अंजन गावाजवळचा पवित्र डोंगर आणि त्याच्या माथ्यावरच्या पांढऱ्या आणि भगव्या पताका. पांढऱ्या पताका निसर्गपूजक असणाऱ्या सरना आदिवासींच्या आहेत. या पताका किंवा झारखंडच्या उरांव आदिवासींच्या आहेत. भगवे झेंडं हिंदूंचे. १९८५ साली त्यांनी या डोंगराच्या माथ्यावर हनुमानाचं मंदिर बांधलं होतं. हिंदू देवता असलेल्या हनुमानाचा जन्म इथेच झाला असा त्यांचा दावा होता.
बांबूच्या कमानीवर दोन्ही भाविकांचं स्वागत करणारे दोन फलक आहेत. दोन्हीवर आपापल्या समित्यांची नावं लिहिलेली आहेत. वनखातं आणि अंजन गावाचे रहिवासी एकत्रितरित्या चालवत असलेलं गुमला वन प्रबंधन मंडल (संयुक्त ग्राम वन प्रबंधन समिती) २०१६ पासून या तीर्थस्थळाचं तसंच वाहनतळाचं व्यवस्थापन करत आहे. २०१९ साली हिंदूंनी अंजन धाम मंदिर विकास समिती स्थापन केली आणि ती मंदिराची व्यवस्था पाहते.
प्रवेशद्वारातून आत आलं की लगेचच वर जाणारे दोन जिने आहेत. हे दोन्ही जिने वेगवेगळ्या मंदिरात जातात. एका जिन्याने तुम्ही डोंगरमाथ्यावरच्या हनुमान मंदिरात जाऊ शकता आणि दुसऱ्या जिन्याने तुम्ही दोन गुहांमध्ये पोचता. हिंदूंचं मंदिर अस्तित्वात नव्हतं तेव्हापासून इथे आदिवासी ‘पाहन’ म्हणजे भगत इथल्या देवाची पूजा करत आले आहेत.
दोन्ही देवळांपाशी दोन वेगवेगळ्या दानपेट्या ठेवलेल्या आहेत. आणि अर्थातच दोन वेगळ्या देवांच्या सेवेकऱ्यांनी दोन वेगवेगळ्या उद्दिष्टांनी या पेट्या ठेवल्या आहेत हे सांगायला नको. एक गुहेच्या बाहेर आणि एक मंदिराच्या आत. तिसरी एक पेटी देवळाच्या प्रांगणात आहे. ती आहे बजरंग दलाची. या पेटीतल्या पैशाचा उपयोग मंगळवारच्या भंडाऱ्यासाठी केला जातो. यातून भक्त आणि संतांच्या जेवणाची सोय केली जाते. अंजग गावाच्या डोंगराच्या पायथ्याशी आणखी एक दानपेटी आहे. त्यामध्ये गोळा झालेला पैसा आदिवासींना पूजासाहित्य खरेदी करण्यासाठी वापरला जातो.
“हा प्रदेश पूर्णपणे आदिवासींचा आहे. अंजनगावात या आधी कुणी पंडित वगैरे काही नव्हतं,” गावाचे माजी प्रधान रंजय उरांव, वय ४२ मला देवळांच्या व्यवस्थेविषयी सांगतायत. “हे इतक्यात वाराणसीचे पंडित लोक इथे आले आहेत. इथले उरांव आदिवासी किती तरी वर्षांपासून प्रकृती देवी अंजनीची उपासना करतात. पण या अंजनीचा संबंध हनुमानाशी आहे याचा आम्हाला कणही गंध नव्हता,” ते म्हणतात.
रंजय यांच्या सांगण्यानुसार, “पंडित आले आणि त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की अंजनी ही प्रत्यक्षात हनुमानाची आई होती. अंजन हे हनुमानाचं पवित्र जन्मस्थळ असल्याचं घोषित केलं. आणि आम्हाला काही कळायच्या आत डोंगराच्या माथ्यावर हनुमानाचं मंदिर पण बांधून झालं. त्यांनी ती जागा अंजन धाम असल्याचं जाहीर करून टाकलं.”










