“[सर्वोच्च न्यायालयाच्या] या निकालामुळे आमच्यावरच्या अत्याचारांमध्ये वाढच होणार आहे!”
सरोजा स्वामी काय म्हणतायत ते ऐका. मुंबईमध्ये २ एप्रिल रोजी झालेल्या दलित आणि आदिवासी निदर्शनासाठी जमलेल्या सर्वांच्याच मनातला – आणि देशभरातल्या लाखोंच्या मनातला - संताप त्यांच्या शब्दातून व्यक्त होतोय.
“आजही आपण अशा काळात जगतोय जिथे, घोड्यावर बसला म्हणून कुणा दलित मुलाचा खून केला जातोय,” ५८ वर्षीय राजकीय कार्यकर्त्या असणाऱ्या स्वामी म्हणतात. दादरच्या कोतवाल उद्यानापासून शिवाजी पार्कजवळील चैत्यभूमीकडे निघालेल्या मोर्चासोबत चालत असताना त्या बोलतायत.
२० मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या तरतुदी बोथट होत असल्याने हे आंदोलक संतप्त झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा अर्थ असा की यापुढे एखाद्या सरकारी नोकरदारावर दलित आणि आदिवासींवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला असेल तर त्याच्या वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय अशा नोकरदारावर कारवाई करता येणार नाही.
सोबत, आरोप दाखल होण्याआधी, हे आरोप खरे आहेत का खोटे, हे तपासण्यासाठी एखाद्या पोलिस उप निरीक्षकाने पूर्व चौकशी करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने या निकालाचा फेरविचार व्हावा म्हणून याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या विषयावर तात्काळ सुनावणी घेण्याची तयारी दाखवली आहे.








