“छोटीशी जरी चूक झाली, सत्तूर नाही, कोयता होणार!” राजेश चाफेकर त्यांच्या कामातले बारकावे अगदी चपखलपणे सांगतात. लोहारकाम म्हणजे त्यांचा हातखंडा. वसई तालुक्याच्या आकटणमधल्या त्यांच्या या दुकानात आजवर १०,००० हून जास्त लोखंडी अवजारं-हत्यारं त्यांनी घडवली आहेत.
बावन्न वर्षीय राजेश चाफेकर आपले वडील दिवंगत दत्तात्रेय चाफेकर यांच्याकडून ही कला शिकले. पांचाळ लोहारांची त्यांची ही सातवी पिढी. महाराष्ट्रभरातले शेतीकाम, मच्छीमारी करणारे अनेक जण आजही त्यांच्याकडून वस्तू बनवून घेतायत. “लोक म्हणायचे, ‘आकटण से ही हत्यार ले के आओ’,” राजेश दादा सांगतात. शेतीत वापरली जाणारी पंचवीस प्रकारची लोखंडी अवजारं त्यांना बनवता येतात.
गिऱ्हाईक इथून ९० किलोमीटरवर असलेल्या नवी मुंबईच्या उरणहून यायचे. बोटी बनवण्यासाठी लागणाऱ्या तासणीची ठोक ऑर्डर देऊन जायचे. पूर्वी तर “गिऱ्हाईक यायचे, आमच्या घरी चार दिवस मुक्काम करायचे. आम्ही नवीन अवजार कसं तयार करतो ते अगदी सुरुवातीपासून पहायचे,” राजेश दादा सांगतात.
आकटणमधले बोळ आणि आळ्या जातीवर आधारित व्यवसायानुसार वसलेल्याः सोनार, लोहार, सुतार, चांभार आणि कुंभार आळी. या गावातल्या सगळ्यांचंच सांगणं आहे की ते विश्वकर्म्याचे उपासक आहेत. सगळ्या कारागीर जात-समुदायांची ही देवता आहे. पांचाळ लोहार २००८ सालापासून भटक्या जमाती – ब प्रवर्गात समाविष्ट असून या आधी त्यांचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये केला गेला होता.
वयाची १९ वर्षं पूर्ण झाली त्या काळात राजेश दादांना आपल्या घराण्याचा हा व्यवसाय पुढे नेण्याची कसलीही इच्छा नव्हती. एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात ते स्टोअरकीपर म्हणून काम करत होते. महिन्याला १,२०० रुपये पगार मिळत असे. पण एकत्र कुटुंबामध्ये काही कुरबुरी झाल्या आणि त्यांच्या वडलांच्या हातचं कामच गेलं. तेव्हा दादांना आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात उडी घ्यावीच लागली.
























