कोणत्याही प्रकारे वाटाघाटी करण्याची ताकद नसल्याने या यंत्रमाग या कामगारांच्या अपघात किंवा मृत्यूंच्या खटल्यांमध्ये फारशी काही प्रगती होत नाही, सुरत महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक जे के गामित सांगतात. “कामगारांची कुटुंबं दूर त्यांच्या गावी राहतात आणि इथे त्यांचे जे काही मित्रगण असतात ते सगळेच कारखान्यांमध्येच काम करणारे असतात. त्यामुळे पोलिस स्टेशनला चकरा मारायला किंवा पाठपुरावा करायला त्यांना अजिबात वेळ नसतो,” ते सांगतात. “किती अपघात किंवा मृत्यू होतात याचा कोणताही अधिकृत दस्तावेज उपलब्ध नाही. बहुतेक केसेस लगेच बंद करून टाकल्या जातात.”
जर एखाद्या कारखान्यात एखादी मृत्यूची घटना घडली तर पोलिस स्टेशनला केस दाखल होते. पण हे केवळ वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेपुरतं असतं. क्वचितच कुणाला अटक होते. नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी मृताच्या वारसांना कामगार न्यायालयात जावं लागतं. आणि जर केवळ इजा झाली असेल तर मग मालकाच्या विरोधात गेलं तर नोकरी जाण्याचा धोका असतो. त्यामुळे बहुतेक लोक न्यायालयात न जाता तडजोडीला तयार होतात.
म्हणून मग २९ एप्रिल रोजी, बिकाश गौडाचा मृत्यू झाल्यानंतर चार दिवसांनी त्याला कामावर ठेवणाऱ्या मालकाने त्याच्या कुटुंबाला २.१० लाख रुपये नुकसान भरपाई दिली आणि यापुढे कोणताही दावा करता येणार नाही हे निक्षून सांगितलं. बहुतेक वेळा नियोक्ते किंवा मालक ५० हजार रुपये देतात, जेणेकरून त्यांना केस बंद करता येईल आणि मग पुढची प्रक्रिया अनेक वर्षं चालत राहते. या केसमध्ये प्रवासी श्रमिक सुरक्षा मंच आणि आजीविका ब्यूरोने लक्ष घातल्यामुळे ही रक्कम वाढली आणि तात्काळ देण्यात आली.
तीन नोकऱ्यांचा प्रश्न होता. कुटुंबाने मान्य केलं.
गंजमहून गुजरातेत
सुरतेत गंजमचे किमान ८,००,००० कामगार राहतात, सुरत ओडिया वेलफेअर असोसिएशनचे सदस्य राजेश कुमार पाधी सांगतात. यातले ७० टक्के कामगार यंत्रमाग क्षेत्रात काम करतात. “ओडिशा ते सुरत हे स्थलांतर सुमारे ४० वर्षांपूर्वी सुरू झालं,” ते सांगतात. “खरं तर ओडिशामध्ये गंजम हा विकसित जिल्हा समजला जातो,” पीटीआरसी च्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे की, “झपाट्याने खालावणारी नैसर्गिक संसाधनं, शेतजमिनींमधली घट आणि कायमच येणाऱ्या पूर आणि दुष्काळामुळे स्थलांतराशिवाय पर्याय नाही.”
पण गंजमच्या या स्थलांतरितांना सुरतेच्या दुसऱ्या मोठ्या उद्योगामध्ये – हिरे व्यवसाय – मात्र स्थान नाही. “या नोकऱ्या शक्यतो गुजरातच्या स्थानिक कामगारांना मिळतात कारण नियोक्त्यांना ‘केवळ त्यांच्या विश्वासातले’ लोक नेमायचे असतात. गंजमचे हे कामगार यंत्रमाग कारखान्यांमध्ये कनिष्ठ पातळीवर वर्षानुवर्षे रोज एकसुरी पद्धतीने यंत्र चालवत काम करत राहिले आहेत.”
पण, घरच्या परिस्थितीपेक्षा हेही काही वाईट नाही असं कामगारांचं म्हणणं आहे. प्रवासी श्रमिक सुरक्षा समितीचे सदस्य असणारे सीमांचल साहू सांगतात, “गंजममधली स्थिती अवघड आहे. आधी काहीच कामगार इथे कामाला आले मात्र त्यानंतर आता लोंढ्याने लोक इथे यायला लागलेत, काही त्यांच्या कुटुंबांसोबत तर काही शेजाऱ्यापाजाऱ्यांसोबत.”