सकाळी सकाळी सुनीता साहू कष्टाने कुशीवर वळल्या आणि विचारू लागल्या, “मुलं कुठे आहेत?” त्यांचे पती बोधराम म्हणाले की ते झोपी गेलेत. त्यांनी सुस्कारा टाकला. अख्खी रात्र त्या जाग्या होत्या. आणि बोधराम मात्र चिंतेत पडले होते. एरवी ते मस्करीत म्हणायचे की सुनीताला कुठेही आणि कधीही झोप लागू शकते.
पण २८ एप्रिलच्या रात्री बोधराम आणि सुनीताची तिन्ही मुलं (१२ ते २० वयोगटातली) मोहरीच्या कोमट तेलाने आळीपाळीने आईचे हात-पाय, डोकं आणि पोट चोळून देत होते. सुनीता वेदनेने विव्हळत होत्या. “मला काही तरी होतंय,” त्या पुटपुटल्या. बोधराम यांना त्या दिवशी सकाळी काय घडलं ते आठवून सांगत होते.
साहू कुटुंब लखनौ जिल्ह्याच्या खरगपूर जागिरमधल्या एका झोपडपट्टीत राहतात. मूळचे छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातल्या मारो गावचे हे रहिवासी सुमारे वीस वर्षांपूर्वी ते इथे रहायला आले. ४२ वर्षीय बोधराम बांधकामावर गवंडीकाम करतात. ३९ वर्षीय सुनीता घरचं पहायच्या.
एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशाला कोविड-१९ महासाथीच्या दुसऱ्या लाटेने वेढून टाकलं होतं. २४ एप्रिल रोजी राज्यात ३८,०५५ नव्या रुग्णांची नोंद झाली होती – राज्यासाठी हा उच्चांक होता. अर्थात रुग्णांचे आकडे खूप कमी दाखवले असण्याची चिंताही इथे व्यक्त करण्यात आली होती.
“प्रत्यक्षात रुग्णसंख्या चार-पाच पटीने जास्त असू शकते. आकडेवारी कमी आहे कारण या आजाराला असलेल्या सामाजिक कलंकामुळे लोक तपासून घेण्यासाठी स्वतःहून पुढे येत नाहीयेत. त्यामुळे खरं चित्र काय आहे ते समजणं अवघड आहे,” रश्मी कुमारी सांगतात. त्या लखनौच्या राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (लोहिया वैद्यकीय संस्था) येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
सुनीताला कोविड-१९ झालेला नाही अशी साहू कुटुंबाला खात्री होती कारण त्यांच्यापैकी कुणालाच आजार झाला नव्हता. त्यांना ताप होता, अंग दुखत होतं आणि जुलाब लागले होते – ही सगळी लक्षणं करोनाच्या संसर्गाकडे निर्देश करत होती.












