महाराष्ट्रात, औरंगाबादजवळ नुकतंच रेल्वेखाली चिरडून मध्य प्रदेशातले सोळा मजूर मारले गेले. यावर आपली पहिली प्रतिक्रिया म्हणजे जे मेले ते मजूर मेले ते रेल्वेच्या रुळांवर का झोपले होते. कुणी विचारलं नाही की या सर्वांना आपल्या गावी पायी जायला कोणी भाग पाडलं?
गाडीखाली चिरडून मरण पावलेल्या मजुरांची नावं देण्याची तसदी किती इंग्रजी प्रकाशनांनी घेतली बरं? जणू काही त्यांना नावही नाही आणि चेहराही. गरिबांकडे पाहण्याची ही आपली वृत्ती. हाच विमान अपघात असता तर माहितीसाठी विशेष हेल्पलाइन सुरू झाल्या असत्या. आणि अशा अपघातात ३०० व्यक्ती मरण पावल्या असत्या तरी सगळ्यांची नावं वर्तमानपत्रात वाचायला मिळाली असती. पण हे तर मध्य प्रदेशातले गरीब मजूर होते, त्यातले आठ गोंड आदिवासी! कुणाला काय फरक पडतो? ते स्वतःच्या घराकडे नेणारा रस्ता म्हणून या रेल्वेच्या रुळांवरून निघाले होते. वाटेत स्टेशन लागलं तर एखाद्या गाडीत बसता येईल अशी त्यांच्या मनात आशा असावी. आणि ते रुळावर निजले कारण ते थकून भागून गेले होते, आणि इथून कोणत्याही गाड्या जात नाहीयेत असा त्यांचा समज असावा.
भारतात ज्या संख्येने कष्टकरी कामगार आहेत ते पाहता या सर्वांशी सरकार काय प्रकारचा संवाद साधतंय असं तुम्हाला वाटतं?
आपण या देशातल्या १ अब्ज ३० कोटींहून अधिक माणसांना त्यांची आयुष्यं बंद करून टाकण्यासाठी फक्त चार तास दिले. आपले एक ज्येष्ठ श्रेष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणाले तसं, “एखाद्या छोट्या सैन्याला मोठी कामगिरी करण्यासाठी देखील चार तासांपेक्षा जास्त वेळ दिला जातो.” आता आपल्याला स्थलांतरित कामगारांचं म्हणणं पटेल न पटेल, सध्याचं ठिकाण सोडून जाण्यामागचा त्यांचा विचार योग्यच होता. त्यांना माहित आहे – आणि हरघडी आपण ते सिद्ध करतोय – की त्यांचं सरकार, कारखान्यांचे मालक आणि आपल्यासारखे त्यांना कामावर टेवणारे मध्यमवर्गीय विश्वास ठेवण्याच्या लायकीचे तर नाहीच आहोत पण निष्ठुर व क्रूर आहोत. आणि त्यांच्या संचारावर मर्यादा आणणारे कायदे आणून आपण ते दाखवून दिलंय.
एक तर तुम्ही प्रचंड भीती निर्माण केली. तुम्ही देशाला अक्षरशः गोंधळात टाकलंत आणि लाखो लोकांना देशोधडी लावलंत. खरं तर बंद असणाऱ्या शाळा, महाविद्यालयं, मंगल कार्यालयं आणि सामुदायिक केंद्रांमध्ये आपल्याला बेघर आणि स्थलांतरित कामगारांसाठी निवारे सुरु करणं सहज शक्य होतं. आपण परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी तारांकित हॉटेल्समध्ये क्वारंटाइनची सुविधा मात्र केली.
आपण स्थलांतरितांसाठी रेल्वेगाड्यांची सोय केली तेव्हा आपण त्यांच्याकडून पूर्ण भाडं वसूल केलं. मग आपण वातानुकुलित आणि राजधानीचं भाडं रु. ४,५०० इतकं करून टाकलं. आणि भरीस भर म्हणजे आपण तिकिटं फक्त ऑनलाइन मिळतील अशी सोय केली. जणू काही सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत. काहींनी तीही तिकिटं खरेदी केली.
पण कर्नाटकात, त्यांनी गाड्याच रद्द केल्या. का तर मुख्यमंत्री बिल्डरांना भेटले आणि त्यांनी तक्रारीचा सूर लावला की त्यांचे गुलाम निघून चाललेत. तुम्ही आता जे पाहताय ना ते गुलामांचं बंड शमवण्याचा आटापिटा आहे.
आपल्याकडे गरिबांना एक आणि इतरांना दुसरा न्याय ही रीतच आहे. आणि खरं तर अत्यावश्यक सेवांची यादी केली तर तुमच्या लक्षात येईल की खरं तर गरीब लोकच अत्यावश्यक आहेत आणि डॉक्टर्स. अनेक नर्सेस आजही सुखवस्तू घरातल्या नाहीत. आणि त्यांच्या शिवाय, स्वच्छता कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, वीज कर्मचारी, उर्जाक्षेत्रातले कर्मचारी, कारखान्यातले कामगार आहेत. आणि तुम्हाला अचानक असा साक्षात्कार होईल की या देशासाठी उच्चभ्रू लोक खरं अनावश्यकच आहेत.








