“बांका दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, अमरपूरचा गूळ आणि कटोरियाचं टसर रेशीम,” कटोरियाचे एक विणकर, अब्दुल सत्तार सांगतात. त्यांच्या मते आता दोन्हीला उतरती कळा लागली आहे.
अमरपूर तालुक्यातलं बल्लिकिटा कटोरियापासून तीन किलोमीटरवर आहे. बल्लिकिटाच्या वेशीवरचा गुळाचा कारखाना शोधणं फार काही अवघड नाही. उसाचा रस उकळत, करपत असतानाच वास, तुम्हाला बरोबर तिथे घेऊन जातो.
बिहारच्या बांका जिल्ह्यातला हा कारखाना सुमारे ४० वर्षांपूर्वी आपल्या वडलांनी म्हणजेच साधू सरण कापरींनी सुरू केल्याचं राजेश कुमार सांगतात. हा लहान कारखाना आहे, १२ ते १५ कामगार इथे काम करतात. दिवसभराच्या, सकाळी १० ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच साधारण ६ वाजेपर्यंतच्या कामाचे त्यांना २०० रुपये मिळतात. दर वर्षी कारखाना ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात सुरू असतो. डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे ऐन हंगाम.














