“देशासाठी मेडल जिंकायचंय एक दिवस, ऑलिंपिकला जाऊन,” वर्षा मोठ्या निर्धाराने तिचं स्वप्न सांगते. ती अजूनही धापा टाकतीये. आजचा सराव नुकताच संपलाय. चार तास कसोशीने ती डांबरी रस्त्यावर धावलीये. ती प्रशिक्षण घेत असलेली श्री स्वामी समर्थ अथलेटिक्स स्पोर्ट्स रेसिडेन्शिअल अकादमी त्याच रस्त्याला लागून आहे. रस्त्यावरची लहान-मोठी दगडं, रेती अनवाणी पायांनी तुडवल्यावर तिच्या थकलेल्या, दुखावलेल्या पायांना आता कुठे काहीसा विसावा मिळाला.
१३ वर्षांची वर्षा कदम लांब पल्ल्याची धावपटू आहे. असं अनवाणी सराव करणं काही छंद नाही तिच्यासाठी. “आई-बाबा बुटं नाय घेऊन देऊ शकत. लय महाग असतात ती धावायची बुटं. नाय परवडत,” वर्षा असहाय्यपणे म्हणते.
वर्षाची आई देवशाला आणि वडिल विष्णू मराठवाड्यातल्या दुष्काळी परभणी जिल्ह्यातले शेतमजूर. तिचं कुटुंब अनुसूचित जातीत मोडणाऱ्या मातंग समाजातलं.
“मला धावायला लय आवडतं,” तिच्या काळ्या-टपोऱ्या डोळ्यांमध्ये एक चमक दिसते. “बुलढाणा अर्बन फोरेस्ट मॅरेथॉन २०२१ ला झालं. ते माझं पहिलं मॅरेथॉन. दुसरी आली, कसलं भारी वाटलं व्हतं. मेडल बी मिळालं. अजून लय जिंकू वाटतं,” वर्षा निश्चयाने म्हणते.
तिच्या आई-वडिलांना तिची धावण्याची आवड ती अगदी आठ वर्षांची असतानाच जाणवली होती. “माझा मामा, पाराजी गायकवाड राज्य स्तरावरचा धावपटू. आर्मीत गेला. मामाला बघूनच मी शिकली धावायला,” वर्षा सांगू लागली. मामाकडून प्रेरणा घेत धावण्याची आवड निर्माण झाली. पुढे जाऊन २०१९ च्या राज्यस्तरीय पातळीवर आंतरशालेय चार किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धेत वर्षाने दुसरा क्रमांक पटकावला, “त्यामुळे विश्वास आला स्वत:वर की आपण धावू शकतो.”
















