“माझ्या पाच वर्षांच्या मुलीला खूप ताप आहे,” शकीला निझामुद्दीन सांगते. “माझा नवरा तिला डॉक्टरकडे घेऊन निघाला होता, पण पोलिसांनी त्याला थांबवलं. तो घाबरला आणि परत आला. आम्ही आता आमच्या कॉलनीच्या बाहेर जाऊच शकत नाही, अगदी हॉस्पिटलमध्येही नाही.”
तीस वर्षांची शकीला अहमदाबादच्या सिटिझन नगर रिलीफ कॉलनीमध्ये राहते. घरी बसून पतंग बनवणं, हे तिच्या उत्पन्नाचं साधन. ती आणि तिचा नवरा, दोघंही रोजंदारीवर काम करणारे. आता लॉकडाऊनमध्ये उत्पन्नाबरोबर त्यांच्या आशाही मावळतीला लागल्यात. “दवाखाना बंद आहे,” ती मला व्हिडिओ कॉलवर म्हणाली. “ते आम्हाला सांगतायत, घरी जा, काही घरगुती औषधं घ्या. हॉस्पिटलमध्ये जायचंच असेल, तर पोलिस फाइल आणि कागदपत्रं मागतात. आता ते सगळं आम्ही कुठून आणायचं?”
गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या भीषण जातीय दंगलीमध्ये विस्थापित झालेल्या ५० हजार लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी काही धर्मादाय संस्थांनी ज्या ८१ वसाहती बांधल्या, त्यातली ही एक, सिटिझन नगर. लॉकडाऊन हे सिटिझन नगरच्या रहिवाशांचं दु:स्वप्न आहे.
तसंच, ‘सगळ्यांनी एकत्र येऊया आणि लॉकडाऊन पाळत कोरोनाव्हायरसचा संसर्ग देशभर पसरण्यापासून रोखूया’ असं सांगणाऱ्या अमिताभ बच्चनला टीव्ही स्क्रीनवर पाहाणं, हेही.
“हातावर हात ठेवून घरातच बसायचंय सगळ्यांनी, तर मग हात धुवायचे तरी कशासाठी?” रेश्मा सय्यद विचारते. रेश्मा सिटिझन नगरमधली ‘लीडर’ आहे. सगळे प्रेमाने तिला रेश्मा आपा म्हणतात. सिटिझन नगर ही २००२ च्या गुजरात दंग्यांमधल्या दंगलग्रस्तांची, नरोडा पाटिया विभागातल्या रहिवाशांची पुनर्वसन वसाहत आहे. अहमदाबादमध्ये अशा १५ वसाहती आहेत. कॉलनीच्या गेटवरची दगडी पाटी सांगते की, केरळ राज्य मुस्लिम रिलीफ कमिटीच्या मदतीतून ती २००४ मध्ये उभी राहिली आहे. त्या वेळेला इथे पहिली ४० कुटुंबं आली. दोनच वर्षांपूर्वी त्यांनी आपलं सर्वस्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना पाहिलं होतं.










