तेवीस वर्षीय भक्ती कास्टेसाठी आपलं कुटुंब हे सर्वस्व होतं. दहावीनंतर तिने शाळा सोडली आणि ती नोकरी करायला लागली. धाकट्या बहिणी होत्या, त्यांचं शिक्षण सुरू राहायला हवं होतं. एका कंपनीत ती सहाय्यक म्हणून काम करत होती, अथक राबत होती. तिचे वडील आणि मोठा भाऊदेखील दिवसरात्र काम करत होते. त्यांना श्वास घेण्यासाठी फुरसत मिळावी, यासाठी भक्ती त्यांच्या उत्पन्नाला हातभार लावत होती. आपल्या कुटुंबासाठी ती हे सारं करत होती. मे २०२१ पर्यंत असं चालू होतं.
त्यानंतर मात्र ज्यांच्यासाठी काम करावं, असं कुटुंबच राहिलं नाही.
१३ मे २०२१ या दिवशी भारतीच्या कुटुंबातले पाच जण अचानक बेपत्ता झाले. मध्य प्रदेशातल्या देवास जिल्ह्यातील नेमावर गावातलं हे कुटुंब. तिथेच ही घटना घडली होती. बेपत्ता झालेल्यांमध्ये भारतीच्या दोन बहिणी होत्या, १७ वर्षांची रुपाली आणि १२ वर्षांची दिव्या. भारतीची आई होती, ममता (४५). सोबत पूजा (१६) आणि पवन (१४) ही भारतीची दोन चुलत भावंडंही होती. ‘‘कोणाशीच संपर्क होईना आमचा,’’ भारती सांगते. ‘‘रात्र झाली तरी त्यांच्यापैकी कोणीही घरी परतलं नाही आणि मग मात्र आम्ही घाबरलो.’’
भारतीने पोलिसात आपल्या कुटुंबातले पाच जण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
एका दिवसाचे दोन दिवस झाले, दोनाचे तीन. भारतीचे बेपत्ता कुटुंबीय घरी आलेच नाहीत. एकेक दिवस जात होता तसतसं त्यांचं घरात नसणं अंगावर यायला लागलं. भारतीच्या पोटात पडलेला खड्डा वाढायला लागला. घरातली शांतता अधिकच गडद झाली.
काहीतरी वाईट घडलंय असं सारखं मनात यायला लागलं.










