“जर प्रत्येकानेच आपल्या गच्चीत शेती करायची ठरवली तर सगळ्यांनाच पुरेसं खाणं मिळू शकेल.”
आम्ही एका वर्गात होतो. ग्रामीण भागाबद्दल शहरी विद्यार्थ्यांच्या जाणिवा जागृत करण्यासाठी आम्हाला बोलावण्यात आलं होतं. आणि तेव्हाच एका विद्यार्थ्याचं हे विधान येतं आणि एकदम शांतता पसरते. जर ते आम्ही तसंच विरू दिलं असतं तर ते बरंच घातक ठरलं असतं. या देशातल्या 'आहे रे' वर्गातल्या तरुण विद्यार्थ्यांच्या या वर्गात 'प्रत्येक जण' म्हणजे कोण याची चुकीची व्याख्या रुजली असती. त्यामुळे ते सोडून न देता त्याचाच धागा पकडून आम्हाला अर्थपूर्ण संवाद घडवून आणणं गरजेंचं होतं. अशीही घरं असतील का ज्यांना गच्ची, बाल्कनी किंवा मोकळी जागा नाहीये?
पारी एज्युकेशन हा पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया – पारीचा शिक्षणाचं काम करणारा विभाग आहे. असे क्षण शोधून रुळलेल्या साजेबद्ध प्रतिमा दूर करणं आणि विचारांच्या कक्षा रुंदावण्याचं काम आम्ही करतो. पारीवरच्या गोष्टींचा वापर करून शहरी भागांमधल्या शाळा आणि महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये ग्रामीण आणि वंचित समूहांबद्दल सम-अनुभूती निर्माण व्हावी, या जगाचा त्यांनी शोध घ्यावा, इथल्या लोकांशी संवाद साधावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हे करत असतानाच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या समाजांबद्दल लिहावं, नोंदी ठेवाव्यात, त्यांच्याच जगण्याचा समावेश असणारी उद्याची पाठ्यपुस्तकं तयार करण्यात त्यांचा सहभाग असावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. ‘समाजाची पुनर्रचना’ शिक्षणाच्या पुनर्रचनेतूनच होऊ शकेल, जिथे विद्यार्थी आपल्या देशातल्या बहुविध वास्तवांबद्दल जाणून घेऊ शकतील, त्याबद्दल वाचतील, ऐकतील असा ठाम विश्वास मारिया माँटेसरींंनी व्यक्त केला होता.
शिक्षक म्हणून आम्ही हे जाणतो की आपल्या विद्यार्थ्यांनी ‘वैश्विक नागरिक’ बनावं या खटाटोपामध्ये ते आपल्या भवतालापासून आणि मोठ्या शहरांपल्याडच्या भारतापासूनही परात्म होत चालले आहेत. या अनेकविध भारतांकडे दुर्लक्ष केल्याने, अभ्यासक्रमात त्यांना जागाच न दिल्यामुळे आपण जणू काही असाच संदेश देतोय की त्यांचं काहीही मोल नाही. पारीचे संस्थापक संपादक, पी. साईनाथ म्हणतातः ‘भारतात एक सबंध पिढी स्वतःच्याच देशात परदेशी असल्यासारखी मोठी होतीये.’










