पाणिमाराचे स्वातंत्र्य सैनिक एकाच वेळी अनेक लढाया लढत होते. त्यातल्या काही तर घरीच चालू होत्या.
गांधीजींनी अस्पृश्यतेच्या विरोधात हाक दिली आणि त्यांनी ती लागलीच अंमलात आणली.
“एक दिवस आम्ही ४०० दलितांना घेऊन गावच्या जगन्नाथाच्या मंदिरात प्रवेश केला”, चामरू सांगतात. ब्राह्मणांना हे अजिबात आवडलं नाही. पण त्यांच्यातल्या काहींनी आम्हाला पाठिंबाही दिला. त्यांचा नाईलाज असावा कदाचित. तेव्हा माहोलच तसा होता. गौंटिया (गावचा पुढारी) देवळाचा विश्वस्त. तो भयंकर चिडला आणि निषेध म्हणून गाव सोडून गेला. त्याचा मुलगा मात्र वडलांच्या भूमिकेशी फारकत घेत आमच्यात सामील झाला.
“इंग्रजी वस्तूंवर बहिष्कार सगळे मनोमन पाळत होते. आम्ही फक्त खादीच वापरत होतो. तीसुद्ध स्वतः विणून. त्याच्यामागे पक्की विचारधारा होती. आमची परिस्थिती फार बिकट होती त्यामुळे खरं तर हे आमच्या पथ्यावरच पडलं.
स्वातंत्र्य संग्रामाला एवढी वर्षं उलटली तरी स्वातंत्र्यसैनिकांनी खादीचा वापर सोडलेला नाही. बोटं सूत कताई आणि खादी विणेनाशी झाली तोपर्यंत तर नाहीच. “मागच्या वर्षी, नव्वदी पार केल्यावर, मी विचार केला की आता काही हे जमायचं नाही,” चामरू सांगतात.
“या सगळ्याची सुरुवात १९३० साली संबलपूरमध्ये भरलेल्या काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात झाली. शिबिराचं नाव ‘सेवा’ असलं तरी प्रत्यक्षात तुरुंगात कसं रहावं लागतं याचंच प्रशिक्षण आम्हाला दिलं जात होतं. संडास साफ करणं, अतिशय निकृष्ट खाणं, वगैरे. हे नक्की कसलं प्रशिक्षण आहे ते आम्हाला कळून चुकलं होतं. आमच्या गावचे नऊ जण या शिबिरासाठी आलो होतो."
“संपूर्ण गाव आम्हाला निरोप द्यायला जमा झालं होतं. गळ्यात फुलांचे हार, कपाळावर गंध आणि फळं देऊन आमचा सत्कार झाला. असा सगळा उत्साह होता. लोकांसाठी ते सारं फार मोलाचं होतं.
“या सगळ्याच्या पाठी महात्मा गांधी या नावाची काही तरी जादू होतीच. सत्याग्रहात सामील व्हा असं आवाहन करणारं त्यांचं पत्र वाचून आमच्या अंगात जणू वारं संचारलं होतं. आम्ही निरक्षर, दरिद्री लोकही बंड पुकारून आमचं भागधेय बदलू शकणार होतो. पण आम्ही अहिंसेची शपथही घेतली होती. आणि काय करायचं आणि काय करायचं नाही याचे काही नियमही होतेच.”
त्यांच्यापैकी कुणीच गांधीजींना प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. खरं तर असे लाखो लोक होते ज्यांनी गांधींनी कधीही पाहिलं नव्हतं. पण त्यांनी दिलेली हाक त्यांच्या हृदयाला भिडली होती. “आमच्यासाठी मनमोहन चौधरी आणि दयानंद सतपतींसारखे काँग्रेसचे नेते आमचं प्रेरणास्थान होते. १९४२ चा ऑगस्ट उजाडण्याआधीच पाणिमाराचे हे स्वातंत्र्यसैनिक तुरुंगाची वारी करून आले होते. “आम्ही शपथ घेतली होती. युद्धाला (दुसऱ्या महायुद्धाला) कसल्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा प्रत्यक्ष सहभाग म्हणजे दगा-फितुरी. पापच ते. युद्धाचा विरोध करायचाच, पण तोही अहिंसक मार्गानी. गावच्या सगळ्यांचाच आम्हाला पाठिंबा होता.
“आम्ही सहा आठवडे कटकच्या तुरुंगात होतो. इंग्रज फार काळ कुणाला तुरुंगात ठेवत नसत. कसे ठेवणार? हजारो लोक आधीच तुरुंगात डांबलेले होते. आणि अटक करून घेणाऱ्यांची संख्या तर दिवसागणिक वाढतच चालली होती.”




