प्रल्हादसिंग टिपनिया, शबनम विरमणी [द कबीर प्रोजेक्ट] कबीर भजन गाण्यासाठी एकतारीचा उपयोग करतात.
एकतारी हे वाद्य देशभर आढळते. भजनी लोकांजवळ व भटक्या गायकाजवळ ते असते. त्याची लांबी सुमारे 100 - 110 सेंटिमीटर असते. एकतारी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. कर्नाटकात एकतारी हे वाद्य ‘एकनाद’, पंजाबमध्ये ‘तंबी’, बंगालमध्ये ‘बाउल’, नागालँडमध्ये ‘ताती’ आणि तेलंगणा व आंध्रात ‘बुरा वीणा’ म्हणून ओळखलं जातं. ताती हा शब्द येणेही भाषेतील आहे.मही भाषा आज प्रमुख्याने नागालँडमधील अंगामी नागा बोलतात.
एकतारीच्या बुडाला घोषक म्हणून बहुदा चपटा भोपळा वापरतात. त्याच्या निरुंद बाजूला आरपार भोक पाडून त्यात वेळूचा दांडा बसवतात. दांड्याचे एक टोक खालच्या भोकातून थोडेसे बाहेर येते तिथे तार बांधतात. व ती भोपळ्याच्या तबकडीवरील घोडीवरून पुढे दांड्याच्या दुसऱ्या टोकाचा खुंटीला गुंडाळतात. तबकडी चामड्याची असते. खुंटीच्या बाजूला तार उचलून धरण्यास मेरू नसतो. दांडा एका हातात धरून त्याच हाताच्या तर्जनीने तार छेडतात.
एकतारी ही इतर संगीत वाद्याच्या तुलनेने बनवण्यास अत्यंत सोपी आहे. भोपळा, लाकूड आणि तार या सहज उपलब्ध होणाऱ्या स्थानिक संसाधनातून ती बनवली जाते. आवाज घुमण्यासाठी भोपळा हे उत्तम साधन आहे. भोपळ्याचा वापर आफ्रिकेत अधिक दिसतो. एकतारीचा उपयोग मुख्यतः एक सूर पकडण्यासाठी असतो. एकतारी मध्ये लय आणि स्वर मिळतो. आणि त्या लयीवर ठेका पकडता येतो. बोटाने एकतारीवर स्ट्रोक मारल्यानंतर एक ठेका मिळतो. त्या ठेक्यावर आणि तारेच्या तरंगाच्या स्वरातून गायकाला बरोबर स्वतःचा सूर जुळवता येतो. त्यामुळे भजन आणि गाणे अधिकच श्रवणीय बनते. एकतारी हे आदिम संगीत वाद्य आहे. या एकतारीची सुरुवात धातूच्या तारेतून झालेली नाही, तर चामड्यातून झालेली आहे. प्राण्याच्या चामडीच्या आतल्या पापुद्र्यापासून पहिली एकतारी बनवली गेली! चामड्याची तार असलेली एकतारी आजही कर्नाटकात, खास करून यल्लमाच्या संगीतवाद्यात वापरली जात आहे. त्याला ‘झुंबरुक’ म्हणतात. झुंबरुकमध्ये वापरली जाणारी तार ही धातूची नसून चामड्याची असते. चामड्याला चामडे जोडून त्यापासून पहिला रिदम आणि स्वर तयार झाला. आणि हे पहिले संगीत वाद्य तयार झाले. शेती व्यवस्थेत लोखंडाचा शोध लागला तेव्हा धातूचा उपयोग करण्यात आला. जगात वेगवेगळ्या ठिकाणी तार वापरलेली एक-तारी वाद्यं अस्तित्वात आली. उपेक्षित वर्गाची वाद्ये त्यांच्या भटक्या जीवनशैलीला अनुरूप बनवली गेली.
भारतात एकतारी भक्ती चळवळीतून विकसित झाली असे म्हटले जाते. परंतु हे ऐतिहासिक तत्त्वाला धरून नाही. एकतारी संत कबीर, मीराबाई, आणि सुफी संतांमध्ये दिसत असली तरी महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील संत नामदेवांपासून तुकारामांपर्यंत संत हे एकतारी ऐवजी वीणा, चिपळ्या, टाळ आणि मृदंग वाजवायचे. महाराष्ट्रत बहुतेक संतांच्या गळ्यात विणा दाखवली आहे.
मराठी विश्वकोशानुसार "वीणा ही भारतीय संगीतातील एक प्राचीन तंतुवाद्य असून वैदिक मंत्राच्या स्वर-गणनेसाठी तिचा उपयोग केला जायचा.” संत नामदेवापासून तुकारामाच्या गळ्यात वीणा दाखवली जाते. परंतु तुकारामाच्या अभंगात वीणेचा कुठेही साधा उल्लेख सापडत नाही. याउलट श्रमिक समाजाची वाद्यं असलेल्या टाळ, चिपळ्या आणि मृदंगाचा उल्लेख अनेक अभंगात सापडतो.
तुकारामाच्या गळ्यातील वीणा ब्राह्मणी प्रतीक असलेले काल्पनिक चित्र असावे.