“आज सहावा दिवस आहे, मी एकही मासा न पकडता घरी जाणार आहे,” वुलर तलावाच्या काठावर उभे असलेले अब्दुल रहीम कावा सांगतात. ६५ वर्षीय कावा आपल्या पत्नी आणि मुलासह एकमजली घरात राहतात.

बांदीपोर जिल्ह्यातल्या कानी बाठी भागात स्थित अणि झेलम व मधुमती नदीच्या प्रवाहातून तयार झालेले, वुलर हे आसपास राहणाऱ्या लोकांसाठी उपजीविकेचं एकमेव साधन आहे. या तलावाकाठी अंदाजे १८ गावं वसलेली आहेत आणि किमान १०० कुटुंबे प्रत्येक गावात वास्तव्यास आहेत.

अब्दुल सांगतात, “मासेमारी हेच अपजीविकेचं साधन आहे. पण तलावात पाणी नाही. आम्ही आता पाण्यातून जाऊ शकतो कारण, कोपऱ्यांमध्ये ते फक्त चार किंवा पाच फूट खोल आहे,” ते काठाकडे हात दाखवून बोलत होते.

तिसऱ्या पिढीतले मच्छिमार अब्दुल गेल्या ४० वर्षांपासून उत्तर काश्मीरमधल्या या तलावात मासेमारी करत आहेत त्यांना हे माहीत असेल. “मी लहान असताना माझे वडील मला सोबत घेऊन जायचे. त्यांना पाहून मी मासे पकडायला शिकलो,” ते सांगतात. अब्दुलच्या मुलानेही हा कौटुंबिक व्यवसाय पुढे चालू ठेवला आहे.

अब्दुल आणि त्यांचे सहकारी रोज सकाळी वुलरला जातात आणि त्यांच्या झाल म्हणजे नायलॉनच्या धाग्याने विणलेले जाळे घेऊन तलावात जातात. पाण्यात जाळे फेकून, मासे पकडण्यासाठी कधीकधी ते हाताने तयार केलेली डफली वाजवतात.

वुलर हे आशिया खंडातली सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे, परंतु गेल्या चार वर्षात पाण्यातल्या प्रदुषणामुळे वर्षभर मासेमारी करणं जवळजवळ अशक्य झालं आहे. “पूर्वी आम्ही वर्षातून किमान सहा महिने मासे पकडायचो, पण आता आम्ही फक्त मार्च आणि एप्रिलमध्ये मासेमारी करतो,” अब्दुल सांगतात.

पहा : आता हे सरोवर राहिले नाही

इथे प्रदुषण होण्याचं मुख्य कारण म्हणजे श्रीनगरमधून वाहणारी झेलम नदी. शहरातला कचरा नदीमध्ये साचत येऊन तलावापर्यंत पोहोचतो. १९९० च्या रामसर अधिवेशनात ‘आंतरराष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची ओली मृदा’ म्हणून निवडलेला तलाव आता सांडपाणी, औद्योगिक प्रवाह आणि शेतीतील कचऱ्याची ओंगळ जागा बनला आहे. “मला आठवतं तलावाच्या मध्यभागी पाण्याची पातळी ४०-६० फूट होती जी आता फक्त ८-१० फूट इतकीच राहिली आहे,” अब्दुल सांगतात.

त्यांच्या स्मृती त्यांना बरोबर मदत करतात. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या २०२२ च्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, २००८ ते २०१९ दरम्यान तलाव एक चतुर्थांश प्रमाणात आटला आहे.

अब्दुल सांगतात, सात-आठ वर्षांपूर्वी त्यांनी दोन प्रकारचे गाड (मासे) पकडले होते, काश्मिरी आणि पंजाबी. इथे इतर सर्व गोष्टींसाठी गैर-काश्मिरी हा शब्द वापरला जातो. ते वुलर मार्केटमधल्या कंत्राटदारांना पकडलेले मासे विकायचे. वुलरच्या माशांनी श्रीनगरसह संपूर्ण काश्मिरमधल्या लोकांचे पोट भरले आहे.

“जेव्हा तलावात पाणी होतं, तेव्हा मी मासे पकडून आणि विकून १००० रुपये कमवायचो,” अब्दुल सांगतात. “आता मी ज्या दिवशी ३०० रुपये कमावतो तो चांगला दिवस असतो.” जर मासे कमी असतील तर ते विकण्याची तसदी घेत नाहीत तर त्याऐवजी स्वतःच्या वापरासाठी घरी घेऊन जातात.

प्रदूषण आणि पाण्याच्या कमी पातळीमुळे तलावातली माशांचं प्रमाण घटलं आहे. मच्छिमार नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात पाण्यातील शिंगाडे गोळा करून ते विकतात. ते आता उपजीविकेसाठी इतर पर्यायांकडे वळताना दिसताहेत. हे शिंगाडे स्थानिक कंत्राटदारांना ३०-४० रुपये किलोने विकले जातात.

ही फिल्म वुलर तलावातील प्रदूषण आणि त्यामुळे मच्छिमारांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम याची कथा मांडते.

Muzamil Bhat

مزمل بھٹ، سرینگر میں مقیم ایک آزاد فوٹو جرنلسٹ اور فلم ساز ہیں۔ وہ ۲۰۲۲ کے پاری فیلو تھے۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Muzamil Bhat
Editor : Sarbajaya Bhattacharya

سربجیہ بھٹاچاریہ، پاری کی سینئر اسسٹنٹ ایڈیٹر ہیں۔ وہ ایک تجربہ کار بنگالی مترجم ہیں۔ وہ کولکاتا میں رہتی ہیں اور شہر کی تاریخ اور سیاحتی ادب میں دلچسپی رکھتی ہیں۔

کے ذریعہ دیگر اسٹوریز Sarbajaya Bhattacharya
Translator : Ashwini Patil

Ashwini is a journalist based in Nashik with seven years of experience in Marathi print media. She has a keen interest in women and development, cultural studies, youth, finance and media.

کے ذریعہ دیگر اسٹوریز Ashwini Patil