सांतो तांती आदिवासी आहे – पण एका विशिष्ट जमातीचा असं म्हणता येत नाही. गेली जवळपास दीडशे वर्षं आसामच्या चहाच्या मळ्यांमध्ये ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, तेलंगण, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशातून आदिवासी कामगार स्थलांतर करून येत आहेत. त्यांच्यातल्या अनेकांचे स्थानिक आदिवासींशी आणि इतर समुदायांशी संबंध आले आहेत. त्यातून तयार झालेल्या समुदायांचा उल्लेख अनेकदा ‘टी ट्राइब्ज - चहाच्या मळ्यातले आदिवासी’ असाही केला जातो.
आसाममध्ये असे साठ लाखांहून अधिक लोक राहतात. आपापल्या राज्यात त्यांची गणना आदिवासी म्हणून होत असली तरी इथे त्यांना तो दर्जा दिला जात नाही. आसाममध्ये १००० च्या आसपास चहाचे मळे आहेत त्यामध्ये १२ लाख कामगार काम करतायत.
रोजची हलाखी आणि अंगमेहनतीमुळे अनेकांच्या सगळ्या आशा आकांक्षाच विझून जातात. पण सांतोचं तसं नाही. तो आपल्या झुमुर गाण्यांमधून भोवतालीचं दुःख मांडतो. ऊन-पावसात, थंडा-वाऱ्यात चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्यांची गाणी तो गातो. चहाच्या प्रत्येक घोटामागे किती जणांची मेहनत आहे ते तो आपल्या गाण्यांमधून सांगतो.