आठ नातवंडांच्या या आजीला, बुटे माझीला आपल्या नातवंडांचं कसं होणार, याची खूप चिंता वाटतीये. सहा मुली आणि दोन मुलं मागे ठेवून त्यांचा मुलगा गेला. ‘‘कसं वाढवणार आहोत या मुलांना आम्ही?’’ सत्तर वर्षांच्या गोंड आदिवासी बुटे माझी म्हणतात. ओडिशामधल्या बलांगीर जिल्ह्यात हियाल गावी त्या राहतात.
त्यांचा मुलगा दोन वर्षांपूर्वी मरण पावला. पन्नाशीच्या नृप यांची मूत्रपिंडं निकामी झाली होती असं त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. नृप स्थलांतरित मजूर होते. ते आणि ४७ वर्षांची त्यांची पत्नी नमनी वीटभट्ट्यांवर काम करण्यासाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यांमध्ये जायचे.
‘‘२०१९ च्या नोव्हेंबरमध्ये आम्ही वीटभट्टीवर काम करण्यासाठी चेन्नईला गेलो होतो,’’ नमनी सांगते. कुटुंबातले दहा जण होते. नमनी, पन्नाशीचे नृप, त्यांचा सर्वात मोठा मुलगा, २४ वर्षांचा जुधिष्ठिर आणि त्याची पत्नी, परमिला, वय २१, पुरनामी, वय १९, सजने, वय १६, कुमारी, वय १५ आणि तिचा नवरा, २१ वर्षांचा दिनेश. ‘‘स्थानिक सरदाराने (कंत्राटदाराने) आम्हाला प्रत्येकी २५ हजार रुपये उचल दिली होती,’’ नमनी सांगतात. त्यांच्याबरोबर दहा वर्षांची साबित्री आणि सहा वर्षांची जानकीही होती. या दोघींना मात्र पैसे दिले गेले नव्हते.
२०२० च्या जूनमध्ये, कोविडची टाळेबंदी लागली तेव्हा हे कुटुंब त्यांच्या गावी परतलं. परतणार्या मजुरांसाठी ओडिशा सरकारने शाळांमध्ये तात्पुरती आरोग्य सुविधा आणि विलगीकरणाची सोय केली होती. ‘‘चौदा दिवस आम्ही गावातल्या शाळेत राहिलो. मी आणि माझा नवरा, दोघांना तिथे राहण्यासाठी प्रत्येकी २००० रुपये मिळाले होते,’’ नमनी सांगते.












