“कसा आहेस बाळा? काय करतोयस? हे सगळं किती दिवस चालणारे?” चेनाकोंडा बालसामी त्यांच्या मुलाला फोनवर विचारतात. “लई कडक केलंय का? आपल्याकडं पोलिस आले होते? लोकं [शेतमजूर] कामाला चाललीत का?”
दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात बालसामींनी इतर चार मेंढपाळांसोबत तेलंगणाच्या वानपार्थी जिल्ह्यातील आपलं गाव केठेपल्ले सोडलं. त्यांच्याकडे सुमारे १००० शेरडं आणि मेंढरं राखायला आहेत (यातली त्यांच्या मालकीची कोणतीच नाहीत), आणि तेव्हापासून ते जितराबाला चाऱ्याच्या शोधात भटकंती करतायत.
ते आणि इतर मेंढपाळ – सगळे यादव तेलंगणातील ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या जातीचे आहेत. २३ मार्च रोजी ते सगळे केठेपल्लेपासून १६० किलोमीटरवर कोप्पोले गावी पोचले होते. त्यानंतर दोनच दिवसांत अख्ख्या देशभरात कोविड-१९ चा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली.
नलगोंडा जिल्ह्याच्या गुर्रुमपोडे मंडलातल्या कोप्पोलेमध्ये संचारबंदी लागल्यानंतर त्यांना डाळ-तांदूळ, भाजीपाला आणि इतर सामान विकत घेणं अवघड व्हायला लागलंय. आणि ते आता रोज थोडं थोडं सामान खरेदी करतायत.
सार्वजनिक वाहतूक ठप्प पडल्यामुळे आणि संचारबंदी कधी उठेल याची काही खात्री नसल्यामुळे आपल्या जितराबासाठी औषधं घेणं, नेहमीसारखं मधूनच आपल्या घरी चक्कर मारून येणं, मोबाइल फोन रिचार्ज करणं आणि आपल्या जितराबासाठी नवी गायरानं शोधणं हे सगळंच अवघड – त्यांच्या मते अशक्य – होऊन बसलंय.








