“अच्छा, ती फक्त आपल्या ‘गेस्टहाउस’ची चौकशी करायला आलीये,” राणी आपल्या ‘रुममेट’ला, लावण्याला सांगते. माझ्या भेटीचा उद्देश काय ते समजल्यावर दोघी हुश्श करतात.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला आम्ही जेव्हा या गेस्टहाउसबद्दल चौकशी सुरू केली, तेव्हा मदुराई जिल्ह्याच्या टी. कल्लूपट्टी तालुक्यातल्या कूवालपुरम गावामध्ये एकदम खळबळच उडाली. दबक्या आवाजात बोलत काही पुरुषांनी दोन बायांकडे बोट दाखवलं. तरुण वयाच्या या दोघी आया दूर एका ओसरीवर बसलेल्या होत्या.
“ते तिथे पलिकडे आहे, चला,” त्या म्हणतात आणि जवळ जवळ अर्धा किलोमीटर अंतरावर गावाच्या एका टोकाला त्या आम्हाला घेऊन जातात. विराण जागेतल्या दोन खोल्या म्हणजेच ते तथाकथित ‘गेस्टहाउस’. आम्ही गेलो तेव्हा रिकामंच होतं. गंमत म्हणजे या दोन खोल्यांच्या मध्ये असलेल्या कडुनिंबाच्या झाडावर अनेक पिशव्या मात्र लटकत होत्या.
या गेस्टहाउसचे ‘गेस्ट’ कोण, तर पाळी चालू असणाऱ्या स्त्रिया. अर्थात त्या काही इथे कुणी निमंत्रण दिलं म्हणून किंवा स्वतःच्या मर्जीने येत नाहीत. आपल्या गावच्या कर्मठ प्रथांमुळे त्यांना इथे वेगळं बसावं लागतं. कूवालपुरम हे ३००० वस्तीचं गाव मदुराई शहरापासून ५० किलोमीटरवर आहे. गेस्टहाउसमध्ये आम्ही ज्या दोघींना भेटलो, त्या राणी आणि लावण्या (नावं बदलली आहेत) इथे पाच दिवस राहतील. पण पहिली पाळी आलेल्या मुलींना तसंच बाळंतिणींना मात्र आपल्या नवजात बाळासकट इथे महिनाभर रहावं लागतं.
“आम्ही आमचं सामानसुमान आमच्याबरोबर खोलीतच ठेवतो,” राणी सांगते. पाळी सुरू असताना बायांना जी वेगळी भांडी वापरावी लागतात, ती या पिशव्यांमध्ये आहेत. इथे खाणं बनवलं जात नाही. घरून, बहुतेक वेळा शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी बनवलेलं अन्न या भांड्यांमध्ये भरून ठेवलं जातं. आणि स्पर्श होऊन विटाळ होऊ नये म्हणून या पिशव्या अशा झाडाल्या लटकवल्या जातात. प्रत्येक ‘गेस्ट’साठी खास वेगवेगळी भांडी असतात – अगदी एकाच घरातल्या 'पाहुण्या' असल्या तरी. पण खोल्या मात्र दोनच आणि त्यातच सगळ्यांनी मुक्काम करायचा.











