श्रीमंत असो वा गरीब, तरुण असो वृद्ध, प्रत्येकाने आपापले जोडे काढून महाराजांच्या पायाला हात लावायचे होते. पण, एक साधासा तरुण त्यांच्या डोळ्यात पाहत राहिला, एखाद्या गजासारखा ताठ उभा राहिला. वाकण्यास नकार दिला. कोणता मतभेद निर्दयीपणे चिरडून टाकण्याची ख्याती असलेल्या राजासमोर केलेल्या या उघड विद्रोहाने पंजाबच्या जोगा गावातील ज्येष्ठ मंडळी घाबरून गेली आणि अत्याचारी राजादेखील संतापला.
या तरुणाचं नाव जागीर सिंग जोगा होतं. सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्स (सीआयएसएफ)ची कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने बॉलिवूड तारका आणि आता हिमाचल प्रदेशातल्या मंडीची खासदार कंगना रनौत हिच्या कानशिलात मारली त्याच्या नऊ दशकं आधी जागीर यांनी असाच धाडसी आणि वैयक्तिक निषेध व्यक्त केला होता. जोगाची नाराजी पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंग यांच्यावर होती, ज्यांच्या सरंजामी गुंडांनी गरीब शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता. ते १९३० चं दशक होतं. त्यानंतर लगेच जे घडलं ते लोककथा आणि इतिहासात हरवून गेलं आहे. पण जोगा जगला. अशाच लढाया लढण्यासाठी.
दशकभरानंतर जोगा आणि तत्कालीन लाल पक्षाच्या त्याच्या साथीदारांनी किशनगढ (सध्याच्या संगरूर जिल्ह्यात) भोवती एक युगप्रवर्तक संघर्ष केला आणि भूपिंदर सिंग यांच्या मुलाकडून ७८४ गावांतील हजारो एकर जमीन हिसकावून घेतली. ही जमीन त्यांनी भूमीहिनांना वाटली. पटियालाचे माजी राजा, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे भूपिंदर सिंग यांचे नातू.
ह्या जमिनींच्या आणि इतर संघर्षानंतर १९५४ मध्ये जोगा नाभा तुरुंगात होते. कारावासात असतानाही त्यांना विधानसभेवर निवडून दिलं. १९६२, १९७६ आणि १९७२ मध्येदेखील ते आमदार म्हणून निवडून आले.












