रमेश कुमार सायकल चालवत सिंघुला आले आहेत. पंजाबच्या होशियारपूरहून इथे ४०० किलोमीटर अंतर कापायला त्यांना २२ ताल लागले. त्यांची बहीण, मुलगा आणि सून त्यांच्या पाठोपाठ चारचाकीतून येत होते, तर पोलिस अधिकारी म्हणून निवृत्त झालेले ६१ वर्षीय रमेश कुमार सायकलवर.

“या शेतकऱ्यांच्या आंदोलनात मला आधीपासूनच सहभागी व्हायचं होतं,” ते सांगतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी रोजी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चात भाग घेण्यासाठी ते आता इथे पोचलेत.

“सरकारला असं वाटू शकतं की त्यांना कृषी कायदे मागे घेतले तर लोकांच्या मनातून ते उतरतील,” ते म्हणतात. “पण ते काही खरं नाहीये, उलट तसं केलं तर लोकांच्या मनात त्यांना मान वाढेल.”

शेतकरी या तीन कायद्यांचा विरोध करत आहेतः शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व समन्वय) कायदा, २०२०, शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) हमीभाव व कृषी सुविधा करार कायदा, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२०. या कायद्यांमुळे कोणाही भारतीय नागरिकाला कायदेशीर मार्गांचा अवलंब करता येणार नाही आणि या तरतुदीने भारतीय संविधानातल्या अनुच्छेद ३२ चाच अवमान होत असल्याने त्यावर टीका होत आहे.

तर, उद्याच्या मोर्चासाठी सिंघु सीमेवर फुलांचे हार, झेंडे आणि रंगीबेरंगी पताकांनी ट्रॅक्टर सजवण्यात आले आहेत. आणि हे सगळे ट्रॅक्टर मोर्चा सुरू झाल्यावर निघणं सुरळीत व्हावं म्हणून एका मागोमाग एक उभे केलेले आहेत.

The tractors in Singhu have been decorated with garlands and flags in preparation for the Republic Day parade
PHOTO • Anustup Roy

प्रजासत्ताक दिनाच्या मोर्चासाठी सिंघु सीमेवर हार आणि झेंडे लावून ट्रॅक्टर सज्ज झाले आहेत

Anustup Roy

अनुष्टुप रॉय कोलकाता स्थित सॉफ्टवेअर अभियंता आहे. कोडिंग करत नसेल तेव्हा तो आपला कॅमेरा घेऊन भारतभर भटकंती करत असतो.

यांचे इतर लिखाण Anustup Roy
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे