सकाळचे ६ वाजले आहेत आणि शरण्या बलरामन गुम्मिडिपूंडीतील आपल्या घरातून निघायच्या तयारीत आहेत. चेन्नईजवळील तिरूवल्लूर जिल्ह्यातल्या या छोट्याश्या शहरातील रेल्वे स्थानकावरून त्या आपल्या तीन मुलांसह लोकल ट्रेन पकडतात. साधारण दोन तासांनी ४० किलोमीटरवरील चेन्नईच्या मुख्य स्थानकावर पोहोचतात. इथून मुलांच्या शाळेत पोहोचण्यासाठी ही आई व तिची तीन मुलं आणखी १०-१२ किमी लोकलने प्रवास करतात.
दुपारी ४ वाजता असाच परतीचा प्रवास सुरु होतो आणि घरी येईस्तोवर साधारण संध्याकाळचे ७ वाजलेले असतात.
घरापासून शाळेपर्यंतचा हा १०० किमीचा प्रवास आठवड्यातून पाच वेळा करावा लागतो. शरण्यासाठी ही एक मोठीच कामगिरी आहे. याविषयी सांगताना त्या म्हणतात, “पूर्वी (लग्नाआधी) बस किंवा ट्रेनमध्ये कुठून बसायचं, एवढेच काय तर कुठे उतरायचं हे देखील मला माहित नव्हतं.”

























