‘इथे साप वगैरे काही असतात का?’ मी इलयाराजाला विचारलं.
संध्याकाळची वेळ, खूप उशीर झाला होता, तमिळनडूच्या सिवगंगा जिल्ह्याच्या मेलाकडू गावातल्या एका शेताजवळ आम्ही उभं होतो. मी तिथे विहिरी खोदणाऱ्यांची भेट घ्यायला गेले होते – हा सगळा प्रदेश शुष्क, धूळभरला होता आणि सिंचनासाठी पाणी शोधणं हेच एक मोठं काम होतं. इलायाराजा तिथे राहायचा. तो एका खाजगी मालकीच्या शेतात अर्धवेळ आणि त्याच्या आई-वडलांच्य रानात बाकी वेळ, म्हणजेच तो दोन पाळ्यांमध्ये काम करत असे. आणि त्याचं वय आहे फक्त २३ वर्षं.
माझ्या आवाजातली चिंता जाणवली आणि इलायाराजाला हसू फुटलं. तो म्हणाला, अगदी काही दिवसांआधी, इथे ‘नागराजा’ने दर्शन दिलं होतं. इथला फेरफटका टाळावा का अशा विचारात मी उभी होते तेवढ्यात एक विजेरी घेऊन तो हजर झाला.
‘मी येतो तुमच्यासोबत,’ त्याने मदतीचा हात पुढे केला मग आम्ही मग आम्ही चालत निघालो. विजेरीच्या प्रकाशझोतात पावलं आणि रात्रीचा गारव्यामध्ये मस्तकं.
आमच्या त्या फेरीला पावसाचा सुवास होता. दिवसभराच्या उकाड्यानंतर पाऊस बरसला होता आणि बेडूक किंवा नाकतोडे वगळता मला फक्त इलायाराजाच्या श्वासाचा काय तो आवाज येत होता. ‘मला दम्याचा त्रास आहे,’ तो सांगतो, चेहऱ्यावरचं हसू कायम ठेवत. तो स्थलांतरित आहे – त्याच्या घरचे तो अगदी तान्हा असताना सेलमहून इथे आले – पण त्याला सिवगंगा हातावरच्या रेषांप्रमाणे नीट माहित आहे. सगळी वळणं, खाचखळगे, मोटरसायकली आणि त्या चालवणारे लोकही. ‘२३ वर्षांपूर्वी इथे जमिनी खूप स्वस्त होत्या. माझ्या आई-वडलांनी सेलममधला आमचा जमीन जुमला विकला आणि माझ्या वडलांनी आणि चुलत्यांनी इथे पन्नास हजारात १० एकर जमीन विकत घेतली. तुम्हाला माहितीये, आता इथे एकराला ३ ते ४ लाख भाव चाललाय?’ तो चालता चालता उजवीकडे-डावीकडे निर्देश करत होता तसं उसाच्या आणि आरारोटच्या शेतात विजेरीचे गोल झोत पडत होते.






