेच सध्याच्या भाकितांनुसार २१ व्या शतकाच्या अखेरीस जगभरात १.५ अंश सेल्सियस तापमान वाढ झाली तर.

*****

चुरुमध्ये वातावरण का बदलतंय?

पर्यावरणाचं प्रदूषण, प्रा. इसरन सांगतात. माधव शर्माही. ज्यामुळे उष्णता कोंडली जाते आणि हवामानाचं चक्रच बदलून जातं. “जागतिक तापमान वाढ आणि काँक्रीटीकरणामुळे उष्णता वाढलीये. जंगलं कमी झालीयेत, वाहनं वाढलीयेत,” रामस्वरुप सहारन सांगतात. ते तारानगर तहसिलातल्या भालेरी गावचे शेतकरी आणि माजी शाळा मुख्याध्यापक आहेत.

'After around 48 degrees Celsius,” says Dr. Sunil Jandu (left) in Churu town, even to people used to very high heat, 'every rise by a degree matters a lot'. Ramswaroop Saharan of Bhaleri village attributes the growing heat to global warming
PHOTO • Sharmila Joshi
'After around 48 degrees Celsius,” says Dr. Sunil Jandu (left) in Churu town, even to people used to very high heat, 'every rise by a degree matters a lot'. Ramswaroop Saharan of Bhaleri village attributes the growing heat to global warming
PHOTO • Sharmila Joshi

‘पारा ४८ अंशाला टेकला की’ ज्यांना उष्म्याची सवय आहे त्यांच्यासाठीही ‘प्रत्येक अंशाचा फरक त्रासदायक असतो.’ भालेरी गावचे रामस्वरुप सहारन वाढत्या उष्णतेसाठी जागतिक तापमानवाढ कारणीभूत असल्याचं सांगतात

“उद्योग वाढलेत, वातानुकूलित यंत्रं वाढलीयेत, गाड्या वाढल्यायत,” जयपूर स्थित वरिष्ठ पत्रकार नारायण बारेथ सांगतात. “पर्यावरणाचं प्रदूषण वाढलंय. या सगळ्याची भर जागतिक तापमानवाढीत पडते.”

थरच्या वाळवंटाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणारं चुरू जागतिक पातळीवर वातावरण बदलांची जी साखळी आहे त्यातली केवळ एक कडी आहे. राजस्थान राज्याचा वातावरण बदलासंबंधीचा कृती आराखडा १९७० नंतर हरित वायूंच्या उत्सर्जनात जगभर वाढ झाली त्याबद्दल बोलतो. फक्त राजस्थान नाही तर देशाच्या पातळीवरचे घटक जे हरित वायू उत्सर्जनामुळे होणाऱ्या बदलांमध्ये भर टाकतात, त्यावर हा आराखडा भर देतो. यातले अनेक घटक ऊर्जा क्षेत्रातील वाढ, खनिज तेलांचा वाढता वापर, शेतीक्षेत्रातील उत्सर्जन, वाढत्या औद्योगिक प्रक्रिया आणि ‘जमिनीचा वापर, त्यातील बदल आणि वनीकरण’ यांच्याशी निगडीत आहेत. वातावरण बदलाच्या नित्य नव्या आणि गुंतागुंतीच्या जाळ्यातल्या या काही कड्या आहेत.

चुरुच्या गावांमध्ये लोक हरित वायूंबद्दल बोलणार नाहीत कदाचित पण त्याचे परिणाम ते भोगतायत. “पूर्वी आम्ही पंखा आणि कूलरशिवाय उकाडा सहन करत होतो. पण आता त्यांच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही,” हरदयालजी म्हणतात.

अमृता म्हणतात, “गरीब कुटुंबांना पंखे आणि कूलर परवडत नाहीत. असह्य उष्म्यामुळे जुलाब आणि उलट्या (इतरही त्रास) होतात. डॉक्टरांकडे जायचे तर खर्चात भर.”

सुजनगढला घरी परतण्यासाठी बस पकडण्याआधी, दिवस मावळतीला आलेला असताना शेतात भगवानी देवी सांगतात, “उन्हात काम करणं अवघड आहे. आम्हाला कसं तरी होतं. गरगरतं. मग आम्ही सावलीत दोन क्षण आराम करतो, लिंबू पाणी पितो – आणि परत कामाला लागतो.”

बहुमोल मदत आणि मार्गदर्शनाबद्दल मनापासून आभारः नारायण बारेथ, जयपूर, निर्मल प्रजापती आणि उमराव सिंग, तारानगर, अमृता चौधरी, सुजनगढ आणि दलीप सारावाग, चुरु शहर.

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Reporter : Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Series Editors : Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale