या नगरातली मुलं अनाथ आहेत का?
१. कॅलेंडर पाहा
ऑगस्ट येतो आणि निघून जातो
ज्यांना घालवता येत नाही, त्यांच्या डोळ्यांतून पाझरतो,
थरथरणाऱ्या हातातून खाली पडतो आणि भंगून जातो
नाकात शिरून श्वास घेऊ देत नाही
प्राण हिरावून घेतो
कोणाचं दुःस्वप्न
तर कोणाचा गळफास
माझ्या गोरखपूरच्या मातांचा लडिवाळ आहे
ऑगस्ट काही जणांसाठी वर्षभराचा काळ आहे
२. पण सगळे म्हणतात आयांची भीती खरी नाही
सगळे म्हणतात वडलांनीही खोटं सांगितलंय
इस्पितळात प्राणवायू न मिळण्याची बातमी,
एका मुघल सुलतानाचा डाव होता
खरं तर इतका प्राणवायू उपलब्ध आहे
की प्रत्येक गल्लीबोळात
प्राणवायूचा श्वासोच्छ्वास करत असते गोमाता
इतकं सहज आहे की आता तर प्राणवायूचं नाव ऐकताच
गुदमरू लागतो जीव
३. ही कोणाची मुलं आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर अनाथ होत चाललेत
ही कोणाची मुलं आहेत ज्यांना गटारात जन्मलेले डास चावतात
ही कोणाची मुलं आहेत
ज्यांच्या हातात बासरी नाही
कोण आहेत त्यांचे मायबाप
येतात कुठून हे लोक…
ज्यांच्या झोपड्या दुसऱ्या जगाची
झलक बघत असता दिसतच नाहीत
ज्यांच्या घरी मध्यरात्रीच्या प्रहरी
कृष्ण अवतार घेत नाहीत,
नुसताच जन्म घेतात
आणि यांना प्राणवायू हवाय!
यांना हव्यात इस्पितळात खाटा!
कमाल आहे!
४. गोरखाची भूमी दुभंगू लागलीये
कबीर शोकनृत्यात लीन आहे
आगीच्या ज्वाळांमध्ये जळतायत राप्तीचे किनारे
ज्या शहराने ओक्साबोक्शी रडायला हवं
ते मूग गिळून बसलंय
गावचे महंतांचं सांगणं आहे
देवांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी
मुलांचा बळी द्यावा लागतो म्हणे.



