उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी कोविड-१९ ची दुसरी लाट आली. दार न वाजवता थेट आत घुसली. तुळजापूर तालुक्यावर आलेल्या संकटाला तुळजा भवानीचं मंदीरही कारणीभूत ठरलं.
जयसिंह पाटील कोविड-१९मुळे मरता मरता वाचले. धोका टळेपर्यंत त्यांनी मंदिरापासून चार हात लांब रहायचा निश्चय केलाय. "लोकांच्या श्रद्धेचा मी आदर करतो. पण महामारी दरम्यान मंदिरं उघडणं योग्य नाही."
४५ वर्षीय पाटील तुळजा भवानी मंदिर ट्रस्टमध्ये कारकून आहेत. "यंदाच्या फेब्रुवारीत मला शेकडो भक्ताच्या रांगेकडे लक्ष द्यायला सांगण्यात आलं," ते म्हणतात. हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी एक असून भारतभरातून दररोज हजारो भाविक इथे दर्शनाला येत असतात. "भक्त अरेरावी करतात. मंदिरात जाण्यापासून थांबवलं तर अंगावर धावून येतात. मला गर्दीला आवर घालत असतानाच कोविड-१९ झाला असणार."
ते दोन आठवड्यांहून अधिक काळ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर होते. त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण ७५-८० टक्के होतं – डॉक्टरांच्या मते ९२ टक्क्यांपेक्षा कमी प्रमाण म्हणजे धोक्याची घंटा आहे. "मी कसाबसा वाचलोय," जयसिंह म्हणतात. "इतके महिने झाले, अजूनही थकायला होतं."











