मे महिन्याच्या सुरुवातीलाच राजौरी जिल्ह्यातल्या पेरी या गावातून अब्दुल लतीफ बजरान आपल्या मेंढ्या, शेळ्या, घोडे आणि एक कुत्रा अशा एकंदर १५० जितराबासह काश्मीरच्या उंच डोंगराळ भागातल्या हिरव्यागार कुरणांच्या शोधात निघाले होते.
सोबतीला त्यांचा मुलगा तारिक आणि इतर काही जण होते. “अशक्त जनावरं, अन्न, तंबूचं सामान आणि इतर आवश्यक वस्तूंसह मी माझ्या घरच्यांना (बायको आणि सून) अगोदरच मिनी ट्रकमध्ये पुढे पाठवून दिलं होतं,’’ ते सांगतात. अब्दुल लतीफ बजरान ६५ वर्षांचे आहेत.
“पण दोन आठवड्यांनंतर त्यांना वईलमध्ये पाहून मला धक्काच बसला,’’ ते सांगतात. त्यांना असं वाटत होतं की एव्हाना घरची मंडळी (भारत-पाकिस्तान सीमेवरील) मिनीमर्ग इथे आपल्या ठरल्या ठिकाणी पोचली असतील आणि आपली उन्हाळी छावणीसुद्धा तयार असेल.
पण ठरल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना अजून १५ दिवस लागणार होते. अब्दुल यांच्या म्हणण्यानुसार, खराब हवामानामुळे त्यांना वाटेतच थांबावं लागलं. झोजिला पास भागातलं बर्फ वितळण्याची सगळे वाट पाहत होते. मिनीमर्गला पोहोचायचं तर झोजिला पास पार करण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
दरवर्षी उन्हाळा जवळ आला की जम्मू भागात गवताची कमतरता भासू लागते. मग बकरवालांसारखे तिथले पशुपालक भटके समाज चांगल्या कुरणांच्या आणि चाऱ्याच्या आशेत काश्मीर खोऱ्यात स्थलांतर करतात. ऑक्टोबरमध्ये जेव्हा तिथलं हवामान थंड होऊ लागतं तेव्हाच ते परत येतात.
उंचावरची गवताळ मैदानं अशी बर्फाच्छादित राहिली तर मात्र अब्दुल यांच्यासारखे पशुपालक कोंडीत सापडतात - गवत नसल्यामुळे ते पुन्हा खाली उतरून आपल्या गावीही परतू शकत नाहीत आणि उंच गवताळ प्रदेशाकडेही कूच करू शकत नाहीत.











