मळगावच्या पठारावरचा हा दर्गा गावातल्या लोकांचं कामाचं ठिकाण आहे. सातारा जिल्ह्यातला हा दर्गा अनेक शतकांपासून इथे उभा आहे आणि अनेकांनी त्याचा अनेक कामांसाठी आसरा घेतला आहे.
शाळेतली मुलं इथल्या झाडाच्या सावलीत अभ्यास करतात. तरुण मुलं-मुली स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी इथेच येतात कारण उन्हाच्या तलखीत इथेच गार सावली असते. पोलिसभरतीसाठी तयारी करणारी तरुण मंडळी इथेच येऊन इथेच तयारी करतात, इथल्या मोकळ्या माळावर व्यायाम आणि कसरत करतात.
“माझे आजोबा इथल्या काय काय गोष्टी सांगायचे,” ७६ वर्षीय विनायक जाधव सांगतात. त्यांची गावात १५ एकर जमीन आहे. “विचार करा, किती जुना आहे हा दर्गा. हिंदू आणि मुसलमानांनी एकत्र ही जागा जपलीये. आणि एकमेकांबरोबर शांतीत लोक राहू शकतात त्याचं हे प्रतीक आहे.”
मात्र सप्टेंबर २०२३ मध्ये काही तरी बदललं. सगळ्यांची आवडती जागा असलेल्या या दर्ग्याबद्दल वेगळंच काही बोललं जाऊ लागलं. काही तरुण मंडळी म्हणू लागली की हे अतिक्रमण आहे. हिंदुत्ववादी संघटनांची त्यांना चिथावणी होती.
मळगावच्या रहिवाशांपैकी काही २०-२५ वयोगटातल्या काही हिंदू तरुणांनी जिल्हा प्रशासनाला लिहून पाठवलं की हे “अवैध बांधकाम” ताबडतोब काढून घेण्यात यावं. त्यातल्या काहींनी दर्ग्याजवळच्या पाण्याच्या टाकीची मोडतोड केली होती. त्यांच्या पत्रात लिहिलं होतं की “भोवतालची जमीन मुसलमान समाजाला ताब्यात घ्यायची आहे.”













