“पहिलं डावं वळण घ्या. थोडं पुढे गेल्यावर काळ्या खांबावर फौजीचा फोटो दिसेल. ते त्याचं घर आहे.” रामगढ सरदारांमधील एक वृद्ध सायकल मेकॅनिक सीमेवरील एका वळणाकडे इशारा करून सांगतो. गावातले लोक अजय कुमारला सैनिक किंवा शहीद म्हणून संबोधतात.
पण भारत सरकारच्या दृष्टीने मात्र तो सैनिकही नाही आणि शहीदही.
जम्मू आणि काश्मीरमधील बंडखोरीविरोधी कारवायांमध्ये या २३ वर्षीय तरुणाने आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत या देशाच्या सीमांचं रक्षण केलं खरं. पण व्यर्थच. त्याचे थकलेले, वृद्ध, भूमिहीन, दलित पालक आपल्या मुलाला पेन्शन मिळावी किंवा शहीद असल्याचा दर्जा मिळावा एवढं साधं स्वप्नही पाहू शकत नाहीत. किंबहुना माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेअंतर्गत किंवा कॅन्टीन स्टोअर्स डिपार्टमेंटच्या सवलतींत मिळणाऱ्या कोणत्याही लाभांसाठी देखील पात्र नाहीत. कारण केवळ इतकंच की अधिकृत सरकारी नोंदीनुसार अजय कुमार हा सैनिक किंवा शहीद नव्हता.
तो फक्त एक अग्निवीर होता.
पण लुधियाना जिल्ह्यातील या गावात तरी सरकारी नोंदींना जरा कमीच महत्व आहे, म्हणायचं. ग्रँड ट्रंक रोडपासून ४५ मिनिटांच्या अंतरावर, मोहरीच्या फुलोऱ्याने बहरलेली सुंदर शेतं तुम्हाला रामगढ सरदारां येथे घेऊन जातात. इथल्या भिंतींनी स्वतःच्या नोंदी अगोदरच लिहून ठेवल्या आहेत. त्या भिंतीवर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जोडीला पिवळसर हिरव्या रंगात अजयचा सुद्धा एक देखणा फोटो असलेलं होर्डिंग लावलं आहे. थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग नऊ दशकांपूर्वी आपल्या साथीदारांसह फासावर चढले, परंतु त्यांना सुद्धा त्यानंतर सत्तेवर असलेल्या कुठल्याच सरकारकडून शहीद किंवा हुतात्मा म्हणून गौरविण्यात आलेलं नाही.
गावातील एका होर्डिंगवरच्या या ओळीः













