सरस्वती बावरीला काय करावं ते कळत नव्हतं.
सबूज साथी सायकल चोरीला गेली तेव्हापासून शाळेत कसं जायचं हा मोठा प्रश्नच होता. सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या नववी आणि दहावीच्या मुलींना एका सरकारी योजनेतून ही सायकल दिली जात होती. काय भारी होती ती सायकल! उन्हात कशी मस्त चमकत होती.
आज ती ग्राम प्रधानांकडे आलीये, नव्या सायकलसाठी अर्ज द्यायला. “सायकल तो पेये जाबी रे छुरी, किंतु तोर इस्कुल-टा आर कोद्दिन थाकबे सेटा द्याख आगे [पोरी, तुझी सायकल तुला मिळेलही पण तुझी शाळा अजून इथे फार दिवस असेलच असं नाही],” खांदे उडवत अगदी बेफिकीरपणे सरपंच सांगतात. हे ऐकून सरस्वतीच्या पायाखालची वाळूच सरकल्यासारखं झालं. ग्राम प्रधान नक्की काय म्हणत होते? खरं तर शाळेत जायला तिला सायकलवरही पाच किलोमीटर पॅडल मारत जावं लागतं. आता जर हे अंतर १०-२० किलोमीटर झालं तर मग तिचं काही खरं नाही. तिचे वडील तिचं लग्न लावून देण्याच्या मागे लागले होते. वर्षभरासाठी कन्याश्री योजनेत मिळणारे एक हजार रुपये आता पुरे पडणार नाहीत.
सायकल
पोरी गं पोरी, शाळेत ती चालली
सरकारी सायकलवर ओलांडून गल्ली
लोहाच्या फाळासारखी कणखर जरी
सरकारी बाबूंना जमीन आहे प्यारी
शाळाच बंद झाल्या तर होईल काय?
पोरी गं पोरी कुणवर चिडशील, झालंय काय?


