आपल्या शाही बिछान्यात सुलतान जागेपणीच लोळत होता, त्याच्या हृदयासारखाच त्याच्या शाही राजवाड्यावरचा झेंडा जोरात फडफडत होता. एका शाही घराण्याची सत्ता संपवून तो गादीवर बसला खरा, एका मागो माग उठावांना त्याने तोंड दिलं होतं. त्याच्या शक्तीबद्दल तो ठाम होता आणि कोणतंही अस्त्र न घेता उघड्या छाताडाने तो रणांगणात उतरला होता. भक्षक श्वापदांचे कळपच्या कळप त्याने जवळ जवळ एकट्यानेच कापून काढले होते. हे तर फालतू कीटक आहेत, त्याला वाटलं होतं. पण त्याला वाटलं त्यापेक्षा ही कीड जास्तीच जोमाने पसरत होती. त्याची कल्पनाशक्ती खरंच अद्भुत होती आणि तिच्या जोरावर त्याने त्यांचा हल्ला दर वेळी परतून लावला होता. पण या डिसेंबर महिन्याचं वारं निष्ठुर होतं.
या मेटारायझीयम ॲंनीसोप्लीचा साठा वाढवायला पाहिजे. मातीतच वाढणारी ही कीडनाशक बुरशी किड्यांचा नाश करते. वरिष्ठ तज्ज्ञांच्या समितीने जाहीर केलं होतं की त्यांच्यामध्येच बुरशीचा प्रसार करून त्यांचा खातमा करणं हे स्वस्त, अधिक प्रभावी आणि दीर्घकाळ टिकणारा उपाय ठरेल. आपल्या श्रीमंत मित्रांपाशी आधीपासूनच या साठ्याची सोय केलेली आहे. आता आव्हान हे आहे की यातले तरुण कीटकांचे थवे शोधायचे आणि त्यांच्यावर या जैविक कीटकनाशकाचा फवारा करायचा.
संध्याकाळ झालीसुद्धा आणि सुलतान थकून गेला. आपलं मन काबूत रहावं, शांत व्हावं अशी त्याची मनापासून इच्छा होती. या आंदोलन करणाऱ्या टोळांच्या आरोळ्या हवेत भरून राहिल्या होत्या आणि त्या असह्य होऊ लागल्या होत्या. पण इतकंच नव्हतं. असंही काही होतं जे त्याला आतून खात होतं. त्याचा अहंकार होता का? तो खरंच घाबरला होता का? का येणारी रात्र काय घेऊन येणार आहे याचा घोर त्याला लागला होता? आपली पकड सुटत चाललीये हे आता त्याला जाणवायला लागलं होतं का? हे अशी आत्मचिकित्सा वेदनादायी होती. त्याने बाहेर सहज एक नजर टाकली आणि आपलं मन खिडकीबाहेर मोकळं सोडलं. गडद होत चाललेल्या क्षितिजावरचा मावळता सूर्य अभद्राचे संकेत देत होता.



