लग्न झालं तेव्हा तनुजा रफिकुलसोबत सासरच्यांबरोबर एकत्र राहत होत्या. पण मुलं झाली तसं या जोडप्याने कर्ज काढलं, जमीन घेतली आणि गवताने शाकारलेल्या एका खोलीचं स्वतःचं घर बांधलं. “आम्ही दोघंही तेव्हा तरुण होतो. आम्हाला वाटत होतं की कष्ट करून आम्ही तो पैसा फेडू शकू. पण तसं काही झालं नाही. आम्ही कशा ना कशासाठी कर्ज घेत राहिलो आणि बघा, अजूनही आमचं घर काही पूर्ण बांधून झालेलं नाही.” प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत घर मिळण्यास हे भूमीहीन कुटुंब पात्र आहे पण अजूनही त्यांना घर मिळालेलं नाही.
रफिकुल सध्या ग्राम पंचायतीसोबत डेंग्यू निर्मूलन कार्यक्रमामध्ये काम करतात. त्यांचा महिन्याचा पगार ५,००० रुपये आहे पण तो वेळेवर होईलच असं काही सांगता येत नाही. “सगळंच अनिश्चित असल्यामुळे त्याचा मला फार ताण येतो. कधी कधी तर सहा महिने पगार व्हायचा नाही,” असं म्हणत गावातल्या दुकानात त्यांची १५,००० रुपयांची उधारी झाल्याचं तनुजा सांगतात.
विडी कामगारांना बाळंतपणात किंवा आजारपणात रजा मिळत नाही. गरोदरपण आणि बाळंतपणसुद्धा विड्या वळत वळतच पार पडतं. जननी सुरक्षा योजना, अंगणवाडी आणि मोफत पोषण आहाराचा तरुण मुलींना आता थोडा तरी लाभ मिळतोय. “पण वृद्ध स्त्रियांच्या आरोग्यावर या कामाचे किती दुष्परिणाम झाले आहेत हे कुणीही आजवर मोजलेलं नाही,” उषा कार्यकर्ती सबिना यास्मिन सांगते. “पाळी जायच्या काळापर्यंत त्यांची तब्येत फारच खराब झालेली असते. कॅल्शियम आणि लोह हे स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे दोन्ही घटक त्यांच्या आहारात नसतात. त्यामुळे हाडं ठिसूळ होतात आणि रक्तक्षयही होतोच,” ती म्हणते. बेलडांगा टाउनच्या नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या १४ वॉर्डांची जबाबदारी तिच्यावर आहे. पण यास्मिनला एकाच गोष्टीची खंत वाटते की उषा म्हणून या बद्दल ती फार काही करू शकत नाही कारण तिचं काम जास्तकरून माता बाल आरोग्यासंबंधी आहे.
विडी उद्योग आणि शासन या दोन्हीही यंत्रणांनी वाऱ्यावर सोडल्यासारखी गत असल्याने विडी कामगार महिलांच्या आयुष्यात आशादायी असं फार काही नाहीच. कामगार म्हणून काही लाभ मिळतात का असं विचारल्यावर तनुजा वैतागल्या आणि म्हणाल्या, “आमची चौकशी करण्यासाठी कोणीही बाबू लोक इथे येत नाहीत. खूप वर्षं झाली बीडीओच्या ऑफिसमधून आम्हाला सांगितलं गेलं की डॉक्टर येतील आणि आम्हाला तपासून जातील. आम्ही गेलो. त्यांनी आम्हाला या एवढाल्या बिनकामी गोळ्या दिल्या. काही उपयोग झाला नाही,” त्या सांगतात. त्यानंतर या बायांची तब्येत कशी आहे ते पहायला देखील कुणी परत आलं नाही.
त्या गोळ्या माणसांसाठी तरी होत्या का, तनुजांना शंका येते. “मला तर वाटतं गायीगुरांच्याच असतील.”
पारी आणि काउंटर मीडिया ट्रस्ट यांच्यातर्फे ग्रामीण भारतातल्या किशोरवयीन आणि तरुण मुली यांना केंद्रस्थानी ठेवून केल्या जाणार्या पत्रकारितेचा हा देशव्यापी प्रकल्प आहे. ‘पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडिया’च्या सहकार्याने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे. सामान्य माणसांचा आवाज आणि त्यांचं आयुष्य यांचा अनुभव घेत या महत्त्वाच्या, पण उपेक्षित समाजगटाची परिस्थिती, त्यांचं जगणं सर्वांसमोर आणणं हा त्याचा उद्देश आहे.
हा लेख प्रकाशित करायचा आहे? [email protected] या पत्त्यावर ईमेल करा आणि [email protected] ला सीसी करा.