“पिलिग [१९९४] आला, चिकुनगुन्या आला [२००६] अहो भूकंप झाला [१९९३] तेव्हा देखील कधी मंदिर बंद झालं नव्हतं. इतिहासात पहिल्यांदा हे असलं होतंय,” उद्विग्न झालेले संजय पेंदे म्हणतात. तुळजापुरातल्या तुळजा भवानी मंदिरात ते मुख्य पुजाऱ्यांपैकी एक आहेत.
मंगळवारी, १७ मार्च २०२० रोजी कोविड-१९ चा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी राज्याने केलेल्या उपायांचा भाग म्हणून भाविकांसाठी मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा धक्का इथल्या लोकांना अजूनही पचवता आलेला नाही. “असला कसला आजार आलाय? परगावहून भाविक यायला लागलेत पण त्यांना बंद दरवाज्यातून बाहेरून कळसाचं दर्शन घेऊन जावं लागतंय. तेवढं तर घेऊ द्या म्हणून आता पोलिसांशी मी-तू झालीये आमची,” ३८ वर्षीय पेंदे सांगतात. मंदीर बंद म्हणजे आता दिवसाला त्यांच्या ज्या काही १०-१५ पूजा असतात त्याही बंद होणार. म्हणजेच त्यांची दक्षिणाही. त्याचाही त्रागा त्यांच्या बोलण्यातून जाणवतो. पेंदेंच्या अंदाजानुसार तुळजापुरात देवीची पूजा, अभिषेक करणारे किमान ५००० पुजारी असावेत. देवळावरच त्यांची घरं चालतात.
बालाघाटच्या रांगा सुरू होतात त्या डोंगरावर १२ व्या शतकात बांधलेल्या या मंदिराभोवतीच या नगराचं (लोकसंख्या ३४,०००, जनगणना-२०११) अर्थकारण फिरतं. महाराष्ट्रातल्या आणि बाहेरच्या राज्यातल्या अनेकांची ही कुलदेवता आहे आणि राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक आहे. भाविकांच्या यात्रेच्या मार्गावरील देवतांच्या अनेक मंदिरांपैकी हे प्रमुख मंदिर आहे.









