“माझी आई आणि मी काल रात्रीच यावरून भांडलो,” एकवीस वर्षांची आशा बस्सी सांगते. “साडेतीन वर्षं झाली. माझे आई-वडील शिक्षण सोडून द्यायच्या आणि लग्न लावायच्या मागे लागले आहेत.”
यवतमाळ शहरातील सावित्री ज्योतिराव सामाजिक विद्यालयात अंतिम वर्षाची विद्यार्थिनी, आशा सामाजिक कार्य विषयात पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे. औपचारिक शिक्षण घेतलेली तिच्या कुटुंबातील ती पहिली सदस्य. “ज्या मुली लवकर लग्न करतात त्यांचं कौतुक केलं जातं,” ती म्हणते. "पण मला मात्र शिकायचंय. या सगळ्यातून सुटण्याचा, मुक्तीचा, शिक्षण हा माझ्यासाठी एकच मार्ग आहे.”
यवतमाळ जिल्ह्यातल्या जेवली गावाची रहिवासी असलेली आशा मथुरा लभान समाजाची आहे. राज्यामध्ये या समुदायाची नोंद विमुक्त जातींमध्ये केली जाते. तिचे आई-वडील शेतकरी आहेत. जेवलीमध्ये आपल्या शेतात ते सोयाबीन, कापूस, गहू आणि बाजरी घेतात.
आशाला दोन बहिणी आणि एक भाऊ. या चार मुलांचं पालनपोषण करण्यासाठी हे कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. आशा सर्वात थोरली. आशा यवतमाळ शहरात तिच्या मामा आणि मामीसोबत राहते आणि पदवीचं शिक्षण घेते.
गावातल्या काही शिक्षकांनी आग्रह केला म्हणून आशाच्या पालकांनी तिला वयाच्या ७ व्या वर्षी घराजवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केलं. तिसरीपर्यंत तिथे शिकल्यानंतर ती जेवलीपासून ११२ किलोमीटर दूर यवतमाळ शहरात शिकायला गेली. तिथे तिने महाराष्ट्र बोर्डाच्या शाळेत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर जवळच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.








