‘मी भाज्या विकतोय आता. पण त्यात फार फायदा नाही होत. आम्ही बहुतेक सगळे आता घरात बसून आहोत, रिकामे, काहीही न करता. इथे जवळ असलेला सिमेंटचा कारखाना सुरू आहे, पण आम्ही नाही जात तिथे कामाला,’ मोरी गावचे करीम जाट मला फोनवरून सांगत होते. कच्छ जिल्ह्याच्या लखपत तालुक्यातलं हे गाव. करीम जाट हा फकीरानी जाट समाजातले ‘मालधारी.’ कच्छी भाषेत ‘माल’ म्हणजे गुरं. गुरं राखून असणारे, म्हणून ते मालधारी. संपूर्ण कच्छमध्ये ही मालधारी मंडळी गाई, म्हशी, उंट, घोडे, शेळ्या आणि मेंढ्या बाळगून आहेत.
ज्या भाज्यांचा करीम जाटनी उल्लेख केला, त्या त्यांनी जवळच्या बाजारातून किंवा आसपासच्या गावातून विकत आणलेल्या. ते विकतायत भाज्या, पण त्यांची योग्य किंमत मिळत नाहीये, अशी त्यांची तक्रार आहे. या भागातला सिमेंटचा कारखाना त्यांच्या गावापासून काही किलोमीटरवर असलेल्या वसाहतीत आहे. पण लॉकडाऊनमुळे करीम आणि इतर फकीरानी जाट मंडळींना घरातून बाहेर पाऊल टाकणं खूप अवघड झालंय. शिवाय, या कारखान्यात आधीच भरपूर मजूर आहेत. बहुतेक सगळे पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतून स्थलांतरित झालेले. घरी परतू शकले नाहीत, त्यामुळे इथेच राहिलेले. हे स्थलांतरित आणि इथली स्थानिक मंडळी यांच्यातले संबंध कधीचफार स्नेहाचे, प्रेमाचे नव्हते.
लॉकडाऊनमुळे भारत-पाकिस्तान सरहद्दीजवळ असलेल्या सावला पीर दर्ग्यात आणि तिथे होणाऱ्या उरुसाला जाता आलं नाही, याची खंत करीम जाट बोलून दाखवतात. ‘रमजान सुरू झालाय. ईदला आता महिनाही राहिला नाही...’ त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग... ‘या वर्षीची ईद खूपच वेगळी असणार आहे.’
कच्छमधला कोविड १९ चा पहिला रुग्ण होती लखपत तालुक्यातलीच एक महिला. ती परदेशी जाऊन आली होती. मार्चमध्ये भुजला तिची टेस्ट केली आणि ती करोना पॉझिटिव्ह आहे हे कळलं. लखपत हे उंट पाळणाऱ्यागुराख्यांचं माहेरघर आहे.
२४ मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाली आणि त्यानंतर कच्छ जणू स्तब्ध झालं... सगळं जिथल्या तिथे! उंट पाळणारे गुराखी घरापासून खूप दूरवर वेगवेगळ्या ठिकाणी उंटांना चरायला घेऊन जातात. तसेच त्यावेळीही गेले होते. त्यांना घरी परतताच आलं नाही. ज्या गावांमध्ये ते कुटुंबासह राहातात, तो भाग भारत-पाकिस्तान हद्दीच्या अगदी जवळ, किंवा खरं तर सरहद्दीवरच असलेला. अतिसंवेदनशील भाग. सुरक्षेचे नियम अत्यंत कडक. अचानक झालेल्या लॉकडाऊनने ‘मालधारीं’ना गावात परतायला किंवा गावात असलेल्या त्यांच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या अन्नधान्याची तजवीज करायला वेळच मिळाला नाही.
‘आता सध्या आमची गुरं ठीक आहेत,’ ते सांगतात. कारण आता ही सगळी मंडळी अडकली आहेत ती चराऊ कुरणांवर. पण हा लॉकडाऊन वाढला, तर गुरांना चारणं कठीण होईल. वाढत्या उन्हाळ्यातली वाढती उष्णता हाही एक प्रश्न आहेच.
नाखत्राणा तालुक्यातल्या काही जणांशी मी फोनवर बोललो. कुरणांवर असलेल्या त्यांच्यापैकी काही गुराख्यांना तिथल्या पोलिसांनी सांगितलं, अजिबात इकडेतिकडे फिरायचं नाही. त्यामुळे आता ही मंडळी धान्य, रेशन असं काही आणायला किंवा इतर काही कामासाठी आपल्या गावीही जाऊ शकत नाहीत. सगळंच कठीण झालंय.










