“मी कशाचीच अपेक्षा केली नाही. मी देशासाठी लढले, कोणत्या सन्मानासाठी नाही. माझ्या कुटुंबासाठीदेखील मी कधी काही मागितलं नाही. पण आता, आयुष्याच्या संध्याकाळी किमान माझ्या कामाची दखल घेतली जावी एवढी अपेक्षा मात्र आहे.”
काही वर्षांपूर्वी दारिद्र्य आणि आजारपण त्यांच्या घास घ्यायला उठलं होतं. तेव्हा जयपोरच्या परेश रथ या उमद्या पत्रकाराने त्यांची कहाणी जगापुढे आणली. त्यानेच स्वतःच्या पैशातून त्यांना झोपडपट्टीतून त्यांच्या चाळीतल्या एका खोलीच्या घरात हलवलं, त्यांच्या औषधपाण्याची व्यवस्था केली. आतादेखील त्या एका आजारपणातून सावरतायत, मुलाकडे रहातायत, त्याच्या वाइट सवयी डोळ्या आड करतायत. अधून मधून त्यांच्याबद्दल लेख, बातम्या येत राहिल्या. एका राष्ट्रीय मासिकाच्या मुखपृष्ठावरही त्या एकदा झळकल्या आहेत.
“आम्ही पहिल्यांदा त्यांच्याबद्दल लिहिलं तेव्हा त्यांना थोडी फार मदत नक्की मिळाली,” रथ सांगतात. “कोरापुटच्या तत्कालीन जिल्हाधिकारी उषा पाधींना आस्था वाटली. त्यांनी रेड क्रॉस निधीतून १०,००० रुपयाची वैद्कीय मदत मिळवून दिली. तसंच सरकारी भूखंड देण्याचंही कबूल केलं. मग पाधींची बदली झाली आणि त्या दुसरीकडे गेल्या. बंगालमधूनही काही जणांनी देणग्या पाठवल्या. पण त्या किती काळ पुरणार? परत पहिले पाढे पंचावन्न. आणि खरं तर प्रश्न फक्त पैशाचा नाहीये.” रथ त्यांचा मुद्दा मांडतात. “अगदी केंद्र सरकारचं पेन्शन मिळालं तरी त्याचा लाभ त्यांना अजून किती वर्षं मिळणार आहे? पैशापेक्षा त्यांच्यासाठी तो सन्मानाचा मुद्दा आहे. अजून तरी केंद्र सरकारकडून काही कळलेलं नाही.”
खूप खेटा मारल्यावर गेल्या वर्षाच्या अखेरीस लक्ष्मी पांडांना पाणजियागुडा गावात एक सरकारी भूखंड देण्यात आला. त्यावर सरकारी घरकुल योजनेखाली घर बांधून मिळण्याची त्या वाट पाहतायत. सध्या तरी रथ याने त्यांच्या जुन्या खोलीजवळच एक जरा बरी खोली बांधून घेतली आहे आणि कदाचित लवकरच त्या तिथे रहायला जातील.
आसपासच्या भागात त्या बऱ्यापैकी प्रसिद्ध आहेत. काही स्थानिक संस्थांनी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी पाठिंबा दिला आहे. १४ ऑगस्ट रोजी लक्ष्मी मला सांगत होत्या, “दीप्ती शाळेत उद्या माझ्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यांनी मला विनंती केली तशी!” या गोष्टीचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पण उद्या कार्यक्रमाला नेसण्यासारखी एकही चांगल्यातली साडी नाही याची चिंताही लपत नव्हती.
आझाद हिंद सेनेची ही वयोवृद्ध सेनानी तिच्या पुढच्या लढाईची तयारी करते आहे. “नेताजींची हाक होती, ‘दिल्ली चलो’. केंद्र सरकारने स्वातंत्र्य सैनिक म्हणून माझी दखल घेतली नाही १५ ऑगस्टनंतर मी पुन्हा तेच करणार आहे. मी संसदेसमोर धरणं धरणार आहे. दिल्ली चलो... तेच करणारे मी परत.” म्हाताऱ्या लक्ष्मी पांडा सांगत राहतात.
लक्ष्मी पांडा ‘दिल्ली चलो’ म्हणत दिल्ली गाठतील. साठ वर्षं उशीरा! मनातल्या आशेच्या जोरावर आणि कदम कदम बढाये जा च्या तालावर...
छायाचित्रं - पी. साईनाथ
पूर्वप्रसिद्धी – द हिंदू, १५ ऑगस्ट २००७
इंग्रज सरकारला अंगावर घेणारी ‘सलिहान’
पाणिमाराचं पायदळ – भाग १
पाणिमाराचं पायदळ – भाग २
अहिंसेची नव्वद वर्षं
शेरपूरः कहाणी त्यागाची आणि विस्मृतीत गेलेल्या गावाची
गोदावरीः पोलिस अजूनही हल्ला होण्याची वाट पाहताहेत
सोनाखानः वीर नारायण सिंग दोनदा मेला
कल्लियसेरीः सुमुखनच्या शोधात
कल्लियसेरीः ५० वर्षांनंतरही लढा चालूच