गावाकडे अशी वाहतूक नेहमीचीच. रिकाम्या किंवा बाजारात माल सोडून परत जाणाऱ्या ट्रक किंवा टेम्पोचे ड्रायव्हर सिटा भरतात आणि दोन पैसे कमवतात. कुणीही यातून प्रवास करू शकतं – तुम्हीसुद्धा. पण आठवड्याचा बाजार करून परतणाऱ्यांच्या गर्दीत तुम्हाला गाडी सापडणं आणि त्यातही जागा मिळणं काही सोपं नाहीये. भारताच्या दुर्गम गाव पाड्यांवर जवळपास सगळेच ट्रक किंवा लॉरी ड्रायव्हर अशी भाडी घेत जातात, अर्थात आपल्या मालकाचा डोळा चुकवून. ज्या भागात दळणवळणाच्या बऱ्या सोयी नसल्यात जमा आहेत, तिथे खरं तर ते मोठी सेवाच पुरवत असतात म्हणा ना – अर्थात त्याचे पैसे मोजावे लागतात.
ओडिशाच्या कोरापुटमधल्या एका महामार्गाजवळचं हे दृश्य. अंधारून यायला लागलं होतं आणि लोकांची घरी परतायची लगबग सुरू होती. अशा वेळी एखाद्या गाडीत नक्की किती लोक चढलेत हे कळणं सुद्धा कठीण असतं. माहित असतं फक्त ड्रायव्हरला, कारण त्याने पैसे घेतलेले असतात. पण त्याचा अंदाजही कधी कधी चुकतोच. कारण तो लोकांकडून त्यांच्या सामानाप्रमाणे वेगवेगळे पैसे घेत असतो. कुणाकडे कोंबड्या असतात, तर कुणाकडे बकरं. काही जणांकडे बोजा मोठा असतो. म्हाताऱ्या-कोताऱ्यांकडून किंवा त्याच्यासोबत नेहमी ये-जा करणाऱ्यांना तो थोडी सूटही देत असतो. महामार्गावर ठरलेल्या ठिकाणी तो त्या त्या प्रवाशांना उतरवत जातो. तिथून अंधाऱ्या वाटेने, राना-वनातून झपाझप पाय टाकत ते आपापल्या घरी जातात.
इथल्या बाजारात यायला अनेकांना ३० किलोमीटरहून जास्त प्रवास करावा लागला होता कारण त्यांची घरं महामार्गापासून बरीच आतल्या भागात आहेत. १९९४ साली २० किलोमीटर अंतरासाठी दोन ते पाच रुपये भाडं पडत होतं. रस्ता किती खडतर आहे त्यावरही हे अवलंबून असायचं म्हणा. आणि ड्रायव्हरच्या मनावरही. प्रवाश्याला किती घाई आहे आणि दोघांचं वाटाघाटीचं कौशल्य किती ते इथे कामी यायचं. मी स्वतः हजारो किलोमीटर असाच प्रवास केलाय, त्यातून सांगतो, माझ्यापुढची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मला मागच्या माणसांच्या गर्दीत बसायचं आहे हे ड्रायव्हरला पटवून सांगणं. अगदी गाडीच्या टपावर देखील चालेल, पण गाडीत नाही.



