मोहम्मद हासनेन दिल्लीमध्ये मजूर म्हणून काम करत आहेत – बांधकाम कामगार, हमाल किंवा गेली २५ वर्षं बिगारीवर जे काही काम मिळेल ते. “पण आजचा दिवस वेगळा आहे,” दिल्लीच्या ईशान्येकडे असणाऱ्या रामलीला मैदानावर मांडव टाकले जात असताना ते म्हणतात. २८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून इथे शेतकरी येऊ लागतील. २९-३० नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या किसान मुक्ती मोर्चासाठी ते देशभरातून इथे पोचणार आहेत.
“मीदेखील शेतकरीच आहे,” ४७ वर्षीय हासनेन सांगतात. “उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादहून मला इथे यायला लागलं कारण आमचं शेत पिकतच नव्हतं. उद्या मोठ्ठा मोर्चा निघेल अशी आशा आहे. मुरादाबादचे काही शेतकरी आले तर बघू. फार वर्षं आमच्याकडे दुर्लक्षच केलं गेलंय.”
बुधवारी २८ नोव्हेंबरच्या सकाळपासूनच अंदाजे ६५-७० कामगार रामलीला मैदानात मांडव उभारण्यासाठी जमिनीत खुंट्या रोवतायत. खुंटीवर एक घाव बसतो अन् एक सुस्कारा सुटतो. फार लांब नाही, मांडवाला लागूनच ६-७ लोक बटाटे सोलतयात आणि मोठ्या पातेल्यात दूध उकळतंय. मूळचे मध्य प्रदेशातल्या पोरसा गावचे आणि सध्या इथे एका हलवायाकडे काम करणारे ३५ वर्षीय हरीश्चंद्र सिंग सगळ्या कामावर देखरेख ठेवून आहेत. “आम्हाला [रामलीला मैदानात मुक्कामी असणाऱ्या] कमीत कमी २५,००० माणसांसाठी समोसे आणि चहा तयार ठेवायचे आहेत,” ते म्हणतात.





