तरुण असो की वृद्ध, आपल्या डोळ्यासमोर ग्रामीण भारतीय स्त्रीची एक साचेबद्ध प्रतिमा असते. पारंपरिक वेशभूषा, कमरेवर एक आणि डोक्यावर एक किंवा दोन पाण्याचे हंडे घेऊन तोल सांभाळत चालणारी स्त्री. हे पाणी तिने जिथून आणलेलं असतं, ती गावातली विहीर म्हणजे फक्त पाणवठा नसतो. गोल असो की चौकोनी, देखण्या किंवा साध्या, विहिरीभोवती अनेक कथा गुंफलेल्या असतात. कधी कुणाच्या घट्ट मैत्रीची ती साक्षीदार असते, तर कधी गावातल्या भानगडींची. जातीपातीच्या भेदभावांमुळे कोणी किती आणि कधी पाणी घ्यायचं, कोणी घ्यायचंच नाही, याबद्दलचे नियम आणि त्यावरून उसळलेले वादही तिच्याच भोवती विणले जात असतात.
उभ्या गावाला ‘जीवन’ देणारी ही विहीर गावात मनाविरुद्ध लग्न केलेल्या, सासुरवास सोसणार्या अनेकींना मात्र आपल्या दुःखाची सांगाती वाटत असते. काही क्षण का होईना, विसावा देत असते. या गीतात मात्र सांगाती असलेली ही विहीरही ‘ति’च्या विरोधात गेली आहे. जणू वैर्याच्या घरात तिला देणार्या तिच्याच कुटुंबातल्या पुरुषांची तिची तक्रार ऐकून घ्यायला आता कुणीही नाही.
आपल्या कुटुंबातल्या पुरुषांनी आपल्याशी मांडलेल्या वैराची तक्रार करणार्या, अंजारच्या शंकर बारोट यांनी गायलेल्या या गीतासारखी काही गीतं आजही वेगवेगळ्या विवाहविधींच्या वेळी आवर्जून गायली जातात.



