चूक जरी नाही तरी मनी वहिम घेई.
माझा मालधारी राणा मला उगाचच मारी.
एखाद्या लोकगीताची सुरुवात अशा ओळींनी व्हावी हे तसं अवचितच. पण बायकोला मारणं हे वास्तव आहे आणि ते केवळ हे लोकगीत गायलं गेलंय त्या गुजरातच्या कच्छमधलंच नाही तर अख्ख्या देशाचं वास्तव आहे हे मात्र दुर्दैवाने अवचित राहिलेलं नाही.
अगदी जवळच्या नात्यातली हिंसा, पत्नीला मारहाण ही अख्ख्या जगाची समस्या आहे. स्त्रियांच्या मानवी हक्कांचं घोर उल्लंघन तर आहेच पण सार्वजनिक आरोग्याचा फार मोठा प्रश्न आहे हा. संयुक्त राष्ट्रसंघाने संकलित केलेल्या स्त्रियांवरील हिंसंवरील आकडेवारीवरून असं दिसतं की दर तीलातल्या एका बाईला तिच्या जोडीदाराकडून शारीरिक किंवा लैंगिक हिंसा सहन करावी लागते.
नवऱ्याने बायकोला मारण्याचं समर्थन होऊ शकतं का?
गुजरातेत ३० टक्क्यांहून अधिक स्त्रिया आणि २८ टक्के पुरुष अशा मारहाणीचं समर्थन करत असल्याचं एनएफएचएस – ५ (२०१९-२१) या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. कोणत्या कारणाने बायकोला मारहाण केली तर चालते? चारित्र्यावर संशय, वाद घालणे, शरीरसंबंधास नकार, पतीला न सांगता बाहेर जाणे, घराकडे दुर्लक्ष आणि चांगला स्वयंपाक न करणे या कारणांवरून मारहाण होऊ शकते.
देशाच्या पातळीवर असे सर्वे आणि आकडेवारी मिळते. लोकगीतं मात्र मनाचा मागोवा घेतात. स्त्रियांच्या मनात काय सुरू असतं, त्यांच्या समाजात काय काय घडतं हे अशा गाण्यांमधून आपल्या समोर येतं.
आता ही गाणं शोषितांना बळ देतात का? विभिन्नं मतं असू शकतात. हे गाणं पारंपरिक मात्रेत आहे, गाण्याची चाल प्रेमगीतांसारखी आहे. पण त्याच्या आडून गाणारी बाई मनातल्या मनात आपल्या पतीला लाखोली तर वाहत नाहीये ना? आपल्या पतीचा उल्लेख मालधारी राणो असा आदराने करणाऱ्या तिच्या मनातला विद्रोह तर या गाण्यातून दिसत नाही ना?
या गाण्यातून स्त्रियांना न्याय मिळावा असं काहीही नाही. किंवा प्रस्थापित समाजरचनेला धक्का लागावा असंही फारसं काही त्यात नाही. पण ही गाणी म्हणजे तिच्या रोजच्या जगण्यातलं अपार दुःख, पीडा आणि वेदना बाहेर काढण्याचा मार्ग आहेत. एरवी कुणालाच सांगता येणार नाही अशी ही वेदना या गाण्यातून फार जोरकसपणे बाहेर पडते. सहज साध्या सुरातून दुःख व्यक्त करते. कदाचित रुळलेल्या चालीत गाता गाता ती आपल्या जगण्याचं असह्य वास्तव लपवून टाकते आणि आला दिवस ढकलत पुढच्या दिवसाला सामोरं जाण्याची ताकद मिळवते. कारण त्या सुरांपलिकडे तिला असं बळ देणारं या समाजात दुसरं काहीच नाहीये.


