“कृषी संकट वगैरे काहीही नाहीये.”
हे आहेत दर्शन सिंग संघेरा, पंजाबच्या प्रबळ अशा अर्थिया असोसिएशनचे उपाध्यक्ष. आणि बर्नाला जिल्हा शाखेचे प्रमुख. अर्थिया म्हणजे दलाल, शेतकरी आणि त्यांचा माल खरेदी करणाऱ्यांमधला दुवा. पिकांची कापणी झाली की खरेदीदारांसाठी पिकांचा लिलाव आणि त्यांच्यापर्यंत मोल पोचवण्याचं काम अडतिये करतात. ते सावकारही आहेत, आणि या धंद्याचा त्यांना दांडगा अनुभवही आहे. आणि गेल्या काही वर्षांत ते शेतीपूरक घटकांच्या विक्रीच्या क्षेत्रात उतरले आहेत. थोडक्यात काय तर राज्यातल्या शेतकऱ्यांवर त्यांची चांगलीच मजबूत पकड आहे.
अर्थियांचं राजकीय क्षेत्रातही चांगलंच वजन आहे. विधानसभेचे सदस्यांना ते त्यांचे भाईबंदच मानतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना त्यांनी ‘फख्र-इ-कौम’ हा सन्मान बहाल केला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी या प्रसंगाचं वर्णन “भव्य सन्मान सोहळा” म्हणून केलं. त्याआधी नुकतीच मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केली की शेतकऱ्यांनी अर्थियांकडून घेतलेलं कर्ज माफ करण अवघड आहे.
तब्बल ८६ टक्के शेतकरी आणि ८० शेतमजुरांची कुटुंबं कर्जात बुडाली आहेत असं ‘ग्रामीण पंजाबमधील शेतकरी आणि शेतमजुरांमधील कर्जबाजारीपणा’ या अभ्यासात म्हटलं आहे. या अभ्यासाचे लेखक पतियाळा येथील पंजाब विद्यापीठात संशोधक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की या कर्जापैकी जवळ जवळ एक पंचमांश कर्ज या दलालांचं आणि सावकारांचं आहे. आणि उतरंडीत जसजसं खाली जाऊ तसं या कर्जाचा विळखा जास्तच घट्ट होऊ लागतो. सीमांत आणि छोट्या शेतकऱ्यांमध्ये ते सर्वात जास्त आहे. या अभ्यासामध्ये १००७ शेतकरी आणि ३०१ शेतमजूर कुटुंबांचा समावेश होता. २०१४-१५ मध्ये करण्यात आलेलं क्षेत्र सर्वेक्षण राज्याच्या सगळ्या भागांमध्ये करण्यात आलं होतं. इतरही अभ्यास वाढती कर्जं आणि हलाखीबद्दल बोलत आहेत.
कृषी संकट वगैरे “शेतकऱ्यांच्या पैसे उडवण्याच्या सवयीमुळे आलंय. त्यामुळेच ते अडचणीत सापडतात” असं म्हणत दर्शन सिंग संघेरा या गोष्टी ठामपणे उडवून लावतात. “त्यांना शेतीत लागणाऱ्या गोष्टी विकत घेता याव्यात यासाठी आम्ही त्यांना पैशाची मदत करतो. तसंच त्यांच्या घरात लग्न निघतं किंवा आजारपण आणि इतर खर्चालाही आम्ही मदत करतो. शेतकऱ्याचा माल निघाला की माल घेऊन तो अर्थियाकडे येतो. आम्ही धान्य निवडतो, गोणीत भरतो, शासन, बँका आणि बाजारातले व्यवहार पार पाडतो.” गहू आणि तांदळाच्या सगळ्या पिकावर दलालांना २.५ टक्के दलाली मिळते. यातल्या शासनाच्या सहभागावर पंजाब राज्य कृषी शेतमाल विपणन विभागाचं नियंत्रण असतं. शेतकऱ्यांना या दलालांमार्फत त्यांचा पैसा मिळतो. सावकारीतून जी कमाई अर्थिया करतात ती वेगळीच.





