थूथुकोडीच्या रस्त्यांवर जमाव गोळा झाला होता. तसा तर तो तमिळ नाडूत अनेक ठिकाणी झाला होता. त्यात एक अगदी लहानसा मुलगाही होता. क्षणात तो क्रांतीकारी घोषणा देत त्या निदर्शनांचाच भाग झाला. “आज तुम्हाला हे माहितही नाही आणि कळणारही नाही,” ते आम्हाला सांगतात, “पण भगत सिंगचं फाशी जाणं फाशी जाणं हे तमिळनाडूतल्या स्वातंत्र्य चळवळीमधलं एक भावनिक वळण होतं. लोक हबकून गेले होते, किती तरी जण रडत होते.”
“मी ९ वर्षांचा होतो फक्त,” ते हसतात.
आज, ते ९९ वर्षांचे आहेत (१५ जुलै २०२०), एक स्वातंत्र्यसैनिक, भूमीगत क्रांतीकारी, लेखक, वक्ता आणि जहाल बुद्धीवंत होण्यामागे जी धग होती ती मात्र आजही कायम आहे. हा असा माणूस आहे जो १४ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या कैदेतून बाहेर पडला. “त्या दिवशी न्यायाधीश आमच्या तुरुंगात आले आणि त्यांनी आम्हाला मुक्त केलं. आम्हाला मदुराई कट खटल्यातून मुक्त करण्यात आलं होतं. मी मदुराईच्या तुरुंगातून बाहेर पडलो आणि स्वातंत्र्याच्या जल्लोष यात्रेत सामील झालो.”
आज शंभरीची खेळी खेळत असणारे एन. संकरय्या सक्रीय अजूनही सक्रीय आहेत. ते व्याख्यानं देतात, चर्चांमध्ये भाग घेतात. अगदी २०१८ मध्येही ते चेन्नईचं उपनगर असलेल्या क्रोम्पेटमधल्या आपल्या घरून तमिळ नाडू पुरोगामी लेखक व कलावंत संमेलनाला आले होते. आम्ही तेव्हाच त्यांची मुलाखत घेतली होती. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाल्यामुळे त्यांना त्यांचं पदवीचं शिक्षण काही पूर्ण करता आलं नाही मात्र याच माणसाने पुढे अनेक राजकीय पत्रिका, पुस्तिका, पत्रकं आणि वर्तमानपत्रात लेखन केलं.
पण नरसिंहलु संकरय्यांची द अमेरिकन कॉलेजमधली इतिहास विषयातली पदवी मिळता मिळता राहिली. मदुराईतल्या १९४१ मध्ये अंतिम परीक्षेला केवळ दोन आठवडे होते, पण त्यांना ती देता आली नाही. “मी महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेचा सहसचिव होतो.” याच हुशार विद्यार्थ्याने महाविद्यालयात काव्य मंच सुरू केला होता आणि फूटबॉलमध्ये प्रतिनिधीत्वही केलं होतं. त्या काळातल्या इंग्रज विरोधी कारवायांमध्येही ते सक्रीय होते. “माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये डाव्या विचारसरणीकडे झुकणाऱ्या अनेकांशी माझी मैत्री झाली होती. सामाजिक सुधाराशिवाय स्वातंत्र्य परिपूर्ण नाही हे मला समजलं होतं.” वयाच्या १७ व्या वर्षीच ते (तेव्हा बंदी घातलेल्या आणि भूमीगत) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते.
अमेरिकन कॉलेजची विचारसरणी सकारात्मक होती, त्यांना स्मरतं. “संचालक आणि काही प्राध्यापक अमेरिकन होते, बाकी सारे तमिळ. त्यांनी खरं तर तटस्थ राहणं अपेक्षित होतं, पण ते काही इंग्रजांची कड घेणारे नव्हते. विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना मोकळीक होती...” १९४१ साली, इंग्रज विरोधी निदर्शनांमध्ये भाग घेतला म्हणून अण्णामलई विद्यापीठाच्या मीनाक्षी या विद्यार्थिनीला अटक करण्यात आली होती, त्या विरोधात मदुराईमध्ये एक बैठक बोलावण्यात आली होती. “आणि, आम्ही एक पत्रक काढलं. वसतिगृहातल्या आमच्या खोल्यांवर धाडी पडल्या, आणि माझ्या मित्राकडे, नारायणस्वामीकडे पत्रक सापडलं म्हणून अटक करण्यात आली. त्यानंतर आम्ही त्याच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शनं केली...








