नागी रेड्डी तमिळ नाडूचे रहिवासी आहेत, कन्नड बोलतात आणि त्यांना तेलुगु वाचता येते. डिसेंबर महिन्यातल्या एका सकाळी आम्ही काही किलोमीटर अंतर चालत जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांनी अगदी सहज “ते काय तिकडेच आहे” असं सांगितलं खरं पण ते तिकडे म्हणजे एका तुडुंब भरलेल्या तळ्याच्या काठाने, चिंचेच्या झाडापुढून, नीलगिरीची एक टेकडी ओलांडल्यावर, आमराईच्या खाली. राखणीला एक कुत्रा, केकाटणारं पिलू आणि जनावराचा गोठा होता अगदी तिथेच.
शेतकऱ्याला भेडसावणाऱ्या कटकटी आणि डोकेदुखी तर नित्याचीच पण नागी रेड्डींना एक गोष्ट इतकी सतावतीये की आता पिकं बदलावी की काय इथपर्यंत ते येऊन पोचलेत. आणि याला कारण ठरलेत तीन अजस्त्र, भयंकर वल्लीः मोट्टई वाल, मखना आणि गिरी.
शेतकऱ्यांना एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे. या तिघांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अक्षरशः नाही. एकेकाचं वजन जर ४,००० ते ५,००० किलो असलं, तर नाहीच. चाल करून येणाऱ्या या हत्तींचं नेमकं वजन किती, त्यांची नेमकी उंची किती याचा तपास गावकऱ्यांनी लावलेला नाही, त्याबद्दल त्यांना माफ करू टाकू या.
आम्ही तमिळ नाडू आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरच्या कृष्णगिरी जिल्ह्यामध्ये आहोत. देनकनीकोट्टई तालुक्यातल्या नागी रेड्डींचा वडरा पालयम हा पाडा जंगलापासून, हत्तींपासून फार काही दूर नाही. सिमेंटचं पक्कं बांधकाम केलेल्या त्यांच्या ओसरीत आम्ही बसलोय ती देखील त्यांच्या शेतापासून हाकेच्या अंतरावर. ८६ वर्षांच्या नागी रेड्डींना गावकरी प्रेमाने नागण्णा म्हणतात. अत्यंत पौष्टिक अशी नाचणी ते पिकवतात. गेल्या तीन दशकांमध्ये शेतीमध्ये काय काय बदलत गेलं त्या सगळ्याचे ते साक्षीदार आहेत. आणि यातलं बरंच काही चांगलं, वाईट आणि अनेकदा तर विदारक आहे.
“मी लहान होतो तेव्हा आनई (हत्ती) नाचणीच्या हंगामात वासाला भुलून काही दिवस शेतात यायचे.” आणि आता? “आता सारखेच यायला लागलेत. पिकं आणि फळांवर ते ताव मारतात.”
यामागे दोन कारणं आहेत, नागण्णा तमिळमध्ये सांगतात. “१९९० नंतर या जंगलातल्या हत्तींची संख्या एकदम वाढली पण जंगलाचा आकार आणि झाडझाडोरा मात्र कमी झाला. त्यामुळे भूक लागल्यावर ते इकडे यायला लागले. आणि आपण कसं एखाद्या चांगल्या ठिकाणी खाऊन आलो की आपल्या मित्रमंडळींना सांगतो, तसंच त्यांचंही आहे,” त्यांनी दिलेल्या उपमेचा त्यांना खेद वाटतो आणि मला आश्चर्य.
































