बालाभाई चावडा, वय ५७, यांची गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात पाच एकर शेतजमीन आहे. जमीन सुपीक आहे. सिंचित आहे. गेली २५ वर्षं त्यांच्या नावे आहे. मात्र, एकच अडचण आहे. त्यांना स्वतःच्या जमिनीजवळ फिरकण्याची मुभा नाही.
“माझ्याकडे जमिनीचे कागद आहेत,” आपल्या हातातील जीर्ण झालेली कागदपत्रं दाखवून ते म्हणतात, “पण कब्जा वरच्या जातीचे लोकांकडे आहे.”
अनुसूचित जातीत मोडणाऱ्या चमार जातीच्या बालाभाईंनी शक्य तितक्या लोकांकडे मदतीची मागून पाहिली – आता तर आणखी काही पर्यायही उरलेले नाहीत. “रोज निराश होऊन आपल्या जमिनीकडे जातो,” ते म्हणतात. “दुरून नजर फिरवतो अन् आपलं आयुष्य कसं असतं याची कल्पना करत राहतो...”
बालाभाई यांना १९९७ मध्ये गुजरातच्या जमीन वाटप धोरणाअंतर्गत ध्रांगध्रा तालुक्यातील भरड गावातील एक शेतजमीन मिळाली होती. गुजरात शेतजमीन कमाल धारणा कायदा, १९६० अन्वये अशी 'अतिरिक्त जमीन' “जनसामान्यांच्या कल्याणासाठी” राखीव ठेवण्यात आली होती.
या भूखंडांना संथानी जमीन म्हणतात. सरकारी पडीक जमिनीसोबत अशा जमिनी “शेतीसाठी जमिनीची गरज असलेल्या लोकांकरिता” राखून ठेवण्यात आल्या होत्या. शेतकरी सहकारी संस्था, भूमिहीन व्यक्ती आणि शेतमजूर शिवाय अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना प्राधान्य देण्यात आलं होतं.
ही योजना कागदावरच उत्तम आहे. प्रत्यक्षात फार काही बदललंच नाही.
जमीन त्यांच्या नावे झाल्यावर बालाभाईंनी कापूस, ज्वारी आणि बाजरीचं पीक घ्यायचं ठरवलं. त्या जमिनीवर एक छोटं घर बांधून तिथेच राहायचं असा विचार देखील मनात होता. तेव्हा त्यांचं वय होतं ३२, कुटुंब लहान होतं आणि भविष्य आशादायी वाटत होतं. “तीन लहान मुलं होती,” बालाभाई म्हणतात. “मी तेव्हा मजुरी करायचो. वाटलं होतं कोणाच्या हाताखाली राबायचे दिवस गेले. आता स्वतःची जमीन असल्यावर कुटुंबाचं भलं होऊ शकेल.”








