“तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला आपले अधिकार आणि स्वातंत्र्य कशामुळे मिळालं? भारत का संविधान.” असं सांगत रामप्यारीनं आपल्या फिरत्या दुकानातली पुस्तकं चाळणाऱ्या एका गिऱ्हाईकासमोर घटनेचं पुस्तक धरलं. हे त्याच्या दुकानातलं सर्वात जाड आणि जड पुस्तक होतं. छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यामधल्या घोटगाव गावात एक हाट (बाजार)भरला होता. यातच त्याचा पुस्तकांचा फिरता ठेला उभारला होता. जोरादाबारी रयत या त्याच्या खेड्यापासून साधारण तेरा किलोमीटरवर, धमतरच्या नगरी तालुक्यात हा आठवडी बाजार भरतो.
लिहिता-वाचता न येणारा रामप्यारी त्याच्या दुकानातल्या वस्तू बघायला येणाऱ्या प्रत्येकाला राज्यघटनेचं महत्व सांगत होता. त्याची संभाव्य गिऱ्हाईकं त्याच्यासारखीच आदिवासी समाजातली होती; आणि तो पुस्तकविक्रेता त्यांना अगदी उत्साहानं भारताच्या राज्यघटनेची ओळख करून देत होता.
रामप्यारी म्हणाला, “हे असं पवित्र पुस्तक आहे, जे प्रत्येकानं घरात ठेवायला हवं आणि त्यातून आपले हक्क आणि कर्तव्य यांच्याबद्दल शिकायला हवं. तुम्हाला माहित आहे का, भारताच्या घटनेतल्या तरतुदी आणि पाचव्या आणि सहाव्या अनुसूचीमुळे [आदिवासी समुदायांना विशेष संरक्षण] आपल्याला (आदिवासी) आणि दलितांना (उच्च शिक्षण आणि सरकारी नोकरी यांमधे) आरक्षण मिळतं” तो घोटगावच्या हाटसाठी म्हणजेच आठवडी बाजारासाठी आलेल्या लोकांना सांगत होता. हे लोक मुख्यतः वाणसामान, भाजी आणि गरजेच्या इतर वस्तू घेण्यासाठी तिथे आले होते.
रामप्यारीकडे पाहिलं तर तो साधारण पन्नाशीचा असल्यासारखा दिसतो. तो गोंड समाजातला आहे. हा छत्तीसगडमधला सर्वात मोठा आदिवासी गट असून या राज्यातली एक तृतीयांश लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे. तो विकत असलेली बहुतेक पुस्तकं हिंदीत लिहिलेली आहेत - तिसरी आझादी की सिंहगर्जना, बिरसा मुंडा - सचित्र जीवनी, भ्रष्टाचार आणि हिंदू आदिवासी नही है. त्याच्याकडची काही पुस्तकं गोंडी भाषेत लिहिलेली आहेत आणि काही मोजकी इंग्लिशमध्ये.. जेव्हा कोणी एखादं पुस्तक उचलून बघायला लागतं, तेव्हा पुस्तकाचं छोटं परीक्षण सांगावं तसं रामप्यारी त्यात काय आहे हे सांगायला लागतो.







