“आज टीव्ही आलेत, मोबाइन फोन आलेत. लोक त्यावरच आपली करमणूक करून घेतात,” हातातल्या ढोलकच्या दोऱ्या कसत मुस्लिम खलीफा म्हणतात.
बाराव्या शतकातले वीरयोद्धे आल्हा आणि ऊदल (रुदलही लिहिलं जातं) यांचं महाकाव्य मुस्लिम खलीफा गातात. बिहारच्या समस्तीपूरच्या या लोकगायकाने गेली पन्नास वर्षं ही कला जपली आहे. त्यांचा आवाज जोरकस आहे, त्याला जवार आहे. अनेक वर्षं गाणाऱ्याचा गळा आहे त्यांचा.
एप्रिल-मे महिन्यामध्ये भात, गहू आणि मक्याची काढणी सुरू असते तेव्हा ते आपला ढोलक घेऊन शेतकऱ्यांसाठी शेता-शेतात जाऊन हे काव्य सादर करतात. दोन तासांच्या त्यांच्या कलेसाठी त्यांना नवं धान्य मिळतं. साधारण १० किलोपर्यंत. ते म्हणतात, “तिन्ही पिकं काढायला महिनाभर लागतो. त्यामुळे तेवढा एक महिना मी शेतातच फिरत असतो.” लगीनसराईच्या तीन महिन्यात देखील त्यांना भरपूर मागणी असते. तिथे त्यांना अगदी १० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत बिदागी मिळते.
आल्हा-ऊदलची वीरगाथा इतकी मोठी आहे की पूर्ण कथा ऐकायची तर किती तरी दिवस लागतात. त्यासाठी तसा श्रोता पण पाहिजे. खलीफा म्हणतात, “आजच्या काळात एवढं मोठं काव्य कोण ऐकणार?” खालिसपूर गावाचे रहिवासी असणारे ६० वर्षीय खलीफा यांच्या मते आजकाल या वीरगाथेमध्ये फारसा कुणाला रस राहिलेला नाही. आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या कमाईवर झाला आहे. इतरांचं सोडा, त्यांच्या मुलांना देखील या वीरगाथेचं काहीही अप्रूप नाही.
खलीफा इस्लाम धर्माचं पालन करतात पण नट या जातीत गणले जातात. बिहारमध्ये ही अनुसूचित जातींपैकी एक आहे. बिहारमध्ये या जातीची लोकसंख्या ५८,८१९ असली तरी पारीशी बोलताना खलीफा म्हणतात की “१०-२० गावांमध्ये मिळून एखादा असा [आल्हा-ऊदल] गायक मिळाला तरी पुष्कळ.”










