भगौली साहू जवळ जवळ रोज जो हंगाम असेल त्यानुसार गवताचे किंवा तनिसाचे दोन भारे घेऊन शंकरदा गावाहून धमतरी शहरात चालत जातात. ते हे गवत किंवा तनिसाचा भारा बांधून त्याची कावड खांद्यावर तोलतात. छत्तीसगडच्या रायपूरहून ७० किलोमीटरवर असणाऱ्या धमतरीमध्ये ते हा चारा पशुपालन करणाऱ्यांना विकतात.
धमतरीची त्यांची ही वारी गेली अनेक वर्षं चालू आहे – आठवड्यातले चार दिवस, कधी कधी सहा, सगळ्या ऋतूत. सकाळी सायकलवर शाळेत जाणारी मुलं, शहरात कामाच्या शोधात निघालेले मजूर, कारागीर आणि बांधकाम मजुरांच्या बाजूने रस्त्याच्या कडेने भागौली चालत असतात.
भागौली ७० वर्षांचे आहेत. अंदाजे ४.५ किमी अंतरावर असणाऱ्या धमतरीला पोचायला त्यांना तासभर लागतो. कधी कधी तर अशा दोन खेपा करतात – म्हणजे एकूण १८ किलोमीटर. यामध्ये शेतकऱ्यांकडून तनीस विकत घेण्यासाठी किंवा ओढ्याशेजारी, भाताच्या खाचराच्या किंवा रस्त्याच्या कडेला वाढलेलं गवत कापण्यासाठी लागणारा वेळ धरलेला नाही.




